IND vs ENG 2nd Test : आकाशदीप-सिराजच्या वादळाने इंग्लंड हादरले; 58 वर्षांनंतर भारताला ऐतिहासिक विजय
IND vs ENG 2nd Test 5th Day : दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताने इंग्लंडचा 336 धावांनी पराभव केला आहे. यासह टीम इंडियाने मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली आहे.
बर्मिंगहॅममध्ये खेळल्या गेलेल्या या सामन्यात टीम इंडियाने इंग्लंड संघासमोर 608 धावांचे मोठे आव्हान दिले होते. प्रत्युत्तरात इंग्लिश संघ फक्त 287 धावाच करू शकला. कर्णधार शुभमन गिल व्यतिरिक्त मोहम्मद सिराज आणि आकाशदीप यांनी विकेट्स घेत भारताच्या या विजयात मोठे योगदान दिले. सिराज अन् आकाशदीपच्या वादळापुढे इंग्लंडचा संघ घायाळ झाला.
नेमकं काय काय घडलं, वाचा सविस्तर!
शुभमन गिलच्या नेतृत्त्वात भारतानं इंग्लंडला दुसऱ्या कसोटीत पराभूत करत बर्मिंघमच्या एजबेस्टनमध्ये ऐतिहासिक विजय मिळवलाय. भारतानं फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण या सर्व भूमिकेत उत्तम कामगिरी करत एजबेस्टनच्या मैदानात नवा इतिहास रचला आहे.
भारतानं इंग्लंडला 336 धावांनी पराभूत केलं, इंग्लंडचा दुसरा डाव 271 धावांवर आटोपला. भारतानं पहिल्या डावात 587 धावा केल्या, दुसऱ्या डावात 6 बाद 427 धावांवर डाव घोषित केला. तर, इंग्लंडला पहिल्या डावात 407 धावांवर सिराज आणि आकाश दीपच्या गोलंदाजीमुळं रोखण्यात यश आलं.
टीम इंडियाने इंग्लंड पुढं विजयासाठी 608 धावांचं आव्हान ठेवलं होतं. आकाश दीपनं 6 विकेट घेत भारताच्या विजयाचा पाया रचला. त्याला मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा, रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदरनं यांनीही मोलाची साथ दिली. भारतानं या विजयासह मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली.

भारताच्या पहिल्या डावात 587 धावा
भारतीय क्रिकेट संघ हेडिंग्लेच्या लीड्सच्या मैदानावरील पराभवाची सल मनात घेऊन बर्मिंघमच्या एजबेस्टन मैदानावर उतरला होता. दुसऱ्या कसोटीत इंग्लंडचा कॅप्टन बेन स्टोक्स यानं टॉस जिंकून भारताला पहिल्यांदा फलंदाजीला बोलावण्याचा निर्णय घेतला.
भारताच्या फलंदाजांनी पहिल्या कसोटीत झालेल्या चुकांमध्ये सुधारणा करत दुसऱ्या कसोटीच्या पहिल्या डावात 587 धावा केल्या. यशस्वी जयस्वालनं 87 धावांची खेळी करत चांगली सुरुवात केली. यानंतर करुण नायर, केएल राहुल मोठी खेळी करण्यात फेल झाले.
परंतु, कॅप्टन शुभमन गिल यानं रवींद्र जडेजा सोबत 203 धावांची भागीदारी केली. रवींद्र जडेजानं 89 धावांची खेळी केली. शुभमन गिलनं 269 धावांची खेळी केली. भारत या जोरावर 587 धावांपर्यंत पोहोचला गेला.
इंग्लंडला 407 धावांवर रोखलं!
भारतानं मोहम्मद सिराज आणि आकाश दीप यांच्या दमदार गोलंदाजीच्या जोरावर इंग्लंडला पहिल्या डावात 407 धावांवर रोखलं. सिराजनं 6 विकेट घेतल्या तर आकाश दीपनं 4 विकेट घेतल्या.
हॅरी ब्रुकनं 158 धावा केल्या तर जेमी स्मिथ 184 धावा करुन नाबाद राहिला. भारताच्या दोन्ही गोलंदाजांनी इंग्लंडच्या 6 फलंदाजांना खातं देखील उघडू दिलं नाही. यामुळं इंग्लंडचा संघ 407 धावांवर बाद झाला आणि भारताला 180 धावांची आघाडी मिळाली.
शुभमनचं शतक, इंग्लंडला 608 धावांचं लक्ष्य
- भारतानं दुसऱ्या डावात शुभमन गिलच्या 161 धावा आणि केएल राहुल, रिषभ पंत आणि रवींद्र जडेजा यांच्या अर्धशतकाच्या जोरावर 427 धावांवर डाव जाहीर केला.
- शुभमन गिलनं पहिल्या डावात 269 धावा केल्या तर दुसऱ्या डावात शतक केलं. पहिल्या कसोटीत भारताची मिडल ऑर्डर आणि लोअर ऑर्डर अपयशी ठरली होती.
- त्यांनी दोन्ही डावात कामगिरी सुधारली. भारतानं 6 बाद 427 धावांवर संघ जाहीर केला. यामुळं इंग्लंडपुढं विजयासाठी 608 धावांचं लक्ष्य होतं.
इंग्लंडला दुसऱ्या डावात आकाश दीपने नमवले
इंग्लंडला भारतानं दुसऱ्या डावात जोरदार धक्के दिले. आकाश दीपनं इंग्लंडचे ओली पोप, जो रुट, हॅरी ब्रुक, बेन डकेट यांना बाद केलं. मोहम्मद सिराजनं क्रॉलीला बाद केल. तर, वॉशिंग्टन सुंदरनं बेन स्टोक्सला बाद केलं. यामुळं भारताची वाटचाल विजयाच्या दिशेनं झाली. जेमी स्मिथनं 88 धावा केल्या तर इतर फलंदाजांना मोठी खेळी करता आली नाही.
58 वर्षांनंतर ऐतिहासिक विजय
बर्मिंगहॅमचे एजबॅस्टन मैदान भारतासाठी कसोटी सामन्यांमध्ये एक दुःस्वप्न ठरले आहे. टीम इंडियाने 1967 मध्ये येथे पहिला कसोटी सामना खेळला होता, परंतु आतापर्यंत त्यांना एजबॅस्टनवर विजय मिळवता आला नव्हता. कपिल देव, विराट कोहली आणि एमएस धोनी सारखे दिग्गज खेळाडूही त्यांच्या नेतृत्वाखाली या मैदानावर भारताला विजय मिळवून देऊ शकले नाहीत. आता अखेर शुभमन गिलने त्याच्या नेतृत्वाखाली 58 वर्षांची पराभवाची मालिका संपवली आहे, या भारतीय संघासाठी अभिमानाचा क्षण आहे.












Click it and Unblock the Notifications