रवींद्र वायकरांना क्लिनचीट, ठाकरे गट व काँग्रेसचा भाजपवर हल्लाबोल
मुंबई : नवनिर्वाचित खासदार रवींद्र वायकर यांना जोगेश्वरी भूखंड घोटाळा प्रकरणी मुंबई पोलिसांकडून क्लीनचीट देण्यात आली. गैरसमजातून मुंबई महानगरपालिकेने गुन्हा दाखल केल्याचे मुंबई पोलिसांनी म्हटले आहे. यावरून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आणि काँग्रेसने आक्रमक होत, सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

जोगेश्वरी भूखंड घोटाळा प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेकडून (EOW) न्यायालयात 'सी समरी रिपोर्ट' दाखल करण्यात आला. या अहवालात मुंबई महापालिकेने वायकरांच्या विरोधात गैरसमजातून गुन्हा दाखल केल्याचं मुंबई पोलिसांनी म्हटलं आहे. तसंच रवींद्र वायकरांविरोधातले गुन्हे मागे घेतल्याचीही माहिती आहे. या प्रकारानंतर शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेसही आक्रमक झाली.
दाऊदलाही क्लिनचीट द्या...
या प्रकरणावर शिवसेना नेते संजय राऊत आक्रमक झाले. ते म्हणाले की, आता फक्त दाऊद इब्राहिमलाच क्लीनचीट द्यायचे बाकी आहे. हे सरकार ओवाळून टाकलेले सर्व भ्रष्टाचारी आपल्या पक्षात घेत आहेत. सगळ्या लोकांवरती कारवाई केली. ईडी, सीबीआयचे खटले दाखल केले. त्यात वायकरांचाही समावेश आहे. वायकर ईडी, सीबीआयला घाबरून पळून गेले. आता त्यांना क्लीनचीट देण्यात आली. मोदी आणि महाराष्ट्रातील फडणवीसांच्या सरकारमध्ये दुसरे काय होऊ शकते, अशी टीका त्यांनी केली आहे.
सोमय्या व भाजपलाही धुतले
संजय राऊत पुढे म्हणाले की, भीती दाखवून भाजपने पक्ष वाढवलाय, हे आता मान्य करावे. आमच्यासारखे काही लोकं दबावाला बळी पडले नाहीत. अजित पवार पळून गेले, मुख्यमंत्री पळून गेले, त्यांना कारवाईची भीती होती. वायकरांवरील गुन्हे मागे घेतले आता आमच्यावरील गुन्हेही मागे घ्या. किरीट सोमय्या फडतूस माणूस आहे.
गैरसमजातून मुंबई महानगरपालिकेने गुन्हा दाखल केल्याचे लोकांना तुरुंगात जावे लागले. पोलीस, EOW गैरसमजातून गुन्हा दाखल करू शकतात का? EWO च्या प्रमुखांवर खटला दाखल केला पाहिजे, असे आव्हानही त्यांनी यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले.
काँग्रेसचा 'वॉशिंग मशीन' म्हणत हल्लाबोल
काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी आपल्या सोशल मिडिया अकाऊंटवर पोस्ट लिहून राजकीय ब्लॅकमेलिंगचं आणखी एक उदाहरण म्हणजेच रवींद्र वायकर असं म्हटलं आहे. पोस्टमध्ये त्यांनी लिहिलय की, किरीट सोमय्यांनी आरोप करायचे.. तक्रार करायची....मग तपास यंत्रणांचा ससेमिरा नंतर कुटुंबातील सदस्यांचा भयंकर छळ करुन भयभीत करायचे, मग भाजपाकडून पक्षात यायचा प्रस्ताव अन्यथा अजून छळाची धमकी, मग भाजपात किंवा भाजपाच्या सहकारी पक्षात पक्षप्रवेश नंतर यंत्रणांकडून क्लीन चिट.
महाराष्ट्राचे राजकारण अत्यंत खालच्या स्तरावर नेण्याचे पातक भाजपाने केलं आहे. किरीट सोमय्या या व्यक्तीमत्वाने राजकारण कलंकित केलं आहे. जनतेने लोकसभा निवडणुकीत बऱ्यापैकी सफाई केली. परंतु अजूनही ती अर्धवट अवस्थेत आहे. विधानसभा निवडणुकीत या हीन राजकारणाचा व वॉशिंग मशीनचा अंत जनतेच्या राजकारणाच्या सफाई अभियानातून होईल.












Click it and Unblock the Notifications