कोलंबोत पावसाची बॅटिंग! सामना रद्द झाला तर पाकिस्तानची 'चांदी', पण टीम इंडियाचं गणित काय?
कोलंबोमधील भारत-पाकिस्तान महामुकाबल्यावर पावसाचे सावट असतानाच, सोशल मीडियावर या सामन्याच्या निकालापेक्षा हवामानाच्या अंदाजाचीच चर्चा जास्त रंगली आहे. टी-20 विश्वचषक 2026 मधील हा हायव्होल्टेज सामना मैदानातील खेळापेक्षा कुणाचे नशीब फळफळणार, याकडे सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.

कोलंबोचे हवामान आणि 'यू-टर्न'ची पार्श्वभूमी
कधी बहिष्काराची भाषा, तर कधी यू-टर्न घेत पाकिस्तानने या सामन्यासाठी दिलेली संमती यामुळे आधीच वातावरण तापलेले होते. आशिया कप 2025 च्या वादाचे पडसाद अजूनही ताजे असतानाच, आता निसर्ग या सामन्यात 'व्हिलन' ठरणार असल्याचे दिसतेय. रविवारी, १५ फेब्रुवारीला कोलंबोच्या आर. प्रेमदासा स्टेडियमवर हा थरार रंगणार असला तरी, दक्षिण-पूर्व भागात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. विशेषतः सामन्याच्या वेळेत म्हणजे संध्याकाळी ६ ते ८ दरम्यान पावसाची दाट शक्यता असल्याने चाहत्यांचा हिरमोड होण्याची शक्यता आहे.
सामना रद्द झाला तर पाकिस्तानची 'चांदी'?
जर पावसाने व्यत्यय आणला आणि सामना अनिर्णित राहिला, तर दोन्ही संघांना प्रत्येकी एक गुण वाटून दिला जाईल. सध्या भारत आणि पाकिस्तान या दोन्ही संघांच्या खात्यात प्रत्येकी ४ गुण आहेत. सामना रद्द झाल्यास त्यांचे समसमान ५ गुण होतील आणि हे दोन्ही संघ आपोआप 'सुपर-८' फेरीसाठी पात्र ठरतील. या स्थितीत पाकिस्तानला कोणताही धोका न पत्करता पुढच्या फेरीत प्रवेश मिळेल, म्हणूनच याला पाकिस्तानची 'चांदी' मानले जात आहे.
अमेरिका आणि नेदरलँड्सचे स्वप्न भंगणार?
या पावसाचा सर्वात मोठा फटका अमेरिका आणि नेदरलँड्स यांसारख्या उदयोन्मुख संघांना बसू शकतो. या दोन्ही संघांकडे सध्या २ गुण असून त्यांचा प्रत्येकी एक सामना शिल्लक आहे. त्यांनी आपला शेवटचा सामना जिंकला तरी त्यांचे जास्तीत जास्त ४ गुण होतील. जर भारत-पाकिस्तान सामना रद्द होऊन दोघांचे ५-५ गुण झाले, तर गणितीयदृष्ट्या अमेरिका आणि नेदरलँड्सचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात येईल.
मैदानातील लढत आणि संभाव्य समीकरणे
जर हवामानाने साथ दिली आणि सामना पूर्ण झाला, तर जो संघ जिंकेल तो थेट सुपर-८ मध्ये मजल मारेल. मात्र, पराभूत होणाऱ्या संघासाठी समीकरणे कठीण होऊ शकतात. विशेषतः भारताचा पुढचा सामना नेदरलँड्सशी असल्याने त्यांचे पारडे जड वाटते. दुसरीकडे, अमेरिका आपला शेवटचा सामना कमकुवत मानल्या जाणाऱ्या नामिबियाविरुद्ध खेळणार आहे. अशा स्थितीत एखाद्या अनपेक्षित निकालाने किंवा नेट रनरेटच्या गणिताने मोठ्या संघांची धाकधूक वाढू शकते. सध्या तरी चाहत्यांच्या नजरा कोलंबोच्या आकाशाकडे लागल्या आहेत की, तिथे धावांचा पाऊस पडणार की वरुणराजा बॅटिंग करणार!












Click it and Unblock the Notifications