रतन टाटा श्रीमंत असूनही त्यांनी कधी श्रीमंतीचा तमाशा मांडला नाही - राज ठाकरेंची भावूक पोस्ट व्हायरल!
Ratan Tata death Raj Thackeray's post goes to viral : प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांचं गुरुवारी रात्री निधन झालं. वयाच्या 86 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. संपूर्ण भारतात शोककळा पसरली. आज देशभरातून शोक व्यक्त केला जात आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी फेसबुक पोस्ट करत रतन टाटा यांना श्रद्धांजली वाहिली.
रतन टाटांसोबतचे फोटो राज ठाकरेंनी फेसबुकवर शेअर केले. शिवाय राज ठाकरेंनी त्याखाली लिहलेली पोस्टही सध्या चर्चेत आहे. या पोस्टमध्ये त्यांनी रतन टाटा हे श्रीमंत योगीच होते, असं म्हटलंय. राज ठाकरे यांनी अत्यंत भावूकपणे ही पोस्ट लिहिलीय. शिवाय असा माणूस आपल्या पुढच्या पिढ्यांना न पहायला मिळणं, ही दुःखाची बाब असल्याचं त्यांनी म्हटलं.

रतन टाटांना दिली श्रीमंत योगींची उपमा
आपल्या पोस्टमध्ये राज ठाकरे म्हणतात, आज मी एक ज्येष्ठ मित्र गमावला याचं दुःख आहेच, पण एकूणच भारताने कदाचित शेवटचा असा 'कर्तृत्ववान तरीही निर्लेप राहिलेला उद्योजक' गमावला, हे त्याहून मोठं दुःख आहे. छत्रपती शिवाजी महाराजांशी या जगात कोणाचीच तुलना होऊ शकत नाही. पण समर्थ रामदास स्वामींनी महाराजांचं वर्णन, जसं अचूक केलं तसं इतर कुठे आढळत नाही.
समर्थ रामदास महाराजांना 'श्रीमंत योगी' म्हणतात. रतन टाटांबद्दल विचार करताना, 'श्रीमंत योगी' ही उपमा तंतोतंत पटते. श्रीमंत असून देखील त्यांनी आपल्या श्रीमंतीचा तमाशा कधी मांडला नाही. असा माणूस पुढच्या पिढयांना पहायला न मिळणं ही अधिक दुःखाची बाब. रतन टाटांना माझी आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची भावपूर्ण श्रद्धांजली.
जुन्या आठवणींना दिला उजाळा
राज ठाकरे यांनी त्यांच्या फेसबुक पेजवर एक लांबलचक पोस्ट शेअर केली. या पोस्टद्वारे त्यांनी रतन टाटा यांच्या आठवणींना उजाळा दिला. तसेच राज ठाकरे यांनी रतन टाटांसोबतचे काही खास फोटोही शेअर केले आहेत. यातील एका फोटोत राज ठाकरे हे रतन टाटांच्या पाया पडताना दिसत आहेत. तर दुसऱ्या फोटोत राज ठाकरे हे रतन टाटांचा सन्मान करताना दिसत आहे.
रतन टाटा यांचं निधन झालं. जवळपास १५६ वर्षांची परंपरा असलेल्या एका उद्योग समूहाला ज्यांनी खऱ्या अर्थाने एकविसाव्या शतकांत आणलं आणि 'टाटा' ही नाममुद्रा ज्यांनी जगभर नेली ती रतन टाटांनी.
— Raj Thackeray (@RajThackeray) October 10, 2024
बरं, हे सगळं करताना एखाद्या योगी माणसाची स्थितप्रज्ञताच ठेवायची ही टाटा समूहाची शिकवण पूर्णपणे… pic.twitter.com/q0kpqMlabW
ते लिहतात, "रतन टाटा यांचं निधन झालं. जवळपास 156 वर्षांची परंपरा असलेल्या एका उद्योग समूहाला ज्यांनी खऱ्या अर्थाने एकविसाव्या शतकांत आणलं. 'टाटा' ही नाममुद्रा जगभर नेली ती रतन टाटांनी. बरं, हे सगळं करताना एखाद्या योगी माणसाची स्थितप्रज्ञताच ठेवायची ही टाटा समूहाची शिकवण पूर्णपणे अंगीकारायची हे खरंतर कठीण, पण ते रतन टाटांना जमलं.
रतन टाटांकडे टाटा समूहाची धुरा आलीच ती जेआरडींसारख्या एका अत्यंत प्रतिभाशाली उद्योजकाकडून. स्वातंत्र्यानंतर तत्कालीन सरकारांशी आणि 'लायसन्स राज'शी झगडा करत जेआरडीनी टाटा उद्योगाचे पंख विस्तारले, आणि ते पंख मधून मधून छाटण्याचे उद्योग त्या- त्या वेळच्या सरकारने केले. योगायोग बघा की 'लायसन्स राज' संपायला आला आणि उदारीकरणाच्या उंबरठ्यावर असताना रतन टाटा टाटा समूहाचे अध्यक्ष झाले.
नाशिकच्या गार्डनशी टाटांचा संबंध
माझे आणि रतन टाटांचे व्यक्तिगत जिव्हाळ्याचे संबंध होते आणि मी एखादी कल्पना त्यांच्यापुढे मांडली आणि रतन टाटांनी त्याला प्रतिसाद दिला नाही, असं कधीच झालं नाही. आम्ही मांडलेल्या महाराष्ट्राच्या विकास आराखड्याबाबत त्यांनी केलेल्या सूचना असोत, की नाशिकमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सत्तेच्या काळात उभारलेल्या 'बोटॅनिकल उद्याना'साठी सीएसआरमधून दिलेला निधी असो, त्यांचा माझ्याबद्दलचा आणि पक्षाबद्दलचा जिव्हाळा अनेकदा दिसून आला.
बाॅटॅनिकल उद्यानाच्या उभारणीच्या वेळेला, सुरुवातीला मंजूर झालेला निधी कमी पडला. पण कामाचा आवाका लक्षात घेऊन, आणि जीव ओतून आम्ही जे काम करत होतो ते पाहून त्यांनी कधीच निधीच्या बाबतीत हात आखडता घेतला नाही. इतकंच नाही ते उद्यान पूर्ण झाल्यावर, त्यांनी ते बघायला यावं अशी विनंती मी केली होती, ज्याला त्यांनी मान देऊन ते स्वतः नाशिकला आले होते.












Click it and Unblock the Notifications