"तलवारी घेऊन आमच्या माना छाटा म्हणजे जरांगेंचं समाधान होईल!" ; आरक्षणावरून वडेट्टीवार यांचा संताप
Vijay Wadettiwar accuses Manoj Jarange : महाराष्ट्रातील आरक्षणाच्या प्रश्नावरून सध्या राजकीय वातावरण कमालीचे तापले आहे. मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या आक्रमक भूमिकेमुळे निर्माण झालेल्या दबावामुळे ओबीसी समाज चिंतेत आहे. याच पार्श्वभूमीवर काँग्रेसचे नेते आणि ओबीसी समाजाचे प्रतिनिधी विजय वडेट्टीवार यांनी अत्यंत संतप्त आणि थेट प्रतिक्रिया दिली आहे.
"एकाच समाजाला सर्व काही पाहिजे. EWS, ओबीसी आणि SEBC मधूनही आरक्षण पाहिजे," असा आरोप करत त्यांनी मनोज जरांगे पाटील यांना थेट आव्हान दिले आहे. ओबीसी समाजाचा गळा घोटला जात असल्याच्या भावना व्यक्त करत, त्यांनी सत्ता आणि ताकदीच्या जोरावर ओबीसींना धमकावले जात असल्याचा गंभीर आरोप केला आहे.

'एकाच समाजाला सर्व काही पाहिजे, मग इतरांनी जगायचे का?'
विजय वडेट्टीवार यांनी मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीवर टीका करताना, त्यांच्याकडून एकाचवेळी अनेक मागण्या केल्या जात असल्याबद्दल संताप व्यक्त केला.
ते म्हणाले की, "एकाच समाजाला सर्व काही पाहिजे. EWS पाहिजे, ओबीसी पाहिजे, आणि एसईबीसीमधून पाहिजेत. त्यांना सारथी-मधून फायदा पाहिजे, महाज्योतीमधूनही फायदा पाहिजे. मग बाकीच्यांनी जगायचे का नाही?"
वडेट्टीवार यांनी जरांगे पाटलांना थेट आव्हान देत म्हटले, "जरांगे पाटील यांना सांगून टाका ३७४ जातीच्या लोकांना तुझ्या ताकदीच्या भरवशावर समुद्रात बुडवून मारून टाकावे. ही जी सत्तेची दादागिरी आहे, ती बरोबर नाही."
#LIVE : सकल ओबीसी महामोर्चा। पत्रकार परिषद। नागपूर https://t.co/q8hLNuNlRj
— Vijay Wadettiwar (@VijayWadettiwar) October 5, 2025
"तलवारी घेऊन आमच्या माना छाटा"
ओबीसी समाजाला धमकावले जात असल्याचा आरोप करताना वडेट्टीवार अधिक संतप्त झाले. त्यांनी मराठा समाजाच्या कथित 'दादागिरी'ला थेट प्रत्युत्तर दिले.
वडेट्टीवार म्हणाले की, "मनोज जरांगे यांनी आम्हा ओबीसीमधील ३७४ जातींच्या लोकांना संपवून टाक म्हणावे, मारून टाका म्हणावे, गळा घोटून. आमच्या ओबीसींच्या १२ लोकांनी (आरक्षणाच्या मुद्द्यावर) आत्महत्या केल्या आहेत."
मराठा समाज मोठा आहे म्हणून त्यांच्या ताकदीच्या भरवशावर जर ओबीसींना धमकावत असेल, तर "घ्या बंदुका, ताकद आहे ना? तलवारी घेऊन माना छाटून टाका आमच्या, म्हणजे त्यांना समाधान होईल," अशा अत्यंत कठोर शब्दांत त्यांनी आपला संताप व्यक्त केला.
'अन्यायकारक जीआर रद्द करावा' - ओबीसी नेत्यांची मागणी
राज्य सरकारने नुकत्याच बोलावलेल्या बैठकीतही ओबीसी समाजाचा गळा घोटण्याचे काम सुरू असल्याचे वडेट्टीवार यांनी सांगितले. ते म्हणाले की, "सरकार मनोज जरांगे पाटील यांच्या दबावात ओबीसी समाजाचा गळा घोटात आहे." कालच्या बैठकीत ओबीसी नेत्यांना अपेक्षा होती की, ओबीसींवर अन्याय करणारा जीआर (शासन निर्णय) सरकार रद्द करेल.
परंतु, २ ऑक्टोबरचा जीआर असंवैधानिक आणि ओबीसी समाजावर अन्याय करणारा असल्याने तो रद्द करण्याची सगळ्यांची प्रमुख मागणी होती. या बैठकीत उपस्थित असलेल्या ५० ओबीसी प्रतिनिधींनी एकमुखाने हीच मागणी केली होती, असे त्यांनी स्पष्ट केले.
वडेट्टीवारांच्या विधानांवर जरांगे पाटलांचे प्रत्युत्तर
विजय वडेट्टीवार यांच्या संतप्त विधानांवर मनोज जरांगे पाटील यांनीही लगेच प्रतिक्रिया दिली. जरांगे म्हणाले की, वडेट्टीवार यांच्याकडून 'चुकीचे स्टेटमेंट' जाऊ लागले आहेत.
जरांगे पाटील यांनी वडेट्टीवार यांना सल्ला देत म्हटले: "समाजात दुही निर्माण होईल असे पाऊल वडेट्टीवार यांनी उचलू नये." त्यांनी विरोधी पक्षनेता राहिलेल्या व्यक्तीने "जरांगे पाटील यांच्या हाती बंदूक देऊन ओबीसी समाजाला मारा" असे बोलणे योग्य नसल्याचे सांगितले. "इतका पश्चात्ताप करण्यापेक्षा वडेट्टीवार यांनी गोरगरीब मराठ्यांच्या लेकरांचा तळतळाट घेऊ नये," असे म्हणत त्यांनी वडेट्टीवार यांच्या भूमिकेवर टीका केली.
ओबीसी आणि मराठा या दोन्ही समाजाच्या नेत्यांमध्ये सुरू असलेले हे शाब्दिक युद्ध राज्याच्या सामाजिक सलोख्यासाठी कितपत घातक ठरू शकते, असे तुम्हाला वाटते?












Click it and Unblock the Notifications