प्रवीण गायकवाडांवर हल्ला: विधानसभेत गदारोळ, फडणवीस म्हणाले...
अक्कलकोट येथे संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर काळी शाई फेकून हल्ला झाल्याची घटना घडली आहे. फत्तेसिंह शिक्षण संस्था आणि सकल मराठा समाज आयोजित एका कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी गायकवाड आले असताना, काही अज्ञात व्यक्तींनी त्यांच्या गाडीसमोर येत शाई फेकली आणि त्यांना गाडीतून खाली ओढून मारहाण केली. या हल्ल्यामागे भाजपशी संबंधित 'शिवधर्म फाउंडेशन'च्या कार्यकर्त्यांचा हात असल्याची माहिती समोर आली आहे.

या प्रकरणी दीपक काटे (भाजप युवा मोर्चा - राज्य सचिव), किरण साळुंखे, भवानेश्वर शिरगिरे यांच्यासह एकूण सात जणांविरोधात अक्कलकोट उत्तर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विधानसभेत विजय वडेट्टीवारांचा आक्रमक पवित्रा
या घटनेचे पडसाद विधानसभेत उमटले. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी या प्रकरणावर तीव्र नाराजी व्यक्त करत आक्रमक भूमिका घेतली. वडेट्टीवार म्हणाले की, "प्रवीण गायकवाड यांच्यावर हल्ला का झाला? त्यांचा दोष काय होता? त्यांच्या संस्थेचे नाव 'संभाजी' आहे, हेच एकमेव कारण होते का?" त्यांनी नमूद केले की, अनेक संस्था 'संभाजी' हे नाव वापरतात, पण त्यांच्यावर असे हल्ले होत नाहीत. संभाजी ब्रिगेड ही संघटना छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या विचारांवर काम करते आणि सर्व जाती-धर्माच्या लोकांना एकत्र आणते, असेही त्यांनी सांगितले. वडेट्टीवारांनी हल्ल्याचे वर्णन अमानुष असे केले, "त्यांना गाडीतून खाली ओढून, कॉलर पकडून मारहाण करण्यात आली, केवळ शाई फासली नाही."
"प्रवीण गायकवाडांचा जीव घेण्याचा प्रयत्न" - वडेट्टीवार
विजय वडेट्टीवार यांनी पुढे गंभीर आरोप करत म्हटले की, "हा प्रवीण गायकवाडांचा जीव घेण्याचा प्रयत्न होता." ज्या व्यक्तीने हा हल्ला केला, त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्याचे त्यांनी सांगितले. "त्याच्यावर पिस्तूल बाळगल्याप्रकरणी गुन्हा दाखल आहे आणि तो सख्या चुलत भावाच्या खून प्रकरणात तुरुंगात होता," असे वडेट्टीवार म्हणाले. गायकवाड यांना मारहाण करण्याचे कोणतेही कारण नव्हते, असेही त्यांनी ठामपणे सांगितले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृहखाते असताना अशा कार्यक्रमांमध्ये पोलीस बंदोबस्त का नव्हता, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. वडेट्टीवारांनी या प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली.
योग्य ती कारवाई केली जाईल - देवेंद्र फडणवीस
यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात शांतपणे उत्तर दिले. ते म्हणाले की, "मी स्वतः या प्रकरणाची संपूर्ण माहिती घेतली आहे." त्यांनी मान्य केले की, हल्लेखोरांनी "तुम्ही संभाजी नाव का ठेवलं? छत्रपती संभाजी का ठेवलं नाही?" असा वाद घालून गायकवाडांवर शाई फेकली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी पोहोचून प्रवीण गायकवाड यांना फिर्याद देण्याची विनंती केली होती, परंतु ते सुरुवातीला तयार नव्हते, असे फडणवीस यांनी सांगितले. तरीही पोलिसांनी फिर्याद नोंदवून तात्काळ आरोपींना अटक केली असून ते अजूनही पोलीस ताब्यात आहेत, असे त्यांनी स्पष्ट केले. "जी घटना घडली आहे, त्यानुसार योग्य ती कलमे लावून कारवाई केली जाईल," असे आश्वासन फडणवीस यांनी दिले.












Click it and Unblock the Notifications