टपका रे टपका..! पुण्यातील टोळीयुद्धात संपलेला आयुष कोमकर कोण?, मामाच्या हत्येचा कोणी घेतला बदला?
Who is Ayush Komkar, Pune Crime News : पुण्यात गेल्या वर्षी झालेल्या राष्ट्रवादीच्या नगरसेवक वनराज आंदेकरच्या हत्येचा सूड घेण्यासाठी त्याच्या भाच्याची गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्याने शहरात पुन्हा एकदा टोळीयुद्धाचा भडका उडाला आहे.
एका वर्षापूर्वी ज्या ठिकाणी आंदेकरची हत्या झाली, त्याच ठिकाणी 20 वर्षीय आयुष कोमकरची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली.
ही घटना शहरातील गुन्हेगारी टोळ्यांमधील वाढता तणाव दर्शवते. या टोळीयुद्धात हकनाक ठार झालेला आयुष कोमकर नेमका कोण आहे, त्याचा या संपूर्ण प्रकरणात का जीव गेला, नेमका कोणी बदला घेतला, जाणून घ्या संपूर्ण कहाणी..!

कोण आहे आयुष कोमकर?
मंगळवारी रात्री नाना पेठ परिसरात ही धक्कादायक घटना घडली. 20 वर्षीय आयुष कोमकर हा क्लासमधून घरी परत येत असताना त्याच्या घराच्या बेसमेंटजवळ अज्ञात हल्लेखोरांनी त्याच्यावर गोळीबार केला, ज्यात त्याचा जागीच मृत्यू झाला.
पोलिसांच्या प्राथमिक तपासात ही हत्या वनराज आंदेकरच्या हत्येचा बदला घेण्यासाठी झाल्याचे स्पष्ट झाले आहे. आयुष कोमकर हा कुख्यात गुंड गणेश कोमकरचा मुलगा होता.
गणेश कोमकर हा वनराज आंदेकरच्या हत्या प्रकरणात मुख्य आरोपी आहे. या घटनेने आंदेकर आणि कोमकर या दोन कुटुंबांमधील जुना वाद पुन्हा एकदा समोर आला आहे.
आंदेकर-कोमकर टोळीयुद्धाची पार्श्वभूमी
आंदेकर आणि कोमकर कुटुंबांमध्ये एका जमिनीच्या वादातून टोळीयुद्ध सुरू झाले. 1 सप्टेंबर 2024 रोजी, वनराज आंदेकरची त्याची सख्खी बहीण संजीवनी कोमकर आणि तिचा पती जयंत कोमकर यांच्यासह 21 आरोपींनी हत्या केली. गणेश कोमकर, जो जयंत कोमकरचा सख्खा भाऊ आहे, तोही या प्रकरणात आरोपी आहे.
वनराज आंदेकरच्या हत्येनंतर त्याच्या अंत्यविधीवेळी आंदेकर टोळीच्या सदस्यांनी 'शस्त्रपूजा' करून बदला घेण्याची शपथ घेतली होती. पोलिसांनी या घटनेनंतर सतर्कता वाढवून बदला घेण्याचा कट उधळला होता.
मात्र, गणेश विसर्जनाच्या आदल्या दिवशी, एका गणेश मंडळाच्या डीजेमध्ये 'टपका रे टपका, एक ओर टपका' हे गाणे वाजत असतानाच आयुषची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. आयुषचा वनराज आंदेकरच्या हत्येत कोणताही संबंध नव्हता, असे पोलिसांच्या तपासात उघड झाले आहे.
या घटनेमुळे पुण्यात पुन्हा एकदा कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. ही हत्या बदला घेण्यासाठी करण्यात आल्याचे स्पष्ट झाले असले तरी, या दोन्ही टोळ्यांमधील वाद शमेल अशी शक्यता दिसत नाही.












Click it and Unblock the Notifications