छ. संभाजीनगरमध्ये महायुती का तुटली! 'ही' 3 कारणं वाचा, कोण ठरणार वरचढ ठाकरे, शिंदे की भाजप? वाचा
Sambhajinagar mahayuti break sanjay-shirsat announcement : छत्रपती संभाजीनगरमधील राजकारण आज एका ऐतिहासिक वळणावर येऊन ठेपले आहे. महायुतीमधील जागावाटपाचा तिढा न सुटल्याने अखेर भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) यांची युती तुटल्याची अधिकृत घोषणा आमदार संजय शिरसाट यांनी केली आहे. तर दुसरीकडे ठाकरे गट आणि मनसेची युती असतानाच काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षासोबत आघाडीबद्दलही सांशकता आहे, या सर्व घडामोडींमुळे आता शहरात महानगर पालिकेची निवडणूक 'चौरंगी' किंवा 'पंचरंगी' लढतीचे चित्र स्पष्ट झाले आहे.

भाजप-शिंदेंची शिवसेना स्वबळावर लढणार
मराठवाड्याची राजधानी असलेल्या या शहरात महायुतीमधील 'बिघाडी' अखेर चव्हाट्यावर आली आहे. ५४-४२ च्या जागावाटपाच्या फॉर्म्युल्यावरून भाजप आणि शिंदे गटात एकमत होऊ शकले नाही. "आम्ही स्वबळावर लढण्यास समर्थ आहोत," असे म्हणत संजय शिरसाट यांनी युती तोडल्याने आता भाजप आणि शिंदे सेना एकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत. या फुटीमुळे विरोधी पक्षांच्या आशा पल्लवित झाल्या असून, शहरात आता कोणाचे वर्चस्व राहणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
महायुती का तुटली? प्रमुख कारणे
१. जागावाटपाचा 'ईगो'
शिंदे गटाने जुन्या प्रभागरचनेनुसार आपल्या हक्काच्या जागांवर दावा केला होता, तर भाजपने वाढलेली ताकद पाहता जास्त जागांची मागणी केली होती.
२. जंजाळ-शिरसाट फॅक्टर
शिंदे गटाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र जंजाळ आणि संजय शिरसाट यांनी भाजपच्या 'मोठ्या भावा'च्या भूमिकेला कडाडून विरोध केला.
३. स्थानिक कार्यकर्त्यांचा दबाव
दोन्ही पक्षांतील इच्छुकांनी "युती झाली तर आम्ही बंडखोरी करू," असा इशारा दिला होता, ज्यामुळे नेत्यांना स्वबळाचा निर्णय घ्यावा लागला.
इतर पक्षांची स्थिती आणि रणनीती
१. शिवसेना (ठाकरे गट - UBT)
महायुतीमधील फुटीचा सर्वाधिक फायदा ठाकरे गटाला मिळण्याची शक्यता आहे. हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून भाजप आणि शिंदे गटात मते विभागली गेल्यास, त्याचा थेट फायदा 'मशाल' चिन्हाला होऊ शकतो. अंबादास दानवे यांनी आधीच मोर्चेबांधणी पूर्ण केली असून, निष्ठावान शिवसैनिकांना एकत्र ठेवण्याचे त्यांच्यासमोर आव्हान आहे.
२. मनसे (राज ठाकरे गट)
राज ठाकरेंनी 'एकला चलो रे'ची भूमिका आधीच जाहीर केली होती. आता महायुती तुटल्याने, जे मतदार भाजप किंवा शिंदे गटावर नाराज आहेत, त्यांच्यासाठी मनसे हा एक सक्षम पर्याय ठरू शकतो. हिंदुत्वाच्या मुद्द्यावर मनसे येथे मोठी मते खेचण्याची शक्यता आहे.
३. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार विरुद्ध अजित पवार)
अजित पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महायुतीतून बाहेर पडल्याने आता ते स्वतंत्र ताकद आजमावणार आहेत. तर शरद पवारांचा पक्ष महाविकास आघाडीत राहून ते ठराविक जागांवर लक्ष केंद्रित करतील. परभणीप्रमाणे येथेही दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याची चर्चा होती, मात्र सध्या तरी ते स्वतंत्रच दिसत आहेत.
४. एमआयएमचे धोरण काय?
इम्तियाज जलील यांच्या नेतृत्वाखाली एमआयएमने आपले स्वतंत्र अस्तित्व टिकवून ठेवले आहे. हिंदू मतांचे ध्रुवीकरण आणि विभागणी झाल्यास एमआयएमचा मार्ग अधिक सुकर होऊ शकतो, ठाकरे गट, शिंदे गट, भाजप हे तीन प्रमुख पक्ष आणि मनसेही काही अंशी हिंदू मताचे ध्रुवीकरणास कारणीभूत ठरेल. तर काँग्रेस-दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस आणि वंचितकडे मुस्लिम मतं काही अंशी जातील पण जास्तीत जास्त मुस्लिमांची मतं एकगठ्ठा मुस्लिम मतदान एमआयएमकडे जाईल त्यामुळे एमआयएमला या निवडणुकीत भाजप शिवसेनेच्या स्वबळाच्या नाऱ्यामुळे बळ मिळत आहे.












Click it and Unblock the Notifications