महिलांचे अर्धे तिकीट, ज्येष्ठांना मोफत एसटी प्रवास बंद होणार? प्रताप सरनाईक यांनी दिली' ही' अपडेट
महायुती सरकारने महिलांना एसटी प्रवासाच्या तिकीटात ५० टक्के सवलत दिली. शिवाय ७५ वर्षांपुढील सर्व ज्येष्ठांना एसटीचा प्रवास मोफत केला. या दोन्ही योजनांमुळे एसटीने प्रवास करणाऱ्यांची संख्या लक्षणिय वाढली. मात्र या दोन्ही योजनांचा ताण पडू लागल्याने एसटी तोट्यात गेल्याचे सांगितले गेले. गेल्या आठवड्यात परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी या योजनांवर भाष्य करत एसटीचा तोटा उघडपणे व्यक्त केला. त्यानंतर एसटीच्या या दोन्ही लोकप्रिय योजना बंद होतील अशा चर्चा सुरु झाल्या.

काय आहेत योजना?
महिलांना एसटीच्या प्रवास तिकिटामध्ये अर्धी सूट देण्यात आली आहे. तसेच ६५ वर्षांवरील नागरिकांना देखील प्रवास दरात अर्धी सूट मिळते. याशिवाय ज्यांचे वय हे ७५ वर्षांपेक्षा अधिक आहे, अशा ज्येष्ठांना राज्यभरात कुठेही मोफत प्रवास करता येतो. याशिवाय राज्य सरकारने विद्यार्थ्यांनाही पासच्या स्वरुपात सवलत दिली आहे. या सगळ्या योजनांमुळे एसटीला पुन्हा चांगले दिवस आले आहेत. एसटीने प्रवास करणाऱ्यांची संख्या लक्षणीय वाढली आहे.
काय म्हणाले होते मंत्री?
गेल्या आठवड्यात एसटीच्या कारभाराचा लेखाजोखा मांडताना परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी महिलांना अर्धे तिकीट व ज्येष्ठांना मोफत प्रवास या दोन योजनांवर भाष्य केले होते. या दोन्ही योजनांमुळे एसटी तोट्यात असल्याचे त्यांनी सांगितले होते. अर्थात त्यावेळी त्यांनी या योजना सुरु राहतील की बंद होतील याबाबत मात्र काहीही सांगितले नव्हते. मात्र सरकार या दोन्ही लोकप्रिय योजना बंद करेल, अशा चर्चा सुरु झाल्या होत्या.
आता काय म्हणाले सरनाईक?
मंत्री प्रताप सरनाईक यांच्या विधानानंतर एसटीचा मोफत प्रवास बंद होण्याच्या व महिलांच्या अर्ध्या तिकीटाची सवलतही बंद होण्याच्या चर्चा सुरु झाल्या होत्या. विरोधकांनीही यावर चांगलाच समाचार घेतला होता. मात्र त्यानंतर तत्काळ उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोणतीही योजना बंद होणार नसल्याचे स्पष्ट केले होते. आता आज प्रसारमाध्यमांशी बोलनाता मंत्री सरनाईक यांनीही याच विषयावर मोठे भाष्य केले. ते म्हणाले की, मोफत प्रवासाचा निर्णय बंद होणार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे. त्यामुळे आता या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे.












Click it and Unblock the Notifications