धनुभाऊंनी पुसले पीडित कुटुंबीयांचे अश्रू; दोन्ही मुलांसाठी केली आर्थिक मदत
बीड: राज्याच्या राजकारणात बीड लोकसभा मतदारसंघाची निवडणूक सर्वाधिक चर्चेत राहिली. बीडमध्ये महायुतीच्या पंकजा मुंडे विरुद्ध शरद पवार गटाचे बजरंग सोनवणे यांच्यात शेवटच्या फेरीपर्यंत अत्यंत चुरशीचा सामना पाहायला मिळाला.

या लढतीचा निकाल सर्वात शेवटी लागला. त्यामध्ये, पंकजा मुंडे यांना 6 लाख 77 हजार 397 मतं मिळाली तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या बजरंग सोनावणेंना 6 लाख 83 हजार 950 मतं मिळाली. फक्त 6 हजार 553 मतांनी बजरंग सोनावणे यांना पंकजा मुंडेंचा पराभव केला. त्यामुळे, पंकजा मुंडेंच्या समर्थकाच्या पराभव जिव्हारी लागला. आपल्या नेत्या पंकजाताईंचा पराभव झाल्याने अनेकांनी अश्रू ढाळले. तर, बीड जिल्ह्यात या पराभवाचे पडसादही पाहायला मिळाले. मराठवाड्यातील काही ठिकाणी आत्महत्यासारख्या घटना घडल्या आहेत.
आष्टी तालुक्यातील एका युवकाने पराभव सहन न झाल्याने जीवन संपवले. बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडेंनी पोपटराव वायभसे तरुणाच्या घरी जाऊन कुटुंबीयांचे सांत्वन केले. तसेच, पीडित कुटुंबातील मुलांच्या शिक्षणाची जबाबदारीही त्यांनी उचलली आहे.
लोकसभा निवडणुकीत भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचा पराभव झाल्याच्या दुःखात आष्टी तालुक्यातील चिंचेवाडी गावच्या पोपटराव वायभसे या तरुणाने आत्महत्या केली होती. जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी आज वायभासे कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. निवडणुकांमध्ये जय -पराजय होत असतात मात्र या विवंचनेतून कोणी आपला जीव गमवावा, ही आमच्या मनात अपराधीपणाची भावना उत्पन्न करणारी बाब आहे. कुटुंबासाठी देखील हे कधीही न भरून निघणारे मोठे दुःख आहे, त्यामुळे संयमाने जय-पराजय घ्यावेत. कोणतीही निवडणूक अंतिम नसते. कुणीही टोकाचा निर्णय घेऊ नये, असं म्हणत धनंजय मुंडे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. तसेच, पीडीत वायभासे कुटुंबीयांचे सांत्वनही केले.
दोन्ही मुलांच्या नावे मोठी आर्थिक मदत
मृत पोपटराव यांना एक मुलगा, मुलगी व पत्नी असा परिवार आहे. या संपूर्ण परिवाराची तसेच दोन्ही लेकरांच्या शिक्षणाची जबाबदारी आपण घेत असल्याचं धनंजय मुंडेंनी सांगितले. दोन्हीही मुलांच्या नावे प्रत्येकी अडीच लाख रुपयांची मुदत ठेव देखील मुंडे यांच्या वतीने पोपटराव यांच्या मुलांना देण्यात आली.यावेळी शिवा शेकडे, सुधीर भाऊ पोटे, प्रदीप वायभासे, सचिन वायभसे, सचिन घुले, प्रा कैलास वायभसे, विलास वायभसे, युवराज वायभसे देवळलीचे सरपंच पोपट शेकडे, गंगादेवी चे सरपंच विठ्ठल नागरगोजे आदींची उपस्थिती होती.
पंकजा मुंडेंच्या पराभवाचे जिल्ह्यात पडसाद
पंकजा मुंडेंच्या निसटत्या पराभवानंतर बीड जिल्ह्यात तणावाचे वातावरण पाहायला मिळाले. सोशल मीडियातून पंकजा मुंडे यांच्याबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने हा तणाव वाढला होता. त्यातून, पाथर्डी, परळी, शिरुर,वडवणी येथे कडकडीत बंद पाळण्यात आला. तर, जिल्ह्यात 2 जणांनी आपले जीवन संपवल्याचीही घटना घडली. तर,मराठवाड्यातील पंकजा मुंडे समर्थकांनी पंकजा मुंडेंना राज्यसभेवरुन घेऊन कॅबिनेटमंत्री करण्याची मागणीही केली आहे.












Click it and Unblock the Notifications