ज्येष्ठ समाजसेवक बाबा आढाव यांचे निधन! आज पुण्यात अंत्यसंस्कार, कोण होते ते जाणून घ्या जीवनकार्य
Social activist baba adhav passes away : महाराष्ट्राच्या सामाजिक आणि श्रमिक चळवळीचे आधारस्तंभ मानले जाणारे ज्येष्ठ समाजसेवक डॉ. बाबासाहेब पांडुरंग आढाव यांचे ८ डिसेंबर २०२५ रोजी निधन झाले. वयाच्या ९५ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. डॉ. आढाव हे केवळ एक समाजसेवक नव्हते, तर सत्यशोधक विचारांचे निष्ठावान अनुयायी आणि कष्टकरी वर्गाचे खऱ्या अर्थाने नेते होते. त्यांच्या निधनाने महाराष्ट्रातील सामाजिक न्यायाच्या चळवळीला मोठी पोकळी निर्माण झाली आहे.
आढाव यांच्यावर आज पुण्यातील वैकुंठ स्मशानभुमीत सायंकाळी साडेपाच वाजता अंत्यसंस्कार होणार आहेत, यासंदर्भात एबीपी माझाने वृत्त दिले आहे. तत्पुर्वी गुलटेकडी मार्केट यार्ड येथील हमाल भवन येथे त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे.

कोण होते डॉ. बाबासाहेब आढाव?
डॉ. बाबासाहेब आढाव हे मूळचे आयुर्वेद वैद्यकशास्त्राची पदवी घेतलेले डॉक्टर. मात्र, त्यांनी आपले आयुष्य वैद्यकीय पेशाऐवजी समाजकार्यासाठी समर्पित केले. त्यांचे संपूर्ण कार्यक्षेत्र महाराष्ट्र होते.
श्रमिक चळवळीचा आधारस्तंभ
बाबा आढाव यांनी आपले संपूर्ण जीवन असंघटित आणि वंचित, असंघटीत कष्टकरी, विशेषत: हमाल, रिक्षाचालक आणि बांधकाम मजूर यांचे संघटन करून त्यांना न्याय, सामाजिक सुरक्षा आणि सन्मान मिळवून देण्यासाठी खर्च केले.
'हमाल पंचायती'ची स्थापना
आढाव यांच्या कार्याचा महत्त्वाचा टप्पा म्हणजे 'हमाल पंचायती'ची स्थापना. या पंचायतीच्या माध्यमातून त्यांनी पुण्यासह संपूर्ण महाराष्ट्रातील हमालांना संघटित केले आणि त्यांच्या हक्कांसाठी लढा दिला.
'एक गाव एक पाणवठा' चळवळ
जातीय भेदभावाविरुद्ध लढण्यासाठी त्यांनी 'एक गाव एक पाणवठा' या क्रांतीकारी चळवळीचे नेतृत्व केले आणि समाजात समता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला. सत्यशोधक विचारांवर त्यांची नितांत निष्ठा होती.
प्रसिद्ध साहित्यकृती आणि पुरस्कार
डॉ. बाबासाहेब आढाव यांनी सामाजिक कार्यात सक्रिय असतानाच काही महत्त्वपूर्ण साहित्यकृतींचे लेखन केले. त्यांच्या प्रसिद्ध साहित्यकृतींमध्ये 'एक गाव, एक पाणवठा', 'सत्यशोधनाची वाटचाल' आणि 'हमाल पंचायत' यांचा समावेश आहे. सामाजिक योगदानाबद्दल त्यांना अनेक प्रतिष्ठित पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले.
बाबा आढाव यांना प्राप्त पुरस्कार
ज्येष्ठ समाजसेवक बाबा आढाव यांना पुण्यभूषण पुरस्कार (२००६), 'मॅन ऑफ द इयर' (The Week मासिकाद्वारे सन्मान, २००७) व सामाजिक जीवनगौरव पुरस्कार (टाइम्स ऑफ इंडिया सोशल इम्पॅक्ट, २०११) पुरस्कार प्राप्त होते. डॉ. आढाव हे त्यांच्या आयुष्याच्या नव्वदी पार करूनही सामाजिक न्यायासाठी आणि श्रमजीवींच्या हक्कांसाठी सक्रियपणे आवाज उठवत असत. त्यांचे निधन ही महाराष्ट्रासाठी मोठी हानी आहे अशा भावना सामाजिक क्षेत्रातून व्यक्त होत आहे.












Click it and Unblock the Notifications