पवार साहेबांसमोर जातीचे राजकारण झाल्याचे दुःख
मुंबई: लोकसभा मतदारसंघात मोठया मताधिक्याने निवडून दिलेल्या जनतेचे 'ऋण' व्यक्त करण्यासाठी रायगडचे खासदार सुनील तटकरे यांच्याकडून सभांचा धडाका सुरु आहे. या सभांच्या दरम्यान रोहा येथे जनतेने त्यांचे जंगी स्वागत केले. जातीचे राजकारण पवारसाहेबांच्या उपस्थित इथे झाले याचे मनस्वी दु:ख असल्याचे तटकरे यावेळी म्हणाले.

राजकीय संक्रमण काळात 'आपला माणूस' निवडून दिलात तो 'आपला माणूस' म्हणून यापुढेही कधीच समाजकारणाचा वसा सोडणार नाही असा शब्द देत उपस्थितांना तटकरे संबोधित केले. महायुतीच्या पदाधिकाऱ्यांकडून ज्यापध्दतीने झपाटल्यासारखे काम केले त्यामुळे रोहेकरांनी मताधिक्य दिले त्यामुळे आयुष्य असेपर्यंत हे ऋण मी कधी विसरु शकत नाही. या तालुक्याने माझ्या पाठीमागे मोठी शक्ती उभी केली आहे. निवडणूकीत परस्परांच्या विरोधात राजकीय लढाई लढत असताना पूर्वग्रहदूषित काही काम माझ्या हातून घडले नाही हेही त्यांनी आवर्जून सांगितले.
कमी जागांना अपप्रचार कारणीभूत
देशात ज्या काही कमी जागा आल्या त्याला कारण संविधान बदलाबाबत होणारा अपप्रचार होता. अल्पसंख्याक समाजात असुरक्षिततेची भावना निर्माण करण्यात आली. निवडणुकीत मत मागण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे परंतु ज्यावेळी जातीचे राजकारण पवारसाहेबांच्या उपस्थित इथे झाले याचे मनस्वी दु:ख झाले. गेली ४० वर्ष राजकारणात कार्यरत असताना सर्वधर्मसमभाव विचार घेऊन काम करताना कुठेही कुठल्या समाजाला दुरावा निर्माण करण्याचे काम झाले नाही असेही त्यांनी स्पष्ट केले.
शेकाप किंगमेकर नाही
या निवडणुकीत शेकाप हा किंगमेकर आहे असे चित्र निर्माण करण्यात आले होते. एक्झिट पोलमध्येही आम्ही मागे आहे असे दाखवण्यात आले मात्र रोहेकर आणि जिल्हयातील जनतेने हे किंगमेकर नाहीत हे मला विजयी करुन दाखवून दिले. या रायगड जिल्ह्यातील महायुतीच्या सहाच्या सहा जागा निवडून आणायच्या आहेत आणि या स्पष्टपणे मिळवू असा आत्मविश्वास यावेळी व्यक्त केला.
पत्नीचेही मानले आभार
सभेत त्यांनी आपल्या पत्नीचेही आभार मानले. "पत्नीचा उल्लेख करणे आज आवश्यक आहे कारण ती यावेळी जी काही माझ्यासाठी फिरली...मी तिला विचारले माऊली घरात आमच्यासाठी करते आणि इकडे पण का? मात्र तिने तिची जिद्द सोडली नाही आणि ती फिरली.. तिचे कौतुक करावे तितके कमीच आहे" असेही त्यांनी आवर्जून सांगितले. ५० खाटांचे सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल अदानी समूहासोबत चर्चा करुन १५ दिवसात काम सुरू होईल आणि वर्षभरात कार्यान्वित होईल आणि दुसरं सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलही सुरू करण्याचा माझा मानस आहे असा पक्का शब्द तटकरे यांनी रोहावासियांना दिला. छत्रपती शिवाजी महाराजांचा सर्वांत उंच पुतळा हा रोहयात उभा राहणार आहे. छत्रपती संभाजी महाराजांचे स्मारकही पूर्ण होणार आहे अशी माहितीही यावेळी दिली. ४० वर्षे जी काही अविरत मेहनत घेतली त्याचे फळ रायगड जिल्ह्याने मला अभूतपूर्व यश मिळवून दिल्याचे तटकरे म्हणाले.












Click it and Unblock the Notifications