शरद पवारांचे फडणवीसांना पत्र: म्हणाले- हत्या प्रकरण लावून धरणाऱ्या लोकप्रतिनिधींच्या जीवाला धोका
Sharad Pawar letter to CM Devendra Fadnavis : राज्यात सद्या संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणावरुन वादंग निर्माण झालेला आहे. अशातच, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी सोमवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून बीडच्या संतोष देशमुख हत्याकांड प्रकरण लावून धरणाऱ्या लोकप्रतिनिधींच्या जीवाला धोका निर्माण झाल्याची भीती व्यक्त केली आहे.
मस्साजोग प्रकरण लावून धरणाऱ्या लोकप्रतिनिधींच्या या प्रकरणातील गुंडांकडून धोका होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी याचे गांभीर्य लक्षात घेऊन सदर लोकप्रतिनिधी व इतर नेत्यांच्या सुरक्षेचा आढावा घ्यावा. त्यांना पोलिस संरक्षण पुरवावे, असे पवार यांनी पत्रात म्हटले.

लोकप्रतिनिधींच्या सुरक्षेचा आढावा घ्यावा
बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची 9 डिसेंबर रोजी निर्घृण हत्या झाली होती. या प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत 6 आरोपींना अटक केली आहे. या प्रकरणात मंत्री धनंजय मुंडे यांचे विश्वासू वाल्मीक कराड यांचा हात असल्याचा दावा बीडच्या सर्वपक्षीय आमदारांनी केला आहे. त्यांनी हे प्रकरण सातत्याने लावून धरत धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. या पार्श्वभूमीवर शरद पवारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून संतोष देशमुख हत्या प्रकरण लावून धरणाऱ्या लोकप्रतिनिधींना संरक्षण पुरवण्याची मागणी केली आहे.
बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच स्व. संतोष देशमुख यांची महिनाभरापूर्वी काही गुंडांनी निर्घृण हत्या केली. या क्रूर घटनेला भला मोठा काळ उलटून गेला असला तरी देशमुख यांचे मारेकरी अद्याप मोकाटच असल्याची जनभावना आहे. त्यामुळे, या संपूर्ण घटनेला फार मोठी गुन्हेगारी पार्श्वभूमी… pic.twitter.com/utwEDgoKMQ
— Sharad Pawar (@PawarSpeaks) January 6, 2025
शरद पवार काय म्हणाले आपल्या पत्रात?
शरद पवार आपल्या पत्रात म्हणाले की, बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच स्व. संतोष देशमुख यांची महिनाभरापूर्वी काही गुंडांनी निर्घृण हत्या केली. या क्रूर घटनेला भला मोठा काळ उलटून गेला असला तरी देशमुख यांचे मारेकरी अद्याप मोकाटच असल्याची जनभावना आहे. त्यामुळे, या संपूर्ण घटनेला फार मोठी गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्याचे निदर्शनास येते.
बीड - परळी भागात यापूर्वी देखील माणुसकीला काळीमा फासणाऱ्या अशा अनेक घटना घडल्या आहेत. त्यामुळे या गुंड प्रवृत्तीची पाळेमूळे खणून काढण्याची राज्यभरातील अनेक लोकप्रतिनिधींकडून मागणी होत आहे व त्यासाठी ते सातत्याने शासनदरबारी पाठपुरावा करत आहेत.
असे असताना याच गुंडांपासून या लोकप्रतिनिधींच्या जीवाला धोका निर्माण झाल्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी याचे गांभीर्य लक्षात घेऊन सदर लोकप्रतिनिधींच्या व इतर नेत्यांच्या सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेत त्यांना राज्य शासनामार्फत योग्य ते पोलीस संरक्षण पुरवावे, अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे.
काय म्हटले पत्रात, वाचा सविस्तर?
शरद पवार आपल्या पत्रात म्हणतात, मागील महिन्यात बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांचे काी गुंडांनी अपहरण करून निर्घृण हत्या केली. सदर अमानवीय घटनेचे पडसाद केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर देशभरात उमटले. गुन्ह्यातील फरार आरोपींना व त्यामागील सुत्रधारांना तत्काळ अटक करावी म्हणून महाराष्ट्रभरात आंदोलने उभी राहिली आहेत. यासंदर्भात बीड जिल्ह्यात निघालेला पहिला आक्रोशमोर्चा राज्यशासनापर्यंत या घटनेचे गांभीर्य पोहोचवणारा होता. त्यात जात, धर्म आणि पक्ष हे भेद बाजूला सारून क्रौर्याची परिसीमा गाठणाऱ्या घटनेचा निषेध झाला. फरार आरोपींना व त्यामागील सुत्रधारांना तत्काळ अटक होऊन कडक शासन व्हावी अशी एकमुखाने मागणी करण्यात आली.
सदर आक्रोश मोर्चाच्या सांगता प्रसंगी आमदार संदीप क्षीरसागर, प्रकाश सोळंके, जितेंद्र आव्हाड, अभिमन्यू पवार व सुरेश धस तसेच बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी आपल्या भाषणांतून आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या. घटनेत सहभागी असणारे गुंड, घटनेचे सुत्रधार व घटनेस जबाबदार असाऱ्या व्यक्तीचा नामोल्लेख केला. महाराष्ट्राच्या सुसंस्कृत परंपरेला लांछन लावणाऱ्या ह्या घटनेचा तातडीने तपास व्हावा याकरीता प्रसारमाध्यमे देखील महत्त्वाची भूमिका बजावत आहेत.
संतोष देशमुख यांची माणूसकीलाी काळीमा फासणारी घटना केवळ एकच नसून यापूर्वी हत्या, अपहरण, खंडणी, खोटे गुन्हे दाखल होणे अशा अनेक घटना बीड - परळी भागात घडल्या असल्याने त्या घटनांची पाळेमूळे खणून काढावीत अशी देखील मागणी केली. अनेक घटनांचा परस्परसंबंध असल्याची शक्यता देखील व्यक्त करण्यात आली. एकूणच अनेक प्रकरणांची मालिका तपासात समोर येण्याची शक्यता असल्याने उपरोल्लेखीत लोकप्रतिनिधी तसेच सदर मंचावरून जनतेला संबोधित करणाऱ्या इतर सन्माननीय व्यक्ती यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
आपणास विनंती की, सदर घटनेविरोधात आवाज उठवणाऱ्या लोकप्रतिनिधी व इतर नेत्यांच्या जिवितास व आरोग्यास कोणताही धोका उत्पन्न होऊ नये म्हणून वेळीच खबरदारी घ्यावी. तसेच त्यांच्या सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेऊन योग्य ते पोलिस संरक्षण राज्य शासनामार्फत पुरवण्यात यावे, असे शरद पवार यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे.












Click it and Unblock the Notifications