सुनेत्रा पवारांकडे अजितदादांची 3 खाती, पण 'अर्थ' खात्याला मुख्यमंत्र्यांचा ब्रेक; नेमकं कारण काय?
Why Sunetra Pawar not given finance ministry : उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी आज राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्यानंतर त्यांच्या खातेवाटपाची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शिफारसीनुसार, राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी सुनेत्रा पवार यांच्याकडे अजितदादांकडील 4 पैकी 3 महत्त्वाच्या खात्यांची जबाबदारी सोपवली आहे. मात्र, अत्यंत महत्त्वाचे मानले जाणारे 'अर्थ आणि नियोजन' खाते सध्या त्यांच्याकडे देण्यात आलेले नाही.
सुनेत्रा पवार यांच्याकडे सोपवण्यात आलेली खात्यामध्ये, क्रीडा व युवक कल्याण, राज्य उत्पादन शुल्क व अल्पसंख्यांक विकास आणि औकाफ ही खाते त्यांच्याकडे सोपविण्यात आली.

अर्थ खाते सुनेत्रा पवारांना का मिळाले नाही?
सर्वात मोठा प्रश्न हा होता की, अजितदादांचा कणा मानले जाणारे अर्थ खाते सुनेत्रा पवारांकडे का देण्यात आले नाही? यामागे काही तांत्रिक आणि प्रशासकीय कारणे समोर आली आहेत. सुनेत्रा पवार यांनी आजवर सामाजिक आणि संस्थात्मक पातळीवर मोठे काम केले असले, तरी प्रत्यक्ष सरकारी प्रशासनाचा आणि मंत्रालयाचा त्यांना अनुभव नाही. अर्थ खाते हे अत्यंत क्लिष्ट आणि तांत्रिक असते, त्यामुळे सुरुवातीलाच ही मोठी जबाबदारी देणे टाळण्यात आले आहे.
अर्थसंकल्पाची घाई: येत्या ६ मार्च २०२६ रोजी राज्याचा २०२६-२७ चा अर्थसंकल्प मांडला जाणार आहे. अधिवेशन अगदी तोंडावर आहे. अजितदादांनी या अर्थसंकल्पाची जवळपास सर्व तयारी पूर्ण केली होती. अशा परिस्थितीत नवीन व्यक्तीला शेवटच्या क्षणी बदल सुचवणे किंवा तांत्रिक बाबी समजून घेणे जिकिरीचे ठरले असते. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांशी चर्चा करून आणि त्यांना विश्वासात घेऊनच, अर्थ खाते सध्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतःकडे ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
महत्त्वाची बाब: राज्याचा २०२६-२७ चा अर्थसंकल्प मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सादर करतील. मात्र, अर्थसंकल्पीय अधिवेशन संपल्यानंतर हे खाते पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसकडेच (सुनेत्रा पवार किंवा पक्षाचा अन्य ज्येष्ठ नेता) सोपवले जाईल, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
बारामतीकडे रवाना, पदभार लवकरच
आज विधानभवनात सुनेत्रा पवार यांची विधीमंडळ पक्षनेतेपदी निवड झाली आणि त्यानंतर राजभवनावर त्यांचा शपथविधी पार पडला. तत्पूर्वी, त्यांनी आपल्या राज्यसभा खासदारकीचा राजीनामा दिला आहे. शपथविधीनंतर त्या थेट आपल्या कर्मभूमीत म्हणजे बारामतीकडे रवाना झाल्या आहेत. पुढील काही दिवस त्या बारामतीत कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी घेतील आणि त्यानंतर मुंबईत येऊन आपल्या मंत्रालयातील दालनाचा पदभार स्वीकारतील.












Click it and Unblock the Notifications