अक्षय शिंदेंला गोळ्या घालून मारणं म्हणजे सहज मरण दिलं; त्याला तुडवून मारले पाहिजे होते - उदयनराजे
Udayanraje Bhosle reacts on Akshay Shinde encounter : बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदे याचा काल पोलिसांनी एन्काऊंटर केला. या घटनेवर विरोधकांनी टीका केली. तर दुसरीकडे सत्ताधाऱ्यांनी पोलिसांची बाजू धरली. अशातच या एन्काऊंटरवर साताऱ्याचे भाजप खासदार उदयनराजे भोसले यांनी आक्रमक होत प्रतिक्रिया दिली आहे. या प्रकरणातील गुन्हेगाराला फार सहज मरण दिले, त्याला तुडवून मारण्याची गरज होती. विरोधी पक्षांनी या प्रकरणी घेतलेल्या भूमिकेवर देखील त्यांनी निशाणा साधला.

अशांना तर तुडवून मारले पाहिजे
उदयनराजे भोसले हे माध्यमांशी बोलत होते, ते म्हणाले की, मला सत्ताधारी किंवा विरोधक यांच्याशी काहीही देणेघेणे नाही.त्यांच्या कुटुंबासोबत हा प्रकार घडला असता तर त्यांनी काय केले असते? अत्याचार झालेल्या मुलीच्या कुटुंबाला ज्या परिस्थितीला सामोरे जावे लागते, त्या कुटुंबाच्या जागेवर मी स्वतःला ठेवून बोलत असतो.
या घटनेतील आरोपीला गोळ्या घालून मारणे हे अतिशय सहज मरण झाले. अशा लोकांना जनतेत सोडले पाहिजे. त्यानंतर जनतेने त्यांना तुडवून मारले पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळात जी न्यायव्यवस्था होती त्या प्रकारची न्यायव्यवस्था आज झाली पाहिजे. त्यासाठी सरकारने कायद्यात योग्य तो बदल करावा. बलात्कार केला की सरळ लोकांपुढे आरोपीला फाशी द्या.
एन्काऊंटरचा होणार CID तपास
दुसरीकडे, अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरचा तपास मंगळवारी सीआयडीकडे वर्ग करण्यात आला. ठाणे क्राईम ब्रॅन्चच्या पोलिसांनी सोमवारी सायंकाळी आरोपी अक्षय शिंदेचे एन्काऊंटर केले होते. पोलिस आरोपी अक्षय शिंदेला तळोजा कारागृहातून बदलापूरला घेऊन जात होते. रस्त्यात त्याने पोलिसांचे पिस्तूल हिसकावून घेत गोळीबार केला. त्यानंतर प्रत्युत्तरादाखल करण्यात आलेल्या कारवाईत तो मारला गेला.
या घटनेनंतर अक्षय शिंदेच्या पालकांनी पोलिसांवर संशय व्यक्त केला आहे. अक्षयला पोलिस कोठडीत बेदम मारहाण करण्यात आली होती. त्यानंतर हे प्रकरण दाबण्यासाठी त्याचे एन्काऊंटर करण्यात आले. आम्हाला त्याचा मृतदेहही पाहू देण्यात आला नाही, असे ते म्हणाले. दरम्यान, विरोधकांनीही अक्षयच्या हातात बेड्या होत्या, तर मग त्याने गोळीबार कसा केला? असा सवाल उपस्थित केला आहे.
सुषमा अंधारेंनी उपस्थित केले पाच सवाल
अक्षय शिंदेने शाळा प्रशासनावर काही गंभीर खुलासे केले होते, ते उजेडात येऊ नये यासाठी एन्काऊंटर करण्यात आलं असा आरोप खासदार संजय राऊत यांनी केलाय, तर या सर्व प्रकरणावर सुषमा अंधारेंनी पाच सवाल उपस्थित केलेत. अक्षय शिंदेने पिस्तूलचं लॉक कसं काढलं? अक्षय शिंदेला तळोजामधून बदलापूरला न्यायचं होतं मग गाडी मुंब्राकडे का नेली? यामध्ये कुणाला वाचवलं जातंय याची चौकशी व्हावी, ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारेंनी सवाल केला आहे.












Click it and Unblock the Notifications