'जरांगेसमोर फडणवीस सरकार झुकले!' नागपूरमधून 'ओबीसी मोर्चा' चा फडणवीस सरकारला 'हा' मोठा इशारा
Vijay Wadettiwar's Warning at OBC Morcha : 'फडणवीसांचे सरकार ओबीसी समाजाला मुळापासून संपवण्यासाठी जरांगे पाटलांपुढे झुकले आहे,' असा थेट हल्ला चढवत काँग्रेस नेते आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी आज (१० ऑक्टोबर २०२५) नागपूर येथे आयोजित सकल ओबीसी महामोर्चात सरकारला 'शुद्धीवर या, अन्यथा तुमची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही,' असा कठोर इशारा दिला. ओबीसी आरक्षणाच्या लढ्यात मराठा आरक्षणाच्या समावेशावर त्यांनी अत्यंत परखड मत मांडले.

सकल ओबीसी महामोर्चा: विजय वडेट्टीवार यांच्या भाषणातील 5 प्रमुख मुद्दे
१. ओबीसी प्रवर्ग विरुद्ध मराठा जात
वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले की, ओबीसी हा एक प्रवर्ग (Category) आहे, जात नाही. यात मूळ ३७४ जाती धरून सध्या ८७१ जातींचा समावेश आहे. याउलट मराठा ही एक जात (Caste) आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे, अशी भूमिका आमची आजही आहे, पण ते ओबीसीच्या २७% आरक्षणातून नसावे.
२. आरक्षणातील विषम वाटप आणि 'चाणक्य नीती'चा आरोप
वडेट्टीवार आरक्षणाच्या वाटपावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ते म्हणाले, "देशात ५२% लोकसंख्या असलेल्या ओबीसी, एस.सी., एस.टी. समाजाला केवळ ५२% आरक्षण, तर १५% लोकसंख्या असलेल्यांना ४८% आरक्षण... ही चाणक्य नीती आहे." सरकार ओबीसीवर अतिक्रमण करून आरक्षण रद्द करण्यासाठी समाजात भांडण लावण्याचे काम करत आहे, असा गंभीर आरोप त्यांनी केला.
३. 'घुसखोरी'मुळे ओबीसी युवकांचे नुकसान
वडेट्टीवार यांनी मनोज जरांगे-पाटील यांच्या आंदोलनाचा संदर्भ देत, मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यास आपला विरोध नसल्याचे स्पष्ट केले. मात्र, शिंदे समिती नेमल्यानंतर मराठवाड्यात दोन वर्षांत २ लाख ४१ हजार प्रमाणपत्रे वाटली गेली. त्यामुळे पूर्ण मराठा समाज ओबीसीत आला, तर ओरिजिनल ओबीसी तरुणांना नोकरीत संधी मिळणार नाही. मराठा समाजाने ओबीसीमध्ये घुसखोरी करून, ओबीसीच्या हक्कावर सूरी चालवण्याचे काम हे सरकार करत आहे, अशी टीका त्यांनी केली.
४. कट-ऑफ आकडेवारी आणि नोकरीतील स्पर्धा
वडेट्टीवार यांनी आकडेवारी देत ओबीसीतील तीव्र स्पर्धेवर लक्ष वेधले. एमपीएससीमध्ये ओबीसीचा कट-ऑफ ४८५ पर्यंत जातो, तर दुसऱ्या एका प्रवर्गाचा कट-ऑफ ४५० पर्यंत असतो. "साडेआठ टक्के नोकरी मिळत आहे, तिथेही कट-ऑफ लक्षात घेतला, तर ओबीसीमध्ये किती स्पर्धा आहे?" असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
५. सहकार मंत्र्यांवर टीका
वडेट्टीवार यांनी सहकार मंत्र्यांवर (आबासाहेब पाटील) टीका केली, ज्यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवर बोलताना 'निवडून येण्यासाठी आश्वासनं देतो, ती पूर्ण करण्यासाठी नसतात,' असे विधान केले होते. यावर प्रत्युत्तर देत वडेट्टीवार म्हणाले, "अरे शहाण्या, तुझी शेतकऱ्याच्या बांधांवर जिरवल्याशिवाय राहणार नाही." तसेच, त्यांनी फडणवीस सरकारला इशारा दिला की, त्यांनी जरांगेपुढे झुकून ओबीसी समाजाला मुळापासून संपवण्याचे षडयंत्र थांबवावे, अन्यथा त्यांना त्यांची जागा दाखवली जाईल.












Click it and Unblock the Notifications