महाराष्ट्रात वाद निर्माण करण्यासाठी अहमदशहा अब्दालीने सुपारी दिली - अमित शहांवर संजय राऊतांचा आरोप
उद्धव ठाकरे यांच्या सभेत गोंधळ हा सुपारी देऊन केलेला प्रकार आहे. अहमद शहा अब्दाली महाराष्ट्रात अशा प्रकारे गोंधळ घालत आहे, आपआपसात वाद निर्माण करण्यासाठी अहमदशहा अब्दालींनी दोन ते तीन नेत्यांना सुपारी दिली आहे. ते प्रमुख नेते आहेत, असा आरोप शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे नेते तथा खासदार संजय राऊत यांनी भाजपचे ज्येष्ठ राष्ट्रीय नेते तथा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर केला आहे.
ते आज माध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी राज ठाकरे यांच्या वाहनावर फेकलेल्या सुपाऱ्या अथवा अन्य वस्तू या शिवसेना म्हणून आमच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी फेकल्या नाही असे म्हणत वाहनावरील हल्ल्याचा इन्कार केला आहे.

शिवसेनेने मनसेप्रमुखाच्या वाहनावर सुपाऱ्या फेकल्या नाही
संजय राऊत म्हणाले, मनसेप्रमुखांच्या बाबतीत जो प्रकार झाला, त्यांच्या वाहनावर कुणीतरी काहीतरी फेकलं, सुपाऱ्या फेकल्या त्याच्याशी शिवसेना म्हणून पक्षाचा संबंध नाही. स्थानिक पातळीवर मराठा आंदोलक जे अनेक पक्षातील एकत्र आले आणि त्यांनी निषेध व्यक्त केला असेल पण त्यांनी शिवसेना म्हणून मनसेप्रमुखाच्या वाहनावर सुपाऱ्या फेकल्या नाहीत.
संजय राऊत म्हणाले, काल कुणीतरी म्हणाले की, शिवसेनेकडून प्रतिक्रीया होती तर हात जोडून मी विनंती करतो की, तुम्ही काळोखाचा फायदा घेऊन काही फेकले असेल म्हणून तुम्ही वाचलात. जर तुम्ही मर्दांची औलाद असता तर समोर येऊन केलं असतं.
घरी तुमची मुलं, आई, पत्नी वाट पाहतात..
संजय राऊत म्हणाले, माझी अशांना शिवसेना आणि माझ्यातर्फे विनंती आहे की, पुन्हा असे अंधारात लपून छपून कृत्य करु नये. तुमच्या घरात तुमचे आई-वडील वाट पाहतात. तुमची मुलंबाळं वाट पाहतात, तुमची पत्नी वाट पाहते. या स्तरावर जर कुणी येत असेल तर अहमदशहा अब्दाली सुपाऱ्या घेऊन मजा बघतोय दिल्लीत.
सुपाऱ्या कशा वाजतात आपण काल पाहीलं
संजय राऊत म्हणाले, अहमद शहा अब्दाली महाराष्ट्रात अशा प्रकारे गोंधळ आपआपसात निर्माण करण्यासाठी अहमदशहा अब्दालींनी दोन ते तीन नेत्यांना सुपारी दिली आहे. ते प्रमुख नेते आहेत. या सुपाऱ्या कशा वाजवल्या जातात आपण काल पाहीलं.
हा दृष्ट लावण्याचा प्रकार
संजय राऊत म्हणाले, काल भगवा सप्ताहाचा कार्यक्रम जोरदार झाला उद्धव ठाकरेंनी जोरदार आपलं वक्तव्य भाषण केलं. ठाण्यातील वातावरण बदलत आहे. विधानसभेच्या दृष्टीने आमची पावले पडत असून काही असे प्रकार दृष्ट लावण्यासाठी केले जात आहेत.
नशीब..काल ते समोर आले नाहीत
संजय राऊत म्हणाले, मी कोणत्याही पक्षाचे नाव का घेत नाही तर हे जे सर्व चालले हे फक्त महाराष्ट्राचा शत्रू अहमदशहा अब्दाली याच्या इशारा आणि सुपारीवरुन सुरु आहे. हे देवेंद्र फडणवीस यांना माहीत आहे. मुख्यमंत्र्यांनाही माहीत आहे. दोन महिने थांबा मग त्यांना क्रियेला प्रतिक्रीया काय ते समजेल. सत्तेची मस्ती दाखवू नका. नशीब की काल ते समोर आले नाहीत, डरपोकासारखे काळोखात लपून काहीतरी फेकत होते. समोर असते तर त्यांना शिवसैनिक काय आहे आणि महाराष्ट्र काय आहे हे समजले असते.
काही कोटींची सुपारी दिली
संजय राऊत म्हणाले, मराठी माणसांत मारामाऱ्या लावण्याचे काम दिल्लीचा अहमदशहा अब्दाली करत आहे. त्याला काही लोक बळी पडले आहेत. त्यासाठी काही कोटींची सुपारी महाराष्ट्रातील प्रमुख नेत्यांना दिली आहे. त्याचा वापर करुन हे लोक महाराष्ट्रात गोंधळ निर्माण करण्याचे काम करत आहे.












Click it and Unblock the Notifications