"राज ठाकरे वैफल्यग्रस्त, सत्ता आली तर बायका भांडत बसतील"; शिंदे सेनेची ठाकरे बंधूंवर जहरी टीका!
Maharashtra municipal elections : आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील राजकीय वातावरण आता वैयक्तिक चिखलफेकीपर्यंत पोहोचले आहे. 'सामना'साठी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी दिलेल्या संयुक्त मुलाखतीनंतर राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. या मुलाखतीचा समाचार घेताना शिंदे गटाचे नवनिर्वाचित नेते प्रकाश महाजन यांनी अत्यंत जहरी टीका केली असून, ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यावर आणि त्यांच्या हेतूवर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत.

"हा जुन्याच मुलाखतीचा फ्लॉप सिक्वल"
तीन वर्षांपूर्वी झालेल्या एका मुलाखतीची आठवण करून देत महाजन म्हणाले की, ही नवी मुलाखत म्हणजे केवळ जुन्याच गोष्टींचा 'सिक्वल' आहे. "राज ठाकरे या मुलाखतीत अजिबात सहज नव्हते. चित्रपटसृष्टीतील कोणी भेटले नाही म्हणून त्यांनी एका संपादकाला (संजय राऊत) मुलाखत दिली," अशा शब्दांत त्यांनी राऊतांवरही निशाणा साधला. तसेच, या मुलाखतीत उपस्थित असलेल्या महेश मांजरेकरांच्या भूमिकेवरही त्यांनी संशय व्यक्त केला.
हिंदुत्वाचा मुद्दा आणि 'रशीद मामू'ची जवळीक
प्रकाश महाजन यांनी राज ठाकरेंच्या बदलत्या राजकीय भूमिकेवर सडकून टीका केली. ते म्हणाले की, "राज ठाकरे सध्या पूर्णपणे वैफल्यग्रस्त झाले असून कोणत्याही परिस्थितीत सत्ता मिळवण्यासाठी धडपडत आहेत."
हिंदुत्वाचा विसर : "सत्तेसाठी त्यांनी 'चावडी' भरवली आहे. त्यांचे हिंदुत्व आता कुठे गेले? त्यांनी चंदू मामाला सोडून आता रशीद मामूला जवळ केले आहे," असा टोला त्यांनी लगावला.
"सत्ता आली तर बायकांमध्ये भांडणे लागतील"
ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याने महायुतीला काहीही फरक पडणार नाही, असा दावा करताना महाजन यांनी अत्यंत वैयक्तिक पातळीवर जाऊन टीका केली. ते म्हणाले, "उद्धव ठाकरे यांनी कधीही आत्मपरीक्षण केले नाही. समजा उद्या यांची सत्ता आलीच, तर या दोघांच्या बायकांमध्येच भांडणे लागतील. हे केवळ मुंबईची सत्ता मिळवण्यासाठी चाललेली धडपड आहे."
मराठी अस्मितेचा मुद्दा आणि कोहिनूर मिलचा हिशोब
मराठी माणसाच्या मुद्द्यावर बोलताना महाजन यांनी ठाकरेंना 'एसीत जन्मलेले नेते' संबोधले. ते म्हणाले की, "मराठी माणूस हा यांच्यासाठी केवळ प्रचाराचा मुखवटा आहे. हे नेते मुंबईत एसीमध्ये जन्मले आहेत, त्यांना सामान्य मराठी माणसाच्या समस्या काय ठाऊक? कोहिनूर मिलमध्ये मराठी तरुणांना रोजगार देण्याचे आश्वासन दिले होते, त्याचे काय झाले? मायकल जॅक्सनच्या कार्यक्रमाचा हिशोब अजून मिळालेला नाही," असा खळबळजनक आरोप त्यांनी केला.
मनसेतील गळती आणि शिंदे गटाचे समर्थन
मनसेचे नेते संतोष धुरी यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याचा दाखला देत महाजन म्हणाले की, राज ठाकरेंच्या भोवती ठराविक लोकांचेच कोंडाळे आहे. संदीप देशपांडे यांच्यासारखे नेतेही तिथे आनंदी नाहीत. तसेच, एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीचे समर्थन करताना ते म्हणाले की, पन्नास लोक विनाकारण कोणासोबत जात नाहीत, त्यांच्या पाठीशी काहीतरी ठोस भूमिका होती.












Click it and Unblock the Notifications