आता वेळ निघून गेलीय... संजय राऊतांचं मोठं वक्तव्य, जागावाटपाबद्दल महत्त्वाचं विधान
महाविकास आघाडीत बऱ्याच जागांवर निर्णय झालाय. पण काही जागांबाबत तिन्ही पक्ष आग्रही आहेत. आता वेळ कमी आहे. महाराष्ट्रातील काँग्रेसचे नेते निर्ण य घेण्यात सक्षम नाहीत, असं मला वाटतंय. ते वारंवार दिल्लीत याद्या पाठवताहेत, असं म्हणत आज खा. संजय राऊत यांनी मविआतील जागावाटपाच्या भिजत घोंगड्यावर नाराजी व्यक्त केली. आज सकाळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत राऊत यांनी लवकरच जागावाटपाच निर्णय होईल, आमच्यात मतभेद नक्कीच नाही, हेही स्पष्ट केलं.
राऊत यांची काँग्रेस नेत्यांशी चर्चा सुरु
खा. संजय राऊत यांनी आज सकाळी पत्रकार परिषद घेत, जागावाटपाबाबत माहिती दिली. मविआच जागावाटप नेमकं कुठं रखडतय हे त्यांनी सांगितलं. ते म्हणाले की, "आता सकाळी माझं महाराष्ट्रातील काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीथला, मुकूल वासनिक यांच्याशी बोलणं झालं. आज राहुल गांधींशी ही मी बोलणार आहे. सीट शेयरिंगबद्दल थांबलेल्या गोष्टींना गती मिळावी यासाठी चर्चा करणार आहे," असं संजय राऊत यांनी स्पष्ट केलं. महाविकास आघाडीचं जागावाटप लवकरच फायनल होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांना दाखवला आरसा
खा. राऊत यांनी काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांबद्दल नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले, "महाविकास आघाडीचा बऱ्याच जागांवर निर्णय झालाय. काही जागांवर निर्णय होत नाहीय. पण आता वेळ कमी आहे. महाराष्ट्राचे नेते निर्णय घेण्यात सक्षम नाहीत, असं मला वाटतं. ते वारंवार दिल्लीत यादी पाठवतात. याद्या दिल्लीत गेल्यावर चर्चा होते. यात वेळ जातो. पण आता वेळ निघून गेलीय. लवकरात लवकर निर्णय झाला पाहिजे. राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेनेत मतभेद नाहीत. काँग्रेसबरोबरही मतभेद नाहीत. पण काही जागांवर तिन्ही पक्ष दावा करत आहेत. काँग्रेस हायकमांडसोबत आम्ही चर्चा केली. बैठकीत जी चर्चा झाली, त्याबद्दल उद्धव ठाकरेंना सांगितलं. महाविकास आघाडीची 200 पेक्षा जास्त जागांवर सहमती झाली आहे. उद्धव ठाकरेंनी ज्या सूचना केल्यात, त्याचीही अंमलबजावणी सुरु आहे." असं संजय राऊत यांनी सांगितलं.
भाजप ही बिष्णाई गँग आहे
खा. संजय राऊत यांनी भाजप व शिंदे गटावरही तोंडसूख घेतलं. ते म्हणाले, " आम्हाला भाजपाचा पराभव करायचा आहे. या महाराष्ट्रात भ्रष्ट सरकार आहे. भाजपाशी कसं लढायचं, ते आम्हाला माहित आहे. अमित शाह, भाजपा, मिंधे गटाने आम्हाला सर्वात जास्त त्रास दिलाय. आम्ही तुरुंगात जाऊन आलो. टार्गेटवर कोण आहे..? काय होऊ शकतं..? हे आम्हाला माहिती आहे. भाजप बिष्णाई गँग सध्या सक्रीय आहेत. त्यांच्याकडे हत्यारं नाहीत, पण ईडी, सीबीआयचा वापर करुन त्यांनी आम्हाला त्रास दिलाय. हे सर्व सहन करुन आम्ही उभे आहोत." असं संजय राऊत म्हणाले.












Click it and Unblock the Notifications