सत्तास्थापनेसाठी सर्वात मोठ्या पक्षाला की गटाला मिळेल आमत्रंण?, राष्ट्रपती राजवट लागेल का?,
Maharashtra Assembly Election 2024 : विधानसभा निवडणुकीच्या निकालाला अवघे काही तास उरले आहेत. तत्पूर्वीच दोन्ही बाजूंकडून आपलीच सत्ता येणार असा दावा केला जातोय. त्यामुळे राज्याच्या सत्तासंघर्षात नेहमीप्रमाणे राज्यपालांची भूमिका आता महत्त्वाची ठरणार आहे.
निकाल लागल्यानंतर राज्यपाल सत्तास्थापनेसाठी राज्यातील सर्वात मोठ्या पक्षाला आमंत्रण देणार की सर्वात मोठ्या गटाला? तसेच 26 तारखेच्या आधी जर कुणीही बहुमत सिद्ध करू शकलं नाही तर राज्यात पुन्हा राज्यपाल राजवट लावणार का, या प्रश्नांची उत्तरे घ्या जाणून घ्या, नेमकं काय होणार?

आधी आमदारांची यादी मागविली जाईल?
राज्यात ज्या पक्षाला बहुमत मिळेल त्या पक्षाला पहिल्यांदा सत्तास्थापनेसाठी आमंत्रण दिलं जाईल. तर एका पक्षाला बहुमत मिळालं नाही तर ज्या गटाला बहुमत मिळेल त्याला सत्तास्थापनेसाठी आमंत्रण दिलं जाईल. पण गटाला आमंत्रण देण्यापूर्वी त्यांच्याकडे असलेल्या आमदारांची यादी मागवली जाईल. ती दिल्यानंतर पुढच्या 8 दिवसात बहुमत सिद्ध करण्यास सांगितलं जाऊ शकतं.
राज्यात राज्यपाल राजवट लागणार का?
विधानसभेचा निकाल हा 23 नोव्हेंबरला लागणार आहे. तर विधानसभेची मुदत ही 26 नोव्हेंबर पर्यंत आहे. त्यामुळे ज्याच्याकडे बहुमत असेल त्याला ते सिद्ध करण्यासाठी फक्त तीनच दिवस मिळणार आहेत. परंतु, या तीन दिवसांमध्ये कुणीही सत्तास्थापनेसाठी बहुमत सिद्ध करू शकलं नाही तर विधानसभा विसर्जित होईल आणि राज्यात राज्यपाल राजवट लागू शकते, असे तज्ज्ञांचे मत आहे.
कलम 172 नुसार काय आहे नियम?
मिळालेल्या माहितीनुसार, घटनेच्या कलम 172 नुसार, विधानसभेची पाच वर्षांची मुदत असते ती संपली की विधानसभा आपोआप विसर्जित होते. या विधानसभेची मुदत ही 26 तारखेपर्यंत आहे. त्यामुळे 26 तारखेपर्यंत विधानसभेला आपला नेता निवडावा लागेल. जर कुणालाच बहुमत मिळालं नाही असं राज्यपालांना वाटलं तर 356 कलमाखाली राज्यात राष्ट्रपती राजवट लागू शकते.
...तर सर्वात मोठ्या पक्षाला सत्तास्थापनेसाठी बोलावलं जाईल
दुसरी बाब म्हणजे, कुणालाही बहुमत नसलं तरी सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या गटाला किंवा त्यांच्या नेत्याला राज्यपाल सरकार स्थापनेसाठी बोलावू शकतात. मात्र त्यातून घोडेबाजार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा परिस्थितीत राज्यपालांची भूमिका ही राज्यघटनेला धरून तसेच नैतिकतेच्या बाजूने असणे तितकीच गरजेची असणार आहे, असे मत घटनातज्ज्ञ बापट यांनी व्यक्त केले. ते एका वृत्तवाहिणीशी बोलत होते.












Click it and Unblock the Notifications