मोदी-शहा सत्तेत आहेत, तोपर्यंत निवडणुकाच लढवायला नको... संजय राऊत यांनी उडवून दिली खळबळ
Mr. Raut's allegations against Modi-Shah- विधानसभा निवडणुकीनंतर ईव्हीएम व निवडणूक आयोगाच्या एकंदर वर्तनावर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी शंका घेणे सुरुच ठेवले आहे. सामना या वृत्तपत्रात शिवसेना ठाकरे गटाचे खा. संजय राऊत यांनी पुन्हा निवडणूक प्रक्रियेवर गंभीर आरोप केले. निवडणूक यंत्रणाच विकली गेली असून, झालेल्या मतदानापेक्षा दोन कोटी मते जास्त मोजली गेल्याच्या आरोप खा. राऊत यांनी केलाय. मोदी-शहा जोपर्यंत सत्तेत आहे, तोपर्यंत निवडणूकच लढवू नये, असा खळबळजनक दावा खा. संजय राऊत यांनी केला.

झालेल्या मतदानापेक्षा मोजणी जास्त कशी?
सामना वृत्तपत्रातून खा. राऊत यांनी ईव्हीएमवर आणि महाराष्ट्राच्या निकालावर हल्लाबोल केला. ते म्हणाले, महाराष्ट्रात 20 नोव्हेंबरला मतदान झाले तेव्हा 5 कोटी 70 लाख लोकांनी मतदान केल्याचे सांगितले गेले. 23 नोव्हेंबरला मतमोजणी झाली तेव्हा 7 कोटी 70 लाख मते मोजली गेली. हे वरचे 2 कोटी मतदान आले कोठून..? हे इतके मतदान वाढले कसे..? ईव्हीएमला गर्भ राहिला काय, असा गंभीर सवाल त्यांनी उपस्थित केला. निवडणूक यंत्रणाच विकली गेली आहे. जेवढे मतदान झाले त्यापेक्षा काही लाख मते जास्त मोजली गेली. त्यामुळे निकाल फिरला. विधानसभेच्या निकालानंतर लोकांमध्ये आनंदाचे वातावरण नाही. फडणवीस - शिंदे कसे जिंकले? हा प्रश्न जनतेला पडला आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
सुप्रिम कोर्टही करतंय वकीली
जोपर्यंत बॅलट पेपरवर निवडणुकांची सुरुवात होत नाही, तोपर्यंत लोकशाहीची हत्या होतच राहील, असं मत व्यक्त करुन संजय राऊत म्हणाले की, अमेरिका, इंग्लंडसारखे सुधारणावादी देशही ईव्हीएमवर निवडणुका घेत नाहीत. अमेरिकेत एलन मस्कने सर्व ईव्हीएम एकाच वेळी हॅक करून हवे तसे मतदान करून घेता येते, हे वारंवार सांगितले आहे. मस्कपासून अमेरिका, युरोपसारखी राष्ट्रे मूर्ख व भारतात मोदी-शहा व त्यांचा भाजप तेवढा शहाणा..! असंच म्हणावं लागेल, असा उद्वीग्न सवालही त्यांनी उपस्थित केला. ईव्हीएमची वकिली आता सुप्रीम कोर्ट करत आहे, असे संजय राऊतांनी म्हटले आहे.
महत्त्वाच्या मुद्यांवर केले भाष्य
संजय राऊत म्हणाले, महाराष्ट्रातील मतदानाच्या टक्केवारीत बदल कसे झाले? आकड्यांच्या जंतर- मंतरवरही दुर्लक्ष करून चालणार नाही. 20 तारखेला 5 वाजता मतदानाची टक्केवारी 58.22 टक्के होती. त्यानंतर रात्री 11.30 वाजता ती टक्केवारी 65.02 टक्के झाली. मतमोजणी सुरू होण्यापूर्वी मतदानाची टक्केवारी 68.05 टक्के झाली. हे इतके मतदान वाढले कसे..? ईव्हीएमला गर्भ राहिला काय..? असा प्रश्न संजय राऊत यांनी उपस्थित केला. जोपर्यंत दिल्लीत मोदी-शहा सत्तेवर आहेत तोपर्यंत निवडणुका लढवायला नकोत, यावर आता सगळ्यांचेच एकमत होत आहे, असं मोठं भाष्यही खा. संजय राऊत यांनी केलं.












Click it and Unblock the Notifications