2 लोकं भेटले, 160 जागा जिंकून देण्याची गॅरंटी दिली; शरद पवारांचा सर्वात मोठा गौप्यस्फोट
नागपूरमध्ये पत्रकारांशी बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी एक धक्कादायक खुलासा केला आहे. आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी दोन अनोळखी व्यक्तींनी आपल्याला भेटून राज्यात १६० जागा जिंकवून देण्याची 'गॅरंटी' दिल्याचे त्यांनी सांगितले. निवडणूक आयोगावर आपला पूर्ण विश्वास असल्यामुळे आपण या गोष्टीकडे दुर्लक्ष करून लोकांमध्ये जाण्याचा निर्णय घेतला, असेही त्यांनी स्पष्ट केले.

पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, या दोन व्यक्तींनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांचीही भेट घेतली होती. पण आपण आणि राहुल गांधी दोघांनीही अशा गोष्टींमध्ये न पडता थेट जनतेकडे जाण्याचा मार्ग निवडला. जनतेचा जो कौल असेल, तो स्वीकारण्यास आम्ही तयार आहोत, असे आम्ही ठरवल्याचे पवार म्हणाले.
शरद पवार यांचा संपूर्ण खुलासा
शरद पवार म्हणाले की, "मला आठवतंय, विधानसभा निवडणुका जाहीर होण्याआधी दिल्लीत काही लोक मला भेटायला आले होते. ती दोन माणसे होती. त्यांची नावे आणि पत्ते आता माझ्याकडे नाहीत कारण मी त्याकडे फारसे लक्ष दिले नाही. त्यांनी मला सांगितले की, महाराष्ट्रातील २८८ जागांपैकी आम्ही तुम्हाला १६० जागा जिंकवून देण्याची खात्री देतो. हे ऐकून मला आश्चर्य वाटले. त्यांनी दिलेली 'गॅरंटी' पूर्णपणे अस्पष्ट होती. पण मला निवडणूक आयोगाच्या संस्थेबद्दल कधीही शंका नव्हती, त्यामुळे अशा लोकांकडे दुर्लक्ष करणे योग्य वाटले."
"या भेटीनंतर मी त्या लोकांना राहुल गांधी यांच्यासोबत भेटवून दिले. त्यांनी राहुल गांधींसमोरही तीच गोष्ट सांगितली. पण माझा आणि राहुल गांधींचा विचार एकच होता की, आपण अशा गोष्टींमध्ये पडू नये. हा आपला मार्ग नाही. आपण जनतेत जाऊन त्यांचा निर्णय स्वीकारू," असे पवार यांनी सांगितले.
जितेंद्र आव्हाड यांनीही दिला दुजोरा
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनीही शरद पवार यांच्या गौप्यस्फोटाला दुजोरा दिला. ते म्हणाले, "ती दोन माणसे पवार साहेबांना भेटली होती आणि त्यांनी १६० जागांसाठी मतांची हेराफेरी करण्याची ऑफर दिली होती. मतदार याद्यांमध्ये फेरफार करण्याचे त्यांचे उद्दिष्ट होते. मात्र, पवार साहेबांनी त्यांच्या प्रस्तावाला गांभीर्याने घेतले नाही आणि असे करणे शक्य नाही असे त्यांना सांगितले."
प्रवीण दरेकर यांची प्रतिक्रिया
भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी मात्र हे दावे बालिश आणि हास्यास्पद असल्याचे म्हटले आहे. ते म्हणाले, "शरद पवार यांच्यासारख्या अनुभवी नेत्याकडून असे बालिश दावे ऐकून आश्चर्य वाटते. यातून दोन गोष्टी समोर येतात. एकतर तुम्हालाच मतांमध्ये फेरफार करण्याची इच्छा होती का? आणि दुसरे म्हणजे, तुम्ही त्याच लोकांना राहुल गांधी यांच्याकडे घेऊन गेला होता, म्हणजे तुम्ही अशा गोष्टींना समर्थन देण्याचा विचार करत होता का? हे म्हणजे बैल गेल्यावर झोपा बांधण्यासारखे आहे. हे दावे हतबलतेतून केले जात आहेत," असा टोला दरेकर यांनी लगावला.












Click it and Unblock the Notifications