मुंबई हातातून गेल्यानंतर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले- भाजप कागदी पक्ष, घाणेरड्या..
Uddhav Thackeray attack on BJP over Manpa Election 2026 : राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निकालानंतर राजकारण पूर्णपणे ढवळून निघाले आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज पत्रकार परिषद घेत सत्ताधारी महायुतीवर घणाघाती टीका केली. "सत्ताधाऱ्यांनी या निवडणुका अत्यंत घाणेरड्या पद्धतीने लढवल्या, पण तरीही शिवशक्तीने दिलेल्या लढ्याने त्यांना घाम फोडला आहे," अशा शब्दांत त्यांनी आपला संताप व्यक्त केला.

'साम-दाम-दंड-भेद' आणि गुंडागर्दीचा वापर
उद्धव ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांवर निवडणुकीत सत्तेचा गैरवापर केल्याचा गंभीर आरोप केला. ते म्हणाले की, ही निवडणूक लोकशाही मार्गाने नाही तर 'जीवन-मरणाचा प्रश्न' असल्यासारखी साम, दाम, दंड आणि भेदाचा वापर करून लढवली गेली. शिवसैनिकांना तडीपारीच्या नोटिसा देणे, अटक करणे आणि उमेदवारांना धमकावून अर्ज मागे घ्यायला लावणे, असे प्रकार घडल्याचे त्यांनी सांगितले. ठाण्यासारख्या ठिकाणी उमेदवारांना पैशांचे आमिष दाखवण्यात आले. या सर्व गुंडागर्दीला न घाबरता लढणाऱ्या उमेदवारांचे ठाकरे यांनी 'लोकशाहीचे रक्षक' म्हणून कौतुक केले.
"रिकाम्या खुर्च्यांनी मतदान केले का?"
मुंबईतील निकालावर भाष्य करताना उद्धव ठाकरेंनी महायुतीच्या सभांमधील गर्दीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. "आमच्या शिवाजी पार्कवरील सभेला जनसागर लोटला होता, तर दुसऱ्या दिवशी महायुतीच्या सभेला गर्दी नव्हती. मग त्यांना मतदान कोणी केले? खुर्च्यांनी त्यांना मतदान केले का?" असा खोचक सवाल त्यांनी विचारला. जरी मुंबईत महापौराचा आकडा थोडक्यात हुकला असला, तरी शिवसेनेच्या यशाने सत्ताधाऱ्यांची झोप उडवली आहे, असेही ते म्हणाले.
भ्रष्टाचाराचा पैसा आणि केंद्रीय यंत्रणांचे मौन
निवडणुकीतील पैशांच्या वारेमाप वाटपावर ठाकरे यांनी थेट पंतप्रधान मोदी आणि केंद्रीय यंत्रणांना लक्ष्य केले. गेल्या चार वर्षांपासून विकासनिधीच्या नावाखाली आमदारांना आणि नगरसेवकांना अमाप पैसा वाटण्यात आला. निवडणुकीच्या तोंडावर साड्या आणि मिक्सर वाटून मतदारांना भुलवण्याचा प्रयत्न झाला. "हा अमाप पैसा येतो कुठून? ईडी, सीबीआय आणि आयकर विभाग या पैशाच्या स्त्रोताची चौकशी का करत नाही?" असा सवाल त्यांनी उपस्थित केला. तसेच २०१५ च्या नोटबंदीच्या अपयशावरही त्यांनी टोला लगावला.
"भाजप कागदावर, शिवसेना जमिनीवर"
भाजपवर हल्ला चढवताना उद्धव ठाकरे म्हणाले की, भाजपने निवडणूक आयोग आणि तांत्रिक बाबींचा वापर करून 'कागदावर' शिवसेना संपवली असेल, पण प्रत्यक्ष जमिनीवर शिवसेना आजही भक्कम आहे. "भाजप जमिनीवर असता तर त्यांना दुसऱ्यांचे पक्ष फोडावे लागले नसते, यंत्रणेचा दुरुपयोग करावा लागला नसता किंवा नियम बदलावे लागले नसते. भाजप हा केवळ कागदावरचा पक्ष उरला आहे," असे त्यांनी ठणकावून सांगितले.
शिवसैनिक आणि मतदारांचे मानले आभार
प्रतिकूल परिस्थितीतही चंद्रपूर आणि परभणीसह विविध महापालिकांमध्ये शिवसेनेने मिळवलेल्या यशाबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. ज्या ठिकाणी ते प्रचाराला जाऊ शकले नाहीत, त्या ठिकाणच्या मतदारांची त्यांनी दिलगिरी व्यक्त केली आणि 'शिवशक्ती' युतीवर विश्वास ठेवल्याबद्दल जनतेचे आभार मानले.












Click it and Unblock the Notifications