वडेट्टीवारांच्या गंभीर आरोपांना अमोल कोल्हे, संजय राऊतांचं थेट उत्तर; मविआ फुटण्याच्या मार्गावर?
जागावाटपाच्या प्रक्रियेला २० दिवस लांबविण्यात आल्याचा आरोप काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी केल्यानंतर त्या आरोपाला शिवसेनेचे खा. संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिले. महाविकास आघाडीच्या एकमेकांवरील वादामुळे महाराष्ट्रात महाविकास आघाडीत फुटल्याची भिती व्यक्त केली जात आहे. आज खा. संजय राऊत यांनीही जागावाटपास उशीर झाल्याचे मान्य करत महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा खळबळ उडवून दिली.

काय म्हणाले राऊत?
संजय राऊत म्हणाले, "जागावाटपाची प्रक्रिया ज्या पद्धतीने लांबली गेली, त्याची गरज नव्हती. जागावाटप का व कुणामुळे लांबले, हे बहुतेक विजय वडेट्टीवार यांना माहीत असेल. फॉर्म भरण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत जागा वाटप संपलेलं नव्हतं हे सत्य आहे. कोणत्याही आघाडीत जागा वाटप इतक्या विलंबाने झालं तर अस्वस्थतता पसरते. कार्यकर्त्यांना काम करायला वेळ मिळत नाही" असं संजय राऊत म्हणाले.
काय होता वडेट्टीवारांचा आरोप?
काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी मीडियाशी बोलताना आज महाविकास आघाडीवर गंभीर आरोप केले. विधानसभा निवडणुकीत जागा वाटपात जो विलंब लागला, त्यामागे काही कारस्थान आहे का? असा संशयही त्यांनी व्यक्त केला. त्यावर संजय राऊत यांनी उत्तर दिलं. याशिवाय शरद पवार गटाचे खा. अमोल कोल्हे यांनीही वडेट्टीवारांच्या आऱोपानंतर काँग्रेस व शिवसेना ठाकरे गटावर आरोप केले. हे सगळे आरोप पाहता आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत महाविकास आघाडी एकत्र दिसणार नाही, अशा चर्चा रंगल्या आहेत.
राऊतांनी दिलं उदाहरण
वडेट्टीवारांच्या आरोपाला उत्तर देताना संजय राऊत यांनी उदाहरणच दिलं. ते म्हणाले, "चंद्रपूरला किशोर जोरगेवार हे अपक्ष आमदार होते. ते शरद पवारांकडून लढायला तयार होते. त्यांनी तसं पत्र दिलं होतं. ती जिंकणारी जागा होती. मात्र त्या जागेवर काँग्रेसने 17 दिवस घोळ घातला. ती जागा राष्ट्रवादीला मिळाली नाही. त्यानंतर किशोर जोरगेवार भाजपात गेले आणि विजयी झाले. अशा अनेक जागा आहेत, जेथे काँग्रेसने हट्ट सोडला नाही." असा थेट आरोप संजय राऊत यांनी केला.












Click it and Unblock the Notifications