भारतीय संघाला मोठा धक्का, भारत-पाक सामन्यात जसप्रीत बुमराह 'आऊट'; नेमकं काय घडलंय!
Jasprit Bumrah : चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी आता फारसा वेळ उरलेला नाही. या स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा लवकरच केली जाईल. पण, त्याआधी अनुभवी वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहची दुखापत भारतासाठी चिंतेचा विषय आहे.
बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये विकेटच्या शोधात जसप्रीत बुमराहचा 'अतिवापर' केल्याची किंमत भारताच्या चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकण्याच्या शक्यतांना धक्का देत असल्याचे दिसून येत आहे.
'पाठीच्या दुखापतीमुळे' सिडनी येथे ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पाचव्या आणि शेवटच्या कसोटीतून हा वेगवान गोलंदाज बाहेर पडला होता, परंतु त्याची दुखापत पहिल्या अंदाजापेक्षा जास्त गंभीर असल्याचे दिसून आले.
बुमराहच्या दुखापतीबाबत अनेक प्रकारच्या बातम्या सतत येत आहेत. आता आणखी एक मोठी अपडेट आली आहे, ज्यामुळे टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे.

रिपोर्ट्सनुसार, जसप्रीत बुमराह चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सुरुवातीच्या सामन्यांना मुकू शकतो, अशी शक्यता वर्तविली जात आहे. त्याच्या उपचारानंतर तो मार्चपर्यंतच खेळण्यासाठी उपलब्ध असेल असे सांगितले जात आहे. यापूर्वी, चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी जसप्रीत बुमराहची संघात निवड केली जाईल अशी बातमी आली होती. त्याला तंदुरुस्त होण्यासाठी पुरेसा वेळ दिला जाईल. जर जसप्रीत बुमराह वेळेवर तंदुरुस्त झाला तरच त्याची चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी मुख्य संघात निवड होईल. मात्र, आता बातमी येत आहे की तो फेब्रुवारीपर्यंत तंदुरुस्त होऊ शकणार नाही. याचा अर्थ जसप्रीत बुमराह भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यात खेळू शकणार नाही.
ग्रुप स्टेजमध्ये सहभागी होऊ शकणार नाही
इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार, जसप्रीत बुमराह चॅम्पियन्स ट्रॉफीच्या ग्रुप स्टेज सामन्यांमध्ये खेळू शकणार नाही. बीसीसीआयच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जसप्रीत बुमराह मार्चच्या पहिल्या आठवड्यात पूर्णपणे तंदुरुस्त होईल.
जसप्रीत बुमराह पुनर्वसनासाठी एनसीएमध्ये जाणार आहे. त्याला फ्रॅक्चर नाही परंतु त्याच्या पाठीत थोडी सूज आहे. त्यामुळे एनसीए त्याच्यावर लक्ष ठेवेल. तो तिथे तीन आठवडे राहणार आहे. यानंतरही त्याला त्याच्या तंदुरुस्तीचे मूल्यांकन करण्यासाठी एक किंवा दोन सामने खेळावे लागतील. यासाठी सराव सामने देखील आयोजित केले जाऊ शकतात.
जसप्रीत बुमराह सतत दुखापतीने त्रस्त आहे. यामुळे तो आयसीसीच्या काही प्रमुख स्पर्धांना मुकला आहे. तो 2022 च्या टी-20 वर्ल्ड कपचा भाग नव्हता. याशिवाय, तो 2023 च्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेचा अंतिम सामना खेळू शकला नाही.
मोहम्मद शमी परतला
एकीकडे जसप्रीत बुमराहच्या बाहेर पडण्याच्या बातम्या समोर येत असताना, दुसरीकडे वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी टीम इंडियामध्ये परतला आहे. शुक्रवारी (11 जानेवारी) बीसीसीआयने इंग्लंड टी-20 मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा केली. शमीचे नावही संघात समाविष्ट करण्यात आले. शमी सुमारे 14 महिन्यांनी टीम इंडियामध्ये परतला आहे.












Click it and Unblock the Notifications