मध्यरात्री एकनाथ शिंदे यांना करावे लागले भावनिक आवाहन, वाचा मुंबईत नेमकं काय घडलं..
नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या निकालात महायुतीला स्पष्ट बहुमत प्राप्त मिळाले. आता महायुतीतील तिन्ही पक्षात मुख्यमंत्रीपदावरून लाँबिंग सुरु झाली आहे. शिवसेना आणि भाजपा अशा दोन्ही पक्षाचे नेते, कार्यकर्ते मुख्यमंत्रीपद आपल्याच पक्षाला मिळावे, यासाठी आग्रह करताना दिसत आहेत.
शिंदे यांना पुन्हा मुख्यमंत्रीपद मिळावे यासाठी शिवसेनेचे नेते मैदानात उतरले असून प्रसारमाध्यमांना तशा प्रतिक्रियाही देत आहेत. शिवसेनेच्या काही नेत्यांनी शिवसैनिकांना मुंबईत येण्याचे आवाहन केल्यानंतर असंख्य कार्यकर्ते मुंबईच्या दिशेने रवाना होत आहेत. यातून परिस्थिती चिघळू नये, यासाठी आता एकनाथ शिंदे यांनी स्वतःहून सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत भावनिक आवाहन केले आहे.

नेमकी काय आहे शिंदे यांची पोस्ट?
एकनाथ शिंदे यांनी काल मध्यरात्री एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट शेअर करत भावनिक आवाहन केले. ते म्हणाले, "महायुतीच्या प्रचंड विजयानंतर राज्यात पुन्हा एकदा आपले सरकार स्थापन होणार आहे. महायुती म्हणून आपण एकत्रित निवडणूक लढवली आणि आजही एकत्रच आहोत. माझ्यावरील प्रेमापोटी काही मंडळींनी सर्वांना एकत्र जमण्याचे, मुंबईत येण्याचे आवाहन केले आहे. तुमच्या या प्रेमासाठी मी अत्यंत मनापासून ऋणी आहे. मात्र अशा पद्धतीने माझ्या समर्थनार्थ कुणीही एकत्र येऊ नये, असे आवाहन मी करतो. पुन्हा एकदा माझी नम्र विनंती की शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी वर्षा निवासस्थान किंवा अन्य कुठेही एकत्र जमू नये. समर्थ आणि समृद्ध महाराष्ट्रासाठी महायुती भक्कम होती आहे आणि यापुढेही भक्कमच राहील."
महायुतीच्या प्रचंड विजयानंतर राज्यात पुन्हा एकदा आपले सरकार स्थापन होणार आहे. महायुती म्हणून आपण एकत्रित निवडणूक लढवली आणि आजही एकत्रच आहोत. माझ्यावरील प्रेमापोटी काही मंडळींनी सर्वांना एकत्र जमण्याचे, मुंबईत येण्याचे आवाहन केले आहे. तुमच्या या प्रेमासाठी मी अत्यंत मनापासून ऋणी…
— Eknath Shinde - एकनाथ शिंदे (@mieknathshinde) November 25, 2024
आज संपते विधानसभेची मुदत
१४ व्या विधानसभेची मुदत आज २६ नोव्हेंबरला संपणार आहे. पाच वर्षांपूर्वी २६ नोव्हेंबर २०१९ रोजी ती अस्तित्वात आली होती. त्यामुळे आज मुख्यमंत्रीपदाबाबत निर्णय होऊन शपथविधी होणार का? हा प्रश्न आहे. भाजपाने निवडणुकीत सर्वाधिक १३२ जागा जिंकल्या. त्यामुळे विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाच मुख्यमंत्रीपद मिळावे, यासाठी भाजपाकडून दबाव सुरू आहे. तसेच शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा अजित पवार गटातील नेते आणि कार्यकर्तेही मुख्यमंत्रीपदासाठी आग्रही आहेत.












Click it and Unblock the Notifications