महिलांचा मतांचा टक्का वाढला... फायदा कुणाला? महायुती की महाविकास आघाडी?
Maharashtra Assembly Election 2024- महाराष्ट्र विधानसभेसाठी काल म्हणजेच बुधवारी निवडणूक प्रक्रिया पार पडली. या निवडणुकीचा निकाल शनिवारी लागणार आहे. मात्र सध्या गेल्यावेळीपेक्षा जास्त मतदान झाल्याने हे वाढलेले मतदान नेमके कुणाच्या पथ्यावर पडणार, याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रात 61.4 टक्के मतदान झाले होते. यावेळी महाराष्ट्रात 65. 02 टक्के मतदान झाल्याचं सांगण्यात आले आहे. गेल्या निवडणुकीच्या तुलनेत यंदा चार ते पाच टक्क्यांनी मतदान वाढल्याने हा वाढलेला टक्का कुणाच्या पथ्यावर पडणार? या चर्चा सध्या रंगल्या आहेत.

महिलांचे मतदान ठरणार निर्णायक
यंदाच्या निवडणुकीत प्रत्येक विधानसभेत महिलांनी उत्स्फूर्त मतदान केल्याचं दिसलं. गेल्यावेळीपेक्षा यावेळी महिलांच्या मतांचा टक्काही वाढला. हाच महिलांचा वाढलेला टक्का कुणाचा..? याची तर्क सध्या बांधले जात आहे. या निवडणुकीत महायुतीने लाडकी बहीण योजनेवर मते मागितली. महिलांना दिल्या जाणाऱ्या दीड हजार रुपये मानधनात वाढ करुन डिसेंबरपासून एकवीसशे रुपये देण्याचं आश्वासन महायुतीने दिलं होतं. दुसरीकडे महाविकास आघाडीनेही महालक्ष्मी योजनेची घोषणा करत महिलांना तीन हजार रुपये महिना देण्याचे आश्वासन दिले होते. त्यामुळे महिला मतदारांनी कुणाच्या पारड्यात आपलं मत टाकलं? हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.
नवमतदारही ठरणार महत्त्वाचे
या निवडणुकीत नवमतदारांनीही उत्स्फूर्त मतदान केलं. महायुतीने तरुणांच्या हाताला काम देण्याचा शब्द देतानाच लाडका भाऊ, विश्वकर्मा आदी योजनांवर मते मागितली. विरोधात महाविकास आघाडीने त्यांच्या घोषणापत्रात तरुणांना आकर्षित करणाऱ्या योजना मांडल्या होत्या. महाराष्ट्रात सुरु असणारे मराठा- ओबीसी आंदोलने यांचाही नवमतदारांवर प्रभाव दिसून येईल, असेही काही राजकीय विश्लेषक सांगतात. त्यामुळे यंदा याच नवमतदारांचे वाढलेले मतदान कुणाच्या पारड्यात पडेल, याची गणिते मांडली जात आहेत.
महिलांचे मतदान आम्हालाच- फडणवीस
महिलांचे वाढलेले मतदान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही मान्य केले. ते म्हणले, "महाराष्ट्रात मतदानाची टक्केवारी वाढली आहे. जेव्हा-जेव्हा मतदानाची टक्केवारी वाढलेली आहे, तेव्हा-तेव्हा भाजपा आणि मित्र पक्षांना फायदा झालेला आहे. मतदानाच्या वाढलेल्या टक्केवारीवाचा आम्हाला फायदा होईल." फडणवीसांनी महिलांची मतांची टक्केवारी वाढल्याचंही मान्य केलं. ते म्हणाले, "महिलांची मतदानाची टक्केवारी वाढली आहे. आम्ही बूथ सर्टिफिकेट गोळा केले आहेत. मी 20 ते 25 मतदारसंघात फोनवर बोललो. त्यातून महिलांची मतदानाची टक्केवारी वाढल्याचे समजले आहे."












Click it and Unblock the Notifications