Pune News पुण्यातील चाकण भागात 4 शालेय मुलांचा तलावात बुडून मृत्यू! पोहायला गेले अन् जीव गेला
Pune News : पुणे जिल्ह्यातील चाकण परिसरातील एका तलावात पोहायला गेलेल्या चार मुलांचा बुडून मृत्यू झाला आहे. ही सर्व मुलं शालेय विद्यार्थी होते. शनीवारी 31 मे 2025 रोजी ही दुर्घटना घडली. यासंदर्भातील ताजी माहिती आता समोर आली आहे.
पाण्याचा अंदाज न आल्याने ही दुर्घटना घडली आहे. चाकणजवळील कडाची वाडी येथील ही दुर्घटना आहे. मुलांच्या मृत्यूनंतर चाकण परिसरात शोककळा पसरली आहे.

चारही मुलं तेरा वर्षांची, एकाच भागातील रहिवासी
प्राप्त माहितीनुसार, ओंकार बाबासाहेब हंगे (वय 13, रा. मार्तंडनगर, मेदनकरवाडी, मुळ हंगेवाडी, ता. केज, जि. बीड), श्लोक जगदीश मानकर (वय 13, रा. मेदनकरवाडी, मुळ अमरावती), प्रसाद शंकर देशमुख (वय 13, रा. मेदनकरवाडी, मुळ मुखेड, जि. नांदेड) आणि नैतिक गोपाल मोरे (वय 13, रा. मेदनकरवाडी, मुळ झरी बाजार, ता. अकोट, जि. अकोला) अशी मृत मुलांची नावे आहेत.
पोहण्यासाठी गेले अन् जीव गेला
चारही तेरा वर्षांची कोवळी मुलं होती. शनीवारी सकाळी ते पोहण्यासाठी म्हणून चाकण परिसरातील कडाची वाडी गावच्या हद्दीत असलेल्या पाझर तलावात पोहण्यासाठी गेले होते. पाण्यात उतरल्यानंतर खोल अंदाज न आल्याने त्यांची दमछाक झाली व ते गटांगळ्या खात पाण्यात बुडाले.
पोलिसांकडून चौकशी, अकस्मात मृत्यूची नोंद
दरम्यान, चौघेही मुलं घरी न परतल्यामुळे कुटुंबियांनी त्यांचा शोध घेतला त्यावेळी पाझर तलावाजवळ मुलांचे कपडे दिसून आले. यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि स्थानिकांच्या मदतीने आपत्ती निवारण चमूकडून या मुलांना बाहेर काढण्यात आले. या मुलांची वैद्यकीय तपासणी केली असता ते मृत असल्याचे डाॅक्टरांच्या निदर्शनास आले. या घटनेनंतर पोलिसांनी पंचनामा केला असून संबंधित पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.












Click it and Unblock the Notifications