सरकारचे 1500 रुपये देण्याकडे लक्ष, पण बहिणींची अब्रू वाचविण्याची गरज; शरद पवारांचा सरकारवर निशाणा
Sharad Pawar on Mahayuti Government : राज्यातील महायुतीचे सरकार हे बहिणींना 1500 रुपये देण्यात मग्न आहे. पण त्यांची अब्रू वाचविण्याची देखील गरज असून याकडे सरकारचे दुर्लक्ष आहे. बहिणींचा सन्मान देखील झाला पाहिजे, असे ज्येष्ठ नेते तथा खासदार शरद पवार म्हणाले. त्यांनी महायुती सरकारवर जोरदार निशाणा साधला. ते धुळ्यात एका कार्यक्रमात बोलत होते.
सत्तेचा माज काहींच्या डोक्यात
शरद पवार म्हणाले की, सरकार लोकांच्या सेवेसाठी आहे, सत्तेचा माज काहींच्या डोक्यात आला आहे. सत्तेचा उन्माद आहे, त्यांना जागा दाखविण्याचे कामं या निवडणुकीत करायचे आहे. बाबासाहेबांनी लोकशाहीचा अधिकार आपणास दिला आहे. परंतु या सत्तेतील काही लोकांना सत्तेचा उन्माद चढला आहे.त्यांना आता खड्यासारखे बाजूला काढा. या निवडणुकीत ती संधी तुम्हाला आहे.

राज्यात सद्या गुंडगिरीचे राज्य
पुढे बोलताना ते म्हणाले की,महाराष्ट्रात गुंडगिरीचे राज्य सुरु आहे. सत्तेचा गैरवापर सुरु आहे. कारखाने, सहकार चळवळीसाठी सरकारने काहीही काम केलेले नाही. तसंच रोजगाराच्या संधीही निर्माण केल्या नाहीत. मागच्या 10 वर्षांत देशाचा विकास झालेला नाही.
मोदी सरकार शेतकरी विरोधी
शरद पवार म्हणाले की, आजच्या राज्यकर्त्यांना शेती आणि शेतकरी यांच्याविषयी काहीही आस्था नाही. मी दहा वर्षे कृषी मंत्री म्हणून काम केलं आहे. त्यावेळी देश अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण झाला. मी 10 वर्ष या खात्याचे काम पाहिलं आणि 2014 मध्ये मी त्या खात्याचं काम सोडलं. त्यावेळी मला सांगायला अभिमान वाटतो की, भारत देश 10 वर्षात जगातील गहू निर्यात करणारा दोन नंबरचा देश बनला.
मोदी सरकारने कांद्यावर निर्यातबंदी आणली. कांद्याला भाव मिळाला नव्हता. कांदा उत्पादक शेतकऱ्याने कष्टाने पिक घेतलं. त्यानंतर निर्यातबंदी करण्यात आली. गहू, तांदूळ याबाबत हे घडलं. जे पिकवाल त्या धान्यावर, उत्पादनावर निर्यात बंदी. मोदी सरकार शेतकरी विरोधी आहे,असा हल्लाबोल शरद पवारांनी केला आहे.












Click it and Unblock the Notifications