Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

प्रकाश आबिटकर; शिवसेनेचा कोल्हापूर जिल्ह्यातील शिलेदार, सलग तिसऱ्यांदा विजयाची संधी

Radhanagari Assembly Constituency Prakash Abitkar : मुंबई, ठाणे, कोकण आणि मराठवाडा या परिसरात शिवसेनेला चांगले यश मिळालेले असले तरी कोल्हापूर, सांगली, सातारा या भागात आपले बस्तान बसवण्यासाठी शिवसेनेला प्रचंड कष्ट करावे लागले. सहकाराचे पसरलेले दाट जाळे आणि त्यावर असलेले काँग्रेस नेत्यांचे वर्चस्व यामुळे या परिसरातील आर्थिक नाड्या काँग्रेसकडेच होत्या. त्यामुळे शिवसेनेचा विचार रुजायला आणि संघटन विस्तार व्हायला खूप उशीर लागला. मुख्यत्वाने काँग्रेसमध्ये नाराज असलेल्या एखाद्या गटाला हाताशी धरूनच शिवसेनेने पश्चिम महाराष्ट्रात स्वतःचा विस्तार केला. मात्र तरीही या परिसरावर प्रमुख राजकीय वर्चस्व हे काँग्रेस आणि राष्ट्रवादी या दोन पक्षांचेच राहिले.

राधानगरी भुदरगड आणि आजरा या मतदारसंघावर प्रामुख्याने काँग्रेसचा वरचष्मा राहिलेला आहे. या मतदारसंघाने शेतकरी कामगार पक्ष, काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांना आलटून पालटून साथ दिली. शिवसेनेने वारंवार प्रयत्न करूनही या मतदारसंघात शिवसेना उमेदवाराची धाव कधीही दहा ते बारा हजारच्या पलीकडे जाऊ शकली नाही. मात्र प्रकाश आबिटकर यांच्या रूपाने या मतदारसंघावर शिवसेनेचा भगवा झेंडा पहिल्यांदा फडकला.

Radhanagari Assembly Constituency Prakash Abitkar Political Career

2014 आणि 2019 असे सलग दोन विजय त्यांनी मिळवले आणि मतदारसंघ वरची पकड कायम केली. राष्ट्रवादी काँग्रेसचे के पी पाटील या मतदारसंघातून सलग दोन वेळा निवडून आले होते. त्यांचा पराभव करून प्रकाश अबिटकर यांनी हा मतदारसंघ जिंकून घेतला. 2009 साली पहिल्यांदा विधानसभेच्या निवडणूक रिंगणात उतरलेल्या प्रकाश अबिटकर यांना 36 हजार मते मिळाली होती पण आपल्या संघटन कौशल्याच्या जोरावर त्यांनी 2014 साली विजयश्री खेचून आणली. आणि 2019 साली ही विजयश्री कायम राखली.

आमदारांच्या आग्रहाकडे उद्धव ठाकरेंचे दुर्लक्ष

2019 नंतर उद्धव ठाकरे यांनी भाजपची साथ सोडली आणि काँग्रेस राष्ट्रवादीशी आघाडी केली. या महाविकास आघाडीचे नेतृत्व देखील उद्धव ठाकरे यांनीच केले. महाविकास आघाडीच्या मंत्रिमंडळात उद्धव ठाकरे मुख्यमंत्री तर त्यांचे चिरंजीव आदित्य ठाकरे हे कॅबिनेट मंत्री होते. उद्धव ठाकरे यांचा हा निर्णय शिवसेनेच्या बहुतेक आमदारांना रुचला नव्हता.

ठाण्याचे आमदार प्रताप सरनाईक यांनी उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून महाविकास आघाडी मोडण्याचा आणि भाजपशी परत युती करण्याचा आग्रह धरला होता. परंतु उद्धव ठाकरे यांनी स्वतःच्या पक्षातील आमदारांच्या आग्रहाकडे दुर्लक्ष केले आणि मुख्यमंत्रीपद सांभाळणे पसंत केले.. त्यानंतर घडलेल्या नाट्यमय घडामोडींमध्ये एकनाथ शिंदे आणि बंडाचा झेंडा रोवला आणि त्यांच्या बंडाला शिवसेनेतील बहुसंख्य आमदार, मंत्री, जिल्हा परिषद सदस्य, नगरसेवक, जिल्हाप्रमुख यांनी साथ दिली. न्यायालय, निवडणूक आयोग आणि विधिमंडळाच्या अध्यक्षांसमोर देखील शिंदे यांचीच बाजू सरस ठरली आणि पक्ष तसेच चिन्ह एकनाथ शिंदे यांच्याकडे गेले. एकनाथ शिंदे यांना समर्थन देणाऱ्या आमदारांमध्ये राधानगरीचे आमदार प्रकाश अबिटकर यांचाही समावेश होता.

सहकारातील अनुभव

कोल्हापूर जिल्हा बँक ही राज्याच्या सहकारी क्षेत्रातील महत्त्वाची स्थापना मानली जाते. या बँकेत प्रकाश आबिटकर हे संचालक म्हणून निवडून आले आहेत तर गोकुळ सारख्या नामांकित दूध उत्पादक संस्थेमध्येही त्यांनी संचालक पद भूषवलेले आहे. त्यामुळे सहकार क्षेत्रातील खाचाखोचा प्रकाश आबिटकर यांना चांगल्याच माहिती आहेत. कोल्हापूर मधील आपल्या राजकीय अनुभवाचा आपल्या राधानगरी मतदारसंघाला राज्य सरकारच्या माध्यमातून फायदा मिळवून देण्याचा प्रयत्न प्रकाश आबिटकर यांनी केला.

कृषी आणि अभियांत्रिकी महाविद्यालयाची उभारणी

प्रकाश आबिटकर यांच्या प्रयत्नातून श्री आनंदराव अबिटकर कृषी आणि अभियांत्रिकी महाविद्यालयाची गारगोटी येथे उभारणी करण्यात आली आहे या माध्यमातून स्थानिक तरुणांना शिक्षणासाठी आपल्या गावाजवळच संधी निर्माण झाली आहे/ त्यांच्या मतदारसंघातील खानापूर ग्रामपंचायत येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आदर्श प्रशाला नव्या शाळा इमारतीसाठी दीड कोटी रुपये मंजूर करून देण्यात प्रकाश अबिटकर यांचा महत्त्वाचा वाटा आहे. त्याशिवाय गारगोटी ग्रामपंचायत येथे त्यांच्या पाठपुराव्यातून आंबेडकर भवन उभारण्यात आले आहे.

उपजिल्हा रुग्णालयाची उभारणी

राधानगरी आजरा आणि भुदरगड हा ग्रामीण मतदार संघ आहे. सहकाराचा या मतदारसंघावर चांगलाच पगडा आहे. मात्र ग्रामीण मतदारसंघ असल्यामुळे येथे वैद्यकीय सुविधांचा काहीसा अभाव आहे. हे लक्षात घेऊन प्रकाश आबिटकर यांनी कसबा तारळे येथे उपजिल्हा रुग्णालयाची बांधणी करून घेतली. राज्य सरकारने या उपजिल्हा रुग्णालयासाठी 23 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे.

सिंचनाच्या योजना प्राधान्य

प्रकाश आबिटकर यांचा मतदारसंघ हा कृषीप्रधान मतदार संघ आहे. त्यामुळे शेती सिंचन आणि सहकार या विषयांना प्राधान्य दिले जाते. प्रकाश आबिटकर यांनी मुदाळते मिनचे हा 17 किलोमीटर लांबीचा कालवा उभारण्यासाठी प्रयत्न केले. 24 कोटी रुपयांचा हा प्रकल्प असून त्याचा लाभ मतदार संघातील 3000 हून अधिक शेतकऱ्यांना होणार आहे. राधानगरी मधील धामणी धरणाचा परिसरातील शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे. भुदरगड गटात अभिटकर यांच्या प्रयत्नातून मेघोली बंधारा उभारण्यात आले असून त्यासाठी 44 कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. मतदारसंघातील वीस हजार हून अधिक लोकांना त्याचा लाभ होणार आहे. आबिटकर यांच्या प्रयत्नातून सोनवडे शिवडाव घाट रस्ता पूर्ण करण्यात आला आहे. या प्रकल्पासाठी तब्बल 12 कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. परिसरातील चार हजार हून अधिक लोकांची या रस्त्यामुळे सोय होणार आहे.

तिसऱ्या विजयाची संधी

प्रकाश आंबेडकर यांच्या रूपाने राधानगरी आजरा भुदरगड मतदारसंघात शिवसेनेची स्वतःची अशी ताकद निर्माण झाली आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे दोन्ही पक्ष परस्परांतील गटबाजीमुळे त्रासलेले आहेत. विरोधकांच्या नाराजीचा फायदा अबिटकर यांना आतापर्यंत मिळत आलेला आहे. यावेळी ही त्याची पुनरावृत्ती होईल आणि प्रकाश आबिटकर मोठ्या मताधिक्याने सलग तिसऱ्या वेळी विधानसभेत जातील असा दावा कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात राजकीय जाणकरांकडून करण्यात येत आहे.

More From
Prev
Next
Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+