"मराठी अस्मिता हा आजार नाही, आमचं स्वत्व!" राज ठाकरेंनी मोहन भागवतांना खडसावलं; दिलं थेट उत्तर
Raj Thackeray's Strong Rebuttal to Mohan Bhagwat : सरसंघचालक मोहन भागवत यांनी भाषिक अस्मितेबद्दल केलेल्या विधानावरून महाराष्ट्राचे राजकारण तापले आहे. मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' वर सविस्तर पोस्ट लिहून भागवतांच्या विधानाचा तीव्र शब्दांत निषेध केला आहे. "मराठी माणूस सहनशील आहे म्हणून तुमची हिंमत होते," अशा कडक शब्दांत सुनावत राज ठाकरेंनी भागवतांना आरसा दाखवला आहे. भाषिक प्रेम हा 'आजार' नसून ते आमचे स्वत्व असल्याचे त्यांनी ठणकावून सांगितले आहे.

मान्यवरांची उपस्थिती भीतीपोटी - राज ठाकरे
मुंबईतील कार्यक्रमाचा संदर्भ देत राज ठाकरे म्हणाले की, या कार्यक्रमाला आलेली विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळी ही मोहन भागवतांच्या प्रेमाखातर आली नव्हती, तर ती नरेंद्र मोदी यांच्या सरकारी भीतीमुळे आली होती. "नाहीतर आजवर का कोणी या असल्या रटाळ प्रवचनांना आले नाहीत? त्यामुळे ती मंडळी आपल्यासाठी आली होती या गैरसमजातून प्रथम आपण बाहेर या," असा टोलाही त्यांनी लगावला.
राज ठाकरेंनी करुन दिली इतिहासाची आठवण
मोहन भागवतांना इतिहासाची आठवण करून देत राज ठाकरे म्हणाले की, भाषावार प्रांतरचना का करावी लागली याचा इतिहास भागवतांना माहित असावा. भाषेबद्दलचे आणि प्रांताबद्दलचे प्रेम जर भागवतांना आजार वाटत असेल, तर हा आजार कर्नाटक, तामिळनाडू, पश्चिम बंगाल, पंजाब आणि अगदी गुजरातमध्येही आहे. जेव्हा परराज्यातील लोकांच्या झुंडी स्थानिक संस्कृतीला नाकारतात आणि भाषेचा अपमान करतात, तेव्हा स्थानिकांमध्ये रोष निर्माण होतो. याला तुम्ही आजार म्हणणार का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
समरसतेचे धडे गुजरातमध्ये का दिले नाहीत? - राज ठाकरे
गुजरातचा दाखला देत राज ठाकरे म्हणाले की, जेव्हा गुजरातमध्ये उत्तर प्रदेश आणि बिहारच्या हजारो लोकांना पळवून लावले, तेव्हा तिकडे जाऊन तुम्ही समरसतेचे धडे का दिले नाहीत? मराठी माणूस सहनशील आहे आणि इथले सत्ताधारी लिबलिबित कण्याचे आहेत, म्हणूनच भागवतांची अशी बोलण्याची हिंमत होते. "देशभरात हिंदी (जी मुळात राष्ट्रभाषा नाही) लादणाऱ्या सरकारचे कान उपटून दाखवा आणि मग आम्हाला समरसतेच्या गोष्टी शिकवा," असेही त्यांनी ठणकावून सांगितले.
८ फेब्रुवारी २०२६ रोजी मुंबईतल्या एका कार्यक्रमात सरसंघचालक श्री. मोहन भागवत यांनी, भाषेबद्दल आग्रही राहणे, त्यासाठी वेळेस आंदोलन करणे हा एक आजार आहे अशा आशयाचं विधान केलं.
— Raj Thackeray (@RajThackeray) February 10, 2026
या कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवरांना बोलावण्यात आले होते, त्यातले काही हजर देखील होते ! परंतु…
हिंदुत्वाच्या नावाखाली सुरू असलेल्या 'प्रकारावर' ठाकरी भाष्य
हिंदुत्वाच्या मुद्द्यावर बोलताना राज ठाकरे म्हणाले की, ज्यावेळी हिंदूंवर हल्ला होईल, तेव्हा आम्ही हिंदू म्हणून खंबीरपणे उभे राहूच. परंतु, हिंदुत्वाच्या नावाखाली जो धिंगाणा सुरू आहे, त्यावर तुम्ही कधी बोलणार? २०१४ ला बीफ एक्सपोर्टमध्ये जो देश ९ व्या क्रमांकावर होता, तो आज दुसऱ्या क्रमांकावर आला आहे. गोहत्येचे राजकारण करून जो तमाशा सुरू आहे, त्यावर तुम्ही सरकारला खडे बोल कधी सुनावणार? असा रोखठोक प्रश्न त्यांनी विचारला.
मराठी माणूस हेच आमचे सर्वोच्च प्राधान्य - राज ठाकरे
शेवटी आपली भूमिका स्पष्ट करताना राज ठाकरे म्हणाले की, "आमच्यासाठी मराठी भाषा आणि मराठी माणूस हेच अंतिम सर्वोच्च प्राधान्य आहे. या देशात भाषिक आणि प्रांतिक अस्मिता राहणारच आणि जेव्हा जेव्हा त्यावर घाला येईल, तेव्हा तेव्हा महाराष्ट्र त्वेषाने उभा राहील."












Click it and Unblock the Notifications