पक्ष फोडणारे अन् घेऊन जाणाऱ्यांना घरी बसवा; शिंदे-फडणवीसांवर राज ठाकरेंची तोफ धडाडली
Maharashtra Assembly Election 2024 : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांच्या प्रचाराला जोरदार सुरुवात झालेली आहे. मोदी शहांच्या सभा देखील महाराष्ट्रात सुरू आहेत. तर दुसरीकडे महाविकास आघाडीतील स्टार प्रचारक उद्धव ठाकरेंची देखील तोफ धडाडत आहे. तर एकला चलो चा नारा दिलेले मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची देखील तोफ सर्वत्र धडाडू लागली आहे. आज राज ठाकरे यांची कोकणात सभा पार पडली.यावेळी बोलताना त्यांनी पक्ष फोडणारे आणि पक्ष घेऊन जाणाऱ्यांना घरी बसवा, तोपर्यंत विकास होणार नाही, राज्याचा विकासाला गती मिळणार नाही, असे म्हणत राज ठाकरे यांनी शिंदे फडणवीसांसह मोदी शहांवर देखील निशाणा साधला.
राज ठाकरे म्हणाले की, सध्या राज्यातील राज्यकर्ते आणि राजकारणी कसेही वागत आहेत. मतदार देखील त्यांच्याकडे शांतपणे बघतात. जो पर्यंत तुम्ही त्यांच्यात बदल करत नाही, जो पर्यंत त्यांना घरी बसवत नाही, तोपर्यंत विकास होत नसल्याचे राज ठाकरे यांनी म्हटले आहे.

मागील पाच वर्षात या सर्व लोकांनी राजकारणात गोंधळ घातला आहे. काही या पक्षातून त्या पक्षात गेले. काही पक्ष सोबत घेऊनच दुसरीकडे गेले. आम्ही हे सर्व बरोबर केले असल्याचा त्यांचा समज जोपर्यंत चिडून, भडकवून दूर करत नाही, तोपर्यंत विकासाची स्वप्ने विसरून जा. त्यामुळे आधी या सर्वांना बाजूला करा आणि महाराष्ट्र निर्माण सेनेच्या राज्यभरातील उमेदवारांना विजयी करा, असे आवाहन राज ठाकरे यांनी केले आहे.
मतदारांनी निवडून दिलेल्या नेत्यांनी काय केलं
मतदारांनी निवडून दिलेल्या नेत्यांनी काय केले? असा प्रश्न त्यांना विचारला जात नसल्याची खंत देखील राज ठाकरे यांनी व्यक्त केली आहे. केवळ पर्यटनावर कोकणातील सिंधुदुर्गसह तीन जिल्हे हे अख्या महाराष्ट्र पोसू शकतात, अशा शब्दात राज ठाकरे यांनी कोकणवासीयांना साद घातली. केवळ पर्यटन या विषयावर गोवा राज्य चालवले जात असल्याचे राज ठाकरे यांनी म्हटले आहे.
कोकण आतापर्यंत विकसित का झाला नाही
कोकणामध्ये कोणते उद्योग धंदे आणले? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. आता उद्योगधंदे आणू अशी ग्वाही विद्यमान आमदार - खासदार देतात. मग इतके वर्ष त्यांनी काय केले? असा प्रश्न त्यांना का विचारला जात नाही, असे देखील राज ठाकरे यांनी म्हणाले आहे. कोकण इतका सुंदर करता येऊ शकतो, ते आतापर्यंत का झाले नाही? याचे कारण मतदारांनी त्याच - त्याच लोकांना आणि त्याच - त्याच पक्षांना निवडून दिले असल्याचे राज ठाकरे यांनी म्हटले आहे.
अजूनही कोकणात खड्डेच खड्डे
इथून आमदारांना आणि खासदार निवडून दिले की ते दिल्लीत जाऊन काय करतात? कोणते प्रश्न मांडतात? कोकणातील आतापर्यंत कोणते प्रश्न त्यांनी दिल्लीत मांडले? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. पर्यटन विषयी कोणते प्रश्न मांडले गेले? असा प्रश्न त्यांना विचारायला हवा, असेही ते म्हणाले. मागील सतरा अठरा वर्षापासून कोकणच्या रस्त्याचे कामे सुरू आहेत. मात्र अद्याप देखील आम्ही खड्ड्यातून जात असल्याचे राज ठाकरे यांनी म्हटले आहे.












Click it and Unblock the Notifications