सोडणार नाही... रक्षा खडसेंच्या मुलीच्या छेडछाडीनंतर देवेंद्र फडणवीस आक्रमक, POCSO दाखल
केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीचा छेडछाड करण्याच्या प्रकारानंतर महाराष्ट्रात एकच खळबळ उडाली. जळगाव जिल्ह्यातील यात्रेत हा प्रकार घडला. या प्रकारानंतर स्वतः मंत्री खडसे यांनी मुलीसोबत पोलिसांत जात गुन्हा दाखल केला. या प्रकारानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही आक्रमक भूमिका स्पष्ट केली. या गंभीर प्रकरणात कुणालाही सोडणार नाही, असा थेट दम त्यांनी भरला.

नेमके काय होते प्रकरण?
२८ फेब्रुवारीला मुक्ताईनगर तालुक्यातील कोथळी गावात यात्रा होती. मुक्ताईनगर शहरातील अनिकेत घुई आणि त्याचे ६ मित्र यात्रेत होते. अनिकेत घुई आणि त्याच्या मित्रांनी तीन-चार मुलींचा पाठलाग केला. त्यांचा विनयभंग केला. या मुलींमध्ये मंत्री रक्षा खडसे यांची मुलगीही होती. त्यानंतर खडसे या स्वतः मुलीसोबत पोलिस स्टेशनला गेल्या व तक्रार दाखल केली.
कोणते केले गुन्हे दाखल?
पोलिसांनी पाठलाग, विनयभंग आणि POCSO कायद्याअंतर्गत तसेच आयटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला. एका आरोपीला अटक करण्यात आली. उर्वरित आरोपींना पकडण्यासाठी तीन पथके रवाना करण्यात आली आहेत. पोलिस कोणाच्याही दबावाखाली नसल्याचे उपअधीक्षकांनी सांगितले.
रक्षा खडसे काय म्हणाल्या?
केंद्रीय मंत्री आणि भाजप नेत्या रक्षा खडसे यांनी रविवारी काही मुलांविरुद्ध तक्रार दाखल केली. त्या म्हणाल्या की, दरवर्षी महाशिवरात्रीनिमित्त या परिसरात संत मुक्ताई यात्रा आयोजित केली जाते. माझी मुलगी दोन दिवसांपूर्वी सहलीला गेली होती. काही तरुणांनी तिला त्रास दिला. मी त्यांच्याविरुद्ध तक्रार देण्यासाठी पोलिस स्टेशनमध्ये गेले. एका सूत्रानुसार, आरोपींपैकी काहींची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे. त्यातील काही तरुण हे शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्याशी जोडलेले आहेत.
काय म्हणाले मुख्यमंत्री?
या घटनेवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही प्रतिक्रिया दिली. महाडमध्ये बोलताना फडणवीस म्हणाले की, आरोपींना सोडले जाणार नाही. एका पक्षाचे काही पदाधिकारी आहेत ज्यांनी हे केले आहे. हे एक घृणास्पद कृत्य आहे, पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे आणि काही लोकांना अटकही करण्यात आली आहे. त्यांना माफ करता येणार नाही आणि त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल.












Click it and Unblock the Notifications