शनिवार वाडा नमाज पठण वाद, महायुतीतच जुंपली; नीलम गोऱ्हेंचा भाजप खासदार मेधा कुलकर्णींवर प्रहार!
shaniwarwada namaz controversy : पुण्यातील ऐतिहासिक शनिवार वाड्यात झालेल्या नमाज पठणाच्या कथित घटनेवरून राज्यातील महायुतीमध्येच अंतर्गत वाद पेटल्याचे चित्र आहे. विधान परिषदेच्या उपसभापती आणि शिवसेना शिंदे गटाच्या नेत्या नीलम गोऱ्हे यांनी या प्रकरणावरून आक्रमक झालेल्या भाजप खासदार मेधा कुलकर्णी यांना थेट इशारा देत, "इतर कोणीही आपण सरकार आहोत, या थाटात वागू नये," असा सणसणीत टोला लगावला आहे.
काय आहे नेमका वाद?
शनिवार वाड्यात काही मुस्लीम महिलांनी नमाज पठण केल्याचे व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल झाले होते. या घटनेच्या निषेधार्थ रविवारी (१९ ऑक्टोबर २०२५) भाजप खासदार मेधा कुलकर्णी आणि पतित पावन संघटनेने शनिवार वाड्याबाहेर जोरदार निदर्शने केली.
मेधा कुलकर्णी यांनी तर थेट वाड्याच्या आत जाऊन नमाज पठण झालेल्या ठिकाणी 'शिववंदना' करण्याचा आणि 'गोमूत्र शिंपडून शुद्धीकरण' करण्याचा आग्रह धरला. मात्र, पोलिसांनी त्यांना आत जाण्यापासून मज्जाव केल्याने त्या चांगल्याच आक्रमक झाल्या होत्या.

नीलम गोऱ्हेंचा मेधा कुलकर्णींना स्पष्ट इशारा
सोमवारी (२० ऑक्टोबर २०२५) पुण्यात प्रसारमाध्यमांशी बोलताना नीलम गोऱ्हे यांनी या संपूर्ण प्रकरणावर मेधा कुलकर्णींना खडे बोल सुनावले. गोऱ्हे म्हणाल्या- "शनिवार वाडा ही पुरातत्व विभागाने संरक्षित केलेली वास्तू आहे आणि तिचे काही नियम आहेत.
या नियमांचे पालन झाले पाहिजे. जर नियमांचे उल्लंघन झाले असेल, तर त्यासाठी राज्य सरकार, पोलीस आयुक्त आणि जिल्हाधिकारी अस्तित्वात आहेत. त्यामुळे, इतर कोणीही आपण स्वतः सरकार आहोत, या थाटात वागू नये."
प्रशासनाच्या भूमिकेवर लक्ष
या घटनेनंतर प्रशासन काय भूमिका घेते, हे महत्त्वाचे असल्याचे गोऱ्हे यांनी नमूद केले. ज्या महिलांनी नमाज पठण केले, त्यांनीही संयम बाळगणे आवश्यक होते, असे मत त्यांनी व्यक्त केले.
"उद्या कोणीही म्हणेल की आम्ही मशिदीत जाऊन कीर्तन करू, पण म्हणून तसं होणार नाही. पुरातत्व विभागाने संरक्षित केलेल्या वास्तूंचे नियम पाळलेच पाहिजेत," असे त्यांनी स्पष्ट केले.
महायुतीतील अंतर्गत वादावर भाष्य
यावेळी नीलम गोऱ्हे यांनी महायुतीतील अंतर्गत वादावरही भाष्य केले. "युती आहे म्हणून कोणीच काही मुद्दा मांडायचा नाही असं तर कधी म्हणणार नाही. आमच्या मंत्र्यांबद्दलही अनेक जण प्रश्न विचारत आहेत. लोकशाहीमध्ये असे प्रश्न विचारले जात असतील तर ताबडतोब असं कोणी आमच्या विरोधात बोलूच नये हे योग्य नाही," असे सांगत त्यांनी भाजप नेत्यांवर अप्रत्यक्ष टीका केली.
गोऱ्हे यांनी भाजप नेत्यांवर टीका करताना मुरलीधर मोहोळ यांच्यासह इतर नेत्यांचा उल्लेख केला. रविंद्र धंगेकर यांच्याबाबत त्या म्हणाल्या, धंगेकर आमच्या पक्षाचे नेते आहेत. त्यांना वस्तुस्थिती माहित असेल म्हणून ते बोलत असतील.
हेतू ठेवून आरोप करण्यापेक्षा वस्तुस्थितीतून जनतेवर अन्याय होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे." एकंदरीत, शनिवार वाड्याच्या मुद्द्यावरून महायुतीमधील दोन पक्षांच्या नेत्यांमध्ये सार्वजनिक स्तरावर मतभेद समोर आल्याने हा वाद आणखी चिघळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
-
महिला आयोगानंतर आता प्रदेशाध्यक्षपदही धोक्यात? रुपाली चाकणकरांवर मोठी कारवाई होणार? -
तटकरेंचा हात डोक्यावर होता म्हणून चाकणकरांना अहंकार, आता थेट मकोका लावण्याची मागणी -
दिलासा की धक्का? गॅस सिलिंडरबाबत सरकारने घेतला असा निर्णय, जो कुणीही अपेक्षित धरला नव्हता! -
SRH च्या गोटात राडा! ईशानची विकेट घेताच अन्सारीचा संयम सुटला; भर मैदानात नेमकं काय घडलं?








Click it and Unblock the Notifications