एकनाथ शिंदेंना धक्क्यावर धक्के ! आता श्रीकांत शिंदेंनाही नोटीस; शिंदे गटात चाललयं तरी काय?
राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र व कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांना आयकर विभागाने नोटीस बजावल्याची माहिती समोर आली आहे. ही बातमी समोर आल्यानंतर राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. याच दरम्यान, उपमुख्यमंत्री शिंदे काल अचानक विधिमंडळाचं अधिवेशन सुरू असतानाही कोणालाही न सांगता दिल्लीत रवाना झाले होते, यामुळे त्यांच्या दिल्ली दौर्यावरही प्रश्न उपस्थित होत आहेत.

संजय शिरसाट यांचा गौप्यस्फोट
शिंदे गटाचे मंत्री संजय शिरसाट यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना एका वक्तव्यात या गोष्टीची अनवधानाने माहिती दिली. त्यांनी म्हटले, "आयकर विभाग प्रत्येकाची चौकशी करत असतो. मला नोटीस आली आहे, श्रीकांत शिंदे साहेबांनाही नोटीस आली आहे. आणखी कोणाला नोटीस आली असेल. आम्हाला आयकर विभागाला उत्तर द्यावं लागणार आहे. मला 9 तारखेला उत्तर मागवण्यात आलं होतं. मी त्यांच्याकडे वेळ मागितली आहे."
याआधी संजय शिरसाट यांनी छत्रपती संभाजीनगरमधील विट्स हॉटेलच्या लिलाव प्रकरणात आपल्याला नोटीस आल्याची माहिती दिली होती. या लिलावात आर्थिक अनियमितता झाल्याचा आरोप झाला होता. त्यांच्यावर आणि त्यांच्या मुलावरही या प्रकरणात सहभाग असल्याचा आरोप विरोधकांनी केला होता.
एकनाथ शिंदे यांचा गुप्त दिल्ली दौरा - कारण समोर येतंय?
सध्या मुंबईत राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू आहे. तरीही एकनाथ शिंदे काल (9 जुलै) अचानक अधिवेशन सोडून दिल्लीत गेले. त्यांच्या या दौऱ्याविषयी कोणतीही अधिकृत माहिती दिली गेली नव्हती. काही माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, शिंदे यांनी दिल्लीत भाजपचे काही वरिष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्र्यांची भेट घेतली.
या दौऱ्याचं कारण स्पष्ट नसताना आता संजय शिरसाट यांच्या वक्तव्यानंतर श्रीकांत शिंदेंनाही आयकर विभागाने नोटीस बजावल्याचे उघड झाले आहे. त्यामुळेच उपमुख्यमंत्री शिंदे यांनी ही बाब तातडीने दिल्लीत नेत्यांसमोर मांडण्यासाठी दौरा केला असावा, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.
राजकीय पडसाद आणि संभाव्य परिणाम
सत्ताधारी शिंदे गटाच्या वरिष्ठ नेत्यांवर आयकर विभागाच्या कारवाया सुरू असल्याने, महायुती सरकारच्या अंतर्गत गटबाजी, आर्थिक पारदर्शकता आणि नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पावसाळी अधिवेशन सुरू असताना अशा महत्त्वाच्या घडामोडी घडणं हे सरकारसाठी राजकीयदृष्ट्या तणावाचं लक्षण मानलं जात आहे.












Click it and Unblock the Notifications