निवडणूक आयोगाने राज्य सरकारला थोबाडीत दिली!रश्मी शुक्ला बदलीवर शरद पवारांचे महायुतीला फटकारे
Sharad Pawars statement on the Rashmi Shukla case : राज्याच्या पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला यांची केंद्रीय निवडणूक आयोगाने बदली केली आहे. यावर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी महायुती सरकावर जोरदार टीका केली. " महायुती सरकारला निवडणूक आयोगाने थोबाडीत दिली" असं विधान करत पवारांनी महायुतीला फटकारले.
उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्या उपस्थितीत महाविकास आघाडीची आज मुंबईत पत्रकार परिषद झाली. त्यावेळी पवार बोलत होते. राज्यात कुठेही मैत्रीपूर्ण लढत नाही या मार्गाने जायची आमची इच्छा नाही असेही शरद पवार यांनी यावेळी स्पष्ट केले.

निवडणूक आयोगाचा योग्य निर्णय
शरद पवार म्हणाले, आम्ही जसे दोघांनी प्रयत्न केले तसे काँग्रेसही प्रयत्न करतेय. मैत्रीपूर्ण लढतीच्या रस्त्याने जायची आमची अजिबात इच्छा नाही. तीन वाजता जे कळेल त्यानुसार आम्ही निर्णय घेऊ. रश्मी शुक्लांच्या बदलीसंदर्भात पवार म्हणाले, निवडणूक आयोगाने घेतलेला निर्णय योग्य आहे. माझ्या मते राज्य सरकार ज्या व्यक्तीवर संशय आहे तिच्याबद्दल जाहीर अनेकजण बोलतात की, सत्तेचा गैरवापर दिला अशा व्यक्तींना मुदतवाढ देणे हे योग्य नव्हते. निवडणूक आयोगाने योग्य निर्णय घेतला आहे.
जरांगेंनी उमेदवार न देऊन योग्य निर्णय घेतला
शरद पवार म्हणाले, महाविकास आघाडीशी कुणाचा काही संबंध नाही. मनोज जरांगे यांचा त्यांचा निर्णय आहे आणि पुर्वीचा निर्णयही त्यांचा होता. मला आनंद आहे की, या पद्धतीने उमेदवार जर निवडणूक लढले असते तर त्याचा लाभ भाजपला झाला असता. त्यामुळे त्यांचा निर्णय योग्य आहे.
बंडखोरांनी अर्ज मागे न घेतल्यास कारवाई - ठाकरे
उद्धव ठाकरे म्हणाले, आम्ही काल परवापासून आमच्या पक्षातील सर्वांना सूचना देत आहोत. अनेकांनी अर्ज मागे घेतले आहे. काही जण अर्ज मागे घ्यायला जात आहे. साधारणतः एक तास राहीला ती वेळ गेल्यानंतर कुणी अर्ज मागे घेतले कुणी तसेच ठेवले हे कळेल पण आम्ही सांगूनही जर अर्ज मागे घेतले नसतील तर नाईलाजाने पक्ष त्यांच्यावर कारवाई करेल मात्र, आमचा पूर्ण प्रयत्न आहे की, महाविकास आघाडी म्हणून एकत्रित निवडणूक लढवतआहोत.
शेकाप उरणमधून अर्ज मागे घेणार
उद्धव ठाकरे म्हणाले, महाविकास आघाडीतील ज्या पक्षांचे बंडखोर उभे राहीले आहेत त्यांना आमच्या सूचना गेल्या आहेत. तिथे काय होईल हे तीन वाजता स्पष्ट झाल्यानंतर आम्ही आमचे पुढे पाऊल टाकू. शेकापसोबत आमची चर्चा झाली. जयंत पाटील संजय राऊत यांची भेट झाली, ठरल्याप्रमाणे आम्ही उरणची जागा लढत आहोत. पहिले ठरले की, अलिबाग, पेण आणि पनवेल येथे शेकाप जागा लढवेल पण आता शेकाप उरणमध्ये त्यांच्या उमेदवाराचा अर्ज मागे घेईल आणि आम्ही अलिबाग, पेण आणि पनवेल येथील अर्ज मागे घेऊ.
संजय राऊत म्हणाले, आमची भूमिका अशी आहे की, एकमेकांविरुद्ध न लढता एकत्रित काम करावे. मैत्रीपुर्ण लढत होणार नाही हे स्पष्ट आहे.












Click it and Unblock the Notifications