'खळबळजनक दावा' भाजपच्या 'ऑपरेशन लोटस'मध्ये एकनाथ शिंदे यांचे ३५ आमदार फुटणार
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे मुखपत्र असलेल्या 'दैनिक सामना'मधून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना गटावर (शिंदे गट) अत्यंत गंभीर आणि खळबळजनक टीका करण्यात आली आहे. एकनाथ शिंदे यांनी जे पेरले होते, तेच आता उगवण्याची वेळ आली आहे. भाजपला आता शिंदे नकोसे झाले असून, त्यांची जागा दाखवण्यासाठी भाजपने 'ऑपरेशन लोटस' सुरू केल्याचा दावा 'सामना'च्या अग्रलेखातून करण्यात आला आहे.

शिंदे गटावरच आता 'ऑपरेशन लोटस'चा घाव
'सामना'च्या अग्रलेखात म्हटले आहे की, सध्या सत्ताधारी गटात जे 'नाराजी नाट्य' सुरू आहे, तो तिसरा अंक आहे. नाराज झालेले शिंदे यांना भाजप कवडीचीही किंमत द्यायला तयार नाही आणि हे नाराजीचे महानाट्य लवकरच कोसळणार आहे. आगामी काळात भाजप एकनाथ शिंदे यांच्याशिवाय निवडणूक लढेल हे निश्चित असून, शिंदे गटातील किमान ३५ आमदार भाजपमध्ये प्रवेश करतील, असा स्पष्ट दावा अग्रलेखात करण्यात आला आहे.
बाळासाहेब ठाकरे यांची मूळ शिवसेना फोडण्यासाठी भाजपने 'ऑपरेशन लोटस' केले, त्याचे सूत्रधार एकनाथ शिंदे होते. आता भाजप दुसऱ्या 'ऑपरेशन लोटस' अंतर्गत शिंदे गटावरच घाव घालत आहे. शिंदे यांचा पक्ष म्हणजे 'बुडबुडे' असून, अमित शाह यांनी निवडणूक आयोग आणि सर्वोच्च न्यायालयाच्या माध्यमातून त्यांना 'शिवसेना' पक्ष आणि 'धनुष्यबाण' चिन्ह मिळवून दिले. मात्र, शिवसेना फोडण्यासाठी शिंदे यांनी जी 'तलवार' वापरली, त्याच तलवारीने आता त्यांचा 'घात' होत असल्याचे अग्रलेखात नमूद केले आहे.
'मुंगळे' भाजपच्या ढेपेवर चढले: अमित शाह यांचा हसून शिंदेंना टोला
- ठेकेदार सेना: अग्रलेखात शिंदे गटाला 'ठेकेदार सेना' असे संबोधले असून, 'गुळाच्या ढेपेला मुंगळे चिकटावेत' तसे लोक शिंदे यांच्यासोबत चिकटलेले आहेत.
- रवींद्र चव्हाणांची 'गुळाची ढेप': भाजपने, विशेषतः रवींद्र चव्हाण यांनी, मोठी 'गुळाची ढेप' ठेवली आणि शिंदे यांचे 'मुंगळे' आता भाजपच्या ढेपेवर चढले आहेत.
- शिंदेंची तक्रार आणि शाह यांचे हसू: उपमुख्यमंत्री शिंदे यांनी दिल्लीत अमित शाह यांची भेट घेऊन मुख्यमंत्री फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची तक्रार केली. चव्हाण मोठ्या रक्कमेचा वापर करून आमचे पदाधिकारी फोडत आहेत, अशी त्यांची तक्रार होती. यावर अमित शाह यांना हसू आवरले नाही.
- शाह यांचा स्पष्ट संदेश: शाह यांनी हसत हसत शिंदे यांना स्पष्ट केले की, मूळात तुमचा पक्ष हा भाजपने 'फोडाफोडी' करूनच बनवला आहे, तो भाजपची 'उपशाखा' आहे. "पैसा वाटून माणसे फोडण्यात तुमचा हातखंडा आहे. त्यामुळे चव्हाण ते करत असतील तर वाईट वाटून घेण्याचे कारण नाही," असा टोला शाह यांनी लगावला. त्यांनी शिंदेंना मुंबईला जाऊन चव्हाण यांच्यासोबत चहा पिण्याचा आणि 'उगाच फालतू तक्रारी घेऊन दिल्लीकडे न येण्याचा' सल्ला दिल्याचे या अग्रलेखात म्हटले आहे.
शिंदे गटाची चिंता
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपने शिंदे यांची अनेक माणसे फोडल्यामुळे शिंदे आणि त्यांच्या लोकांची चिंता वाढली आहे. युतीच्या राजकारणात भाजपचे हे कृत्य योग्य नसल्याचे मत शिंदे गटाचे आहे. मात्र, शाह यांच्या भेटीनंतर आपला सन्मान राखण्याचा शब्द मिळाल्याची शिंदे यांची 'बतावणी' आहे, असे 'सामना'ने म्हटले आहे. रवींद्र चव्हाण हे ठाणे जिल्ह्यातील असल्याने 'ज्या गावच्या बोरी, त्याच गावच्या बाभळी' अशी टिप्पणी करत 'सामना'ने ठाण्याच्या राजकारणावरही निशाणा साधला आहे.












Click it and Unblock the Notifications