राज्यात पावसाचं प्रमाण का कमी झालं? आज कुठे पडणार पाऊस, जाणून घ्या तुमच्या जिल्ह्यातील अंदाज
गेल्या काही दिवसांपासून सतत कोसळणाऱ्या पावसानंतर राज्यातील अनेक भागांमध्ये काहीशी उसंत मिळालेली असताना, विदर्भासाठी मात्र हवामान खात्यानं पुन्हा एकदा इशारा दिला आहे. मुंबई आणि उपनगरांमध्ये गेल्या 24 तासांत पावसाने विश्रांती घेतली असून, कोकणातही काही ठिकाणी आकाश निरभ्र झाल्याचे चित्र आहे. मात्र पूर्व विदर्भात अजूनही पावसाचा जोर कायम राहणार आहे.

विदर्भात ऑरेंज अलर्ट, वादळी वाऱ्यांची शक्यता
हवामान विभागाने नागपूर, गोंदिया, भंडारा, गडचिरोली आणि चंद्रपूर या जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. या भागांमध्ये दुपारनंतर वादळी वाऱ्यांसह विजांच्या कडकडाटासोबत जोरदार पावसाची शक्यता आहे. बुलढाणा, अकोला, अमरावती, वाशिम आणि यवतमाळ या पश्चिम विदर्भातील जिल्ह्यांमध्येही मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
दरम्यान, पुणे, रायगड, चंद्रपूर आणि नाशिकच्या घाटमाथ्यावरही आज ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. संबंधित प्रशासन व नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
राज्यात इतर ठिकाणी पावसात घट, का झाली विश्रांती?
राज्यातील पावसाचे प्रमाण कमी होण्यामागे हवामान विभागाने दिलेलं कारण म्हणजे कमी दाबाचा पट्टा सध्या कमजोर झालेला आहे. अरबी समुद्र आणि किनारपट्टीवर सक्रिय असलेला कमी दाबाचा पट्टा आता मागे सरकला असून, त्यामुळे कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मुंबईत पावसात काहीशी विश्रांती मिळत आहे.
तथापि, बंगालच्या उपसागरापासून राजस्थानपर्यंत कमी दाबाचा एक नवीन पट्टा ईशान्य दिशेला सक्रिय असल्याने, विदर्भ आणि मराठवाडा या भागांमध्ये अजून काही दिवस पावसाची उपस्थिती राहणार आहे.
पुढील 4-5 दिवस हवामान कसं राहणार?
ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ के.एस. होसाळीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुढील 4 ते 5 दिवस विदर्भ, कोकण आणि घाटमाथ्याच्या काही भागांमध्ये मध्यम ते जोरदार पावसाच्या सरी पडण्याची शक्यता आहे. मात्र मुसळधार पावसाचा धोका फारसा नाही. मुंबई आणि ठाणे परिसरात अधूनमधून हलक्या सरी व मध्यम पावसासह ऊन-सावलीच्या खेळाचे वातावरण राहील, असं त्यांनी स्पष्ट केलं आहे.












Click it and Unblock the Notifications