"आरक्षण देतो म्हणून शड्डू ठोकणारे आता गावाला पळाले का?" उद्धव ठाकरेंनी कुणाला सुनावलं?
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आंदोलन सुरू केले आहे. लाखो मराठा आंदोलकांसह ते मुंबईतील आझाद मैदानावर दाखल झाले असून, त्यांनी उपोषणाचे हत्यार उपसले आहे. याच मुद्द्यावरून उद्धव ठाकरे यांनी नाव न घेता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. "आरक्षण देतो म्हणून शड्डू ठोकणारे आता गावाला पळाले का?" असा सवाल त्यांनी केला.

पत्रकार परिषदेत बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, मराठी माणूस आपल्या हक्कांसाठी मुंबईत येणार नाही, तर कुठे सुरत किंवा गुवाहाटीला जाणार का? त्यांनी अप्रत्यक्षपणे शिंदे गटाच्या बंडाळीचा संदर्भ देत सरकारवर टीका केली.
"आमचं सरकार पाडून तुमचं सरकार कशासाठी आणलात?"
उद्धव ठाकरे यांनी मराठा समाजाच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवत सरकारवर हल्लाबोल केला. "मराठा समाजाला नाइलाजाने त्यांच्या हक्कांसाठी मुंबईत यावे लागले आहे. याआधी देवेंद्र फडणवीस म्हणाले होते की, त्यांचे सरकार असते तर त्यांनी न्याय दिला असता. दुसरे एक आहेत, ज्यांनी शिवाजी महाराजांची शपथ घेतली होती. आता हेच लोक सत्तेत आहेत, मग त्यांनी मराठा समाजाला आरक्षण का दिले नाही?" असा प्रश्न त्यांनी विचारला. "आमचं सरकार पाडून तुमचं सरकार तुम्ही कशासाठी आणलात?" असे म्हणत त्यांनी सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला.
सरकारने जबाबदारी घ्यावी
उद्धव ठाकरे पुढे म्हणाले की, आतापर्यंत मराठा समाजाला फक्त वापरून फेकले गेले आहे. आताचे सरकार या समाजाला न्याय देईल अशी अपेक्षा आहे. ते म्हणाले की, गणेशोत्सवाच्या काळात जे मराठा बांधव मुंबईत आले आहेत, ते दंगल करण्यासाठी नाही, तर आपल्या हक्कांसाठी आले आहेत. त्यामुळे सरकारने त्यांच्या मागण्यांची जबाबदारी घेऊन तोडगा काढला पाहिजे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधत ते म्हणाले, "जे लोक अडीच वर्षे मुख्यमंत्री होते आणि आता अडीच वर्षे उपमुख्यमंत्री आहेत, ते जरांगेंना न्याय का देऊ शकत नाहीत? फक्त टोलवाटोलवी सुरू आहे."












Click it and Unblock the Notifications