मोठी बातमी: संजय राऊतांची प्रकृती बिघडली; तातडीने रुग्णालयात दाखल, नेमकं काय घडलं!
sanjay raut hospitalized : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांना अचानक अस्वस्थ वाटू लागल्याने तातडीने मुंबईतील भांडुप येथील फोर्टिस रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान, प्रकृती बिघडल्यामुळे राऊत यांना तातडीने रुग्णालयात दाखल करावे लागल्याने राजकीय वर्तुळात चिंता व्यक्त होत आहे.
त्यांना नेमकं काय झालंय यासंदर्भात माहिती समोर आलेली नाही. विशेष बाब म्हणजे प्रकृती बिघडण्यापूर्वी त्यांनी आधी पत्रकारांशी संवाद साधून नेहमीप्रमाणे सत्ताधाऱ्यांवर तोफ डागली. त्यानंतर काही वेळात त्यांना अस्वस्थता वाटू लागली.

पत्रकार परिषदेनंतर अस्वस्थता
दररोज सकाळी नियमाने पत्रकार परिषद घेऊन सत्ताधाऱ्यांवर टीकास्त्र सोडणारे आणि ठाकरे गटाची बाजू प्रभावीपणे मांडणारे संजय राऊत यांनी आज सकाळीही नेहमीप्रमाणे पत्रकार परिषद घेतली. मात्र, ही पत्रकार परिषद संपल्यानंतर त्यांची प्रकृती बिघडली आणि त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करावे लागले.
रुग्णालय आणि पूर्वीची तपासणी
राऊत यांना भांडुप येथील फोर्टिस रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. काही दिवसांपूर्वी त्यांनी याच रुग्णालयात रक्त तपासणी केली होती. सध्या त्यांना अचानक अस्वस्थ वाटल्याने दाखल करण्यात आले असून, त्यांना रुग्णालयात दाखल करण्याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. डॉक्टर त्यांच्या प्रकृतीबाबत काय माहिती देतात, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
संजय राऊत काय म्हणाले?
आजच्या पत्रकार परिषदेत संजय राऊत यांनी केलेले एक वक्तव्य राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरले आहे. त्यांनी स्पष्ट केले की, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची इच्छा आहे की, महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या काँग्रेसला सोबत घेणे गरजेचे आहे. गेल्या काही दिवसांपासून ठाकरे बंधूंच्या संभाव्य मनोमिलनाच्या चर्चांना जोर असताना, राऊतांच्या या वक्तव्याने राजकारणात खळबळ उडवून दिली आहे.
शिवसेनेची 'धडाडती तोफ'
संजय राऊत हे शिवसेना (ठाकरे गट) पक्षाची 'धडाडती तोफ' म्हणून ओळखले जातात. २०१९ मध्ये उद्धव ठाकरे यांनी भाजपची साथ सोडून महाविकास आघाडीसोबत सत्ता स्थापन केल्यापासून, संजय राऊत यांनी सातत्याने आणि प्रभावीपणे ठाकरे गटाची बाजू मांडली आहे.
ठाकरे गटाचा राजकीय अजेंडा प्रभावीपणे लोकांपर्यंत पोहोचवण्यात आणि विरोधकांवर कठोर टीका करण्याचे काम ते एकहाती करत आहेत. त्यांच्या या धारदार टीकेचा प्रतिवाद करण्यासाठी महायुतीने अनेक नेत्यांची फौज उभी केली, पण राऊत अनेकदा या सर्वांना पुरून उरल्याचे दिसून आले आहे.












Click it and Unblock the Notifications