"विलासरावांच्या आठवणी पुसल्या जातील!"; रवींद्र चव्हाणांच्या विधानावर अमित देशमुखांचे चोख प्रत्युत्तर
Ravindra chavan statement vilasrao deshmukh latur election amit deshmukh reaction : लातूर महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी केलेल्या एका विधानाने जिल्ह्यासह राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. "भाजप कार्यकर्त्यांचा उत्साह पाहता लातूरमधून विलासराव देशमुखांच्या आठवणी पुसल्या जातील," या चव्हाणांच्या विधानाचा काँग्रेसने तीव्र शब्दांत निषेध केला असून, माजी मंत्री अमित देशमुख यांनी यावर कडक शब्दांत प्रत्युत्तर दिले आहे.

नेमकं काय घडलं?
लातूर महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात भाजपच्या जाहीरनाम्याचे प्रकाशन प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते झाले. यावेळी कार्यकर्त्यांना संबोधित करताना चव्हाण म्हणाले, "कार्यकर्त्यांचा उत्साह पाहून लक्षात येते की लातूर शहरातून विलासराव देशमुखांच्या आठवणी पुसल्या जातील, यात काही शंका नाही." या विधानानंतर व्यासपीठावर उपस्थित भाजप नेत्यांमध्ये खळबळ उडाली, तर काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये संतापाची लाट उसळली.
स्व. विलासराव देशमुख साहेबांच्या आठवणी लातूर जिल्ह्यातून पुसू शकणारा अजून कोणी निर्माण नाही झाला. अनेक जण इच्छा बाळगून आलेत आणि स्वाभिमानी लातूरकरांनी त्यांना त्यांची जागा दाखवून दिलीय.
— Harshwardhan Sapkal (@INCHarshsapkal) January 5, 2026
विलासराव देशमुख यांनी लातूर जिल्ह्याला राष्ट्रीय पातळीवर ओळख मिळवून दिली, त्यांनी आपलं… pic.twitter.com/5lAWjPI54s
अमित देशमुखांचे चोख प्रत्युत्तर
रवींद्र चव्हाण यांच्या विधानावर विलासराव देशमुख यांचे पुत्र आणि आमदार अमित देशमुख यांनी संताप व्यक्त करत भाजपच्या संस्कृतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. ते म्हणाले "भाजप प्रदेशाध्यक्षांनी केलेले विधान हे हा पक्ष राजकारण कोणत्या खालच्या स्तरावर घेऊन गेला आहे, याचे जिवंत उदाहरण आहे. विलासराव देशमुख हे केवळ लातूरचेच नव्हे, तर महाराष्ट्राचे नेते होते. लोकांच्या मनातून त्यांच्या आठवणी पुसणे कोणालाही शक्य नाही. लातूरची आणि महाराष्ट्राची ही संस्कृती नाही, याचे भान चव्हाणांनी ठेवायला हवे होते."
भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी लातूरमध्ये येऊन जे विधान केलंय त्यावरून, हा पक्ष कुठल्या स्तरावर राजकारनालाघेऊन चालला आहे हे दिसून येत आहे. लातूरची आणि महाराष्ट्राची ही संस्कृती नाही याची जाणीव त्यांनी ठेवायला हवी होती. त्यांच्या विधानाचा मी तीव्र शब्दात… pic.twitter.com/uc0XAk1jRP
— Amit V. Deshmukh (@AmitV_Deshmukh) January 6, 2026
भाजपवर टीकेची झोड
अमित देशमुख यांनी सत्ताधारी महायुती सरकारवरही निशाणा साधला. "विद्यमान सरकारच्या काळात निवडणुकीत लोकांना धमकावणे, पैशाचे आमिष दाखवणे, उमेदवारांचे अपहरण आणि हिंसाचार यांसारख्या घटना घडत आहेत. महाराष्ट्राच्या राजकारणाची ही नवी आणि घातक ओळख भाजप निर्माण करू पाहतोय का?" असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.
एकीकडे रविंद्र चव्हाण यांनी विलासराव देशमुख यांच्यावर लातूरमध्ये वक्तव्य करुन स्वतःच वाद ओढवून घेतला आहे, त्यांच्यावर आणि भाजपवर या वक्तव्यामुळे टीका होत आहे. विशेषतः अद्याप खुलाचा चव्हाण यांच्याकडून आलेला नाही, भाषण करुन ते खुलासा न देता माध्यमांशी न बोलताच गेल्याचे वृत्त एबीपी माझाने दिले आहे. दरम्यान आता या मुद्द्यावरुन लातूरसह महाराष्ट्राचे राजकारण तापण्याची चिन्हे आहेत कारण विलासराव देशमुख यांच्या आठवणीत आजही लातूरकर आहेत, व राजकीय स्वार्थासाठी असे वक्तव्य करणे योग्य नसल्याच्या प्रतिक्रीया व्यक्त होत आहेत.












Click it and Unblock the Notifications