'त्या' आख्ख्या गावावरच वक्फ बोर्डाचा दावा; लातूर जिल्ह्यातील शेतकरी हवालदिल
Waqf Board Claim on Agricultural Land- भाजपच्या निशाण्यावर असलेले वक्फ बोर्ड आता पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. लातूर जिल्ह्यातील तळेगाव येथील 300 एकर जमिनीवर वक्फ बोर्डाने दावा सांगितला आहे. विशेष म्हणजे ही 300 एकर जमिन सध्या या गावातील 103 शेतकऱ्यांची आहे. वक्फ बोर्डाच्या या दाव्यानंतर या शेतकऱ्यांमध्ये खळबळ उडाली असून, सर्वत्र भितीचे वातावरण पसरले आहे.

वक्फ बोर्डाने पाठविल्या नोटिसा
अहमदपूर तालुक्यातील तळेगाव येथील 103 शेतकऱ्यांच्या 300 एकर जमिनीवर महाराष्ट्र राज्य वक्फ न्यायाधिकरण यांनी औरंगाबादच्या न्यायालयात दावा दाखल केला आहे. त्यानुसार या 103 शेतकऱ्यांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. शिवाय वक्फ न्यायाधिकरणानेही वैयक्तिकरीत्या तळेगावातील 103 शेतकऱ्यांना वक्फ बोर्डाच्या नोटिसा पाठविल्या आहेत. या सर्व शेतकऱ्यांनी एकत्रित येऊन नोटिसला उत्तर दिलं आहे. या जमीनी गेल्या तीन ते चार पिढ्यांपासून आमच्या ताब्यात असल्याचे या शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
शासनाने लक्ष घालण्याची मागणी
तळेगाव हे सुमारे 150 कुटुंबाचे गाव आहे. सर्वजण शेतीवर अवलंबून आहेत. परंतु आता गावातील 75 टक्के जमिनीवर वक्फ बोर्डने दावा सांगितल्यानंतर खळबळ उडाली आहे. गावातील अनेक जण अल्पभूधारक असून ते शेती व मोलमजूरी करुन कुटुंब चालवत आहेत. आता जमीनी गेल्या तर खायचे काय? हा प्रश्न या शेतकऱ्यांसमोर उभा राहिला आहे. या प्रकरणाची येत्या 20 डिसेंबरला सुनावणी होणार आहे. याप्रकरणी शासनाने न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी या गावातील शेतकऱ्यांनी केली आहे.
दीडशे वर्षे वक्फ बोर्ड झोपलं होतं का?
हे शेतकरी गेल्या तीन-चार पिढ्यांपासून या जमीनी कसत आहे. शंभर दीडशे वर्षानंतर आपल्या जमिनी या वक्फ बोर्डाच्या आहेत असा दावा जर कोणी करत असेल तर तो त्यांच्यासाठी धक्काच आहे. कायदेशीर लढाईसाठी गाव सज्ज झाले असले तरी, दीडशे वर्षे वक्फ बोर्ड झोपलं होतं का, हा प्रश्न संपप्त शेतकऱ्यांनी विचारला आहे. आता महायुती सरकारने याबाबत त्वरीत कायदे करुन वक्फ बोर्डाची मनमानी थांबवावी, अशी मागणीही जोर धरु लागली आहे.












Click it and Unblock the Notifications