Pratap sarnaik : मीरा भाईंदरमध्ये मराठी मोर्चात राडा, मंत्री सरनाईक यांच्यावर हल्ला; नेमकं काय घडलं
Mira Bhayandar Marathi Morcha : मुंबईत परप्रांतीय व्यापाऱ्यांनी काढलेल्या मोर्चाविरोधात मराठी भाषिकांकडून मीरारोडमध्ये मोर्चाची हाक देण्यात आली. या मोर्चात मनसे, उद्धवसेना, मराठी एकीकरण समितीसह विविध मराठी भाषिक संघटना रस्त्यावर उतरणार होत्या. मात्र या मोर्चाला पोलिसांकडून परवानगी नाकारण्यात आली. त्याशिवाय मोर्चाचे नेतृत्व करणाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
अनेकांना नोटीस बजावल्या होत्या. 10 वाजता मोर्चा स्थळी कार्यकर्ते जमू लागले तेव्हा पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड सुरू झाली. त्यातूनच मीरारोडमध्ये संघर्ष वाढला. या सर्व विरोधाला झुगारून मराठी माणसांनी मोठ्या संख्येने मोर्चाला हजेरी लावली आणि मोर्चाला सुरूवात झाली.
मीरा भाईंदर येथे मराठी मोर्चा काढण्यात आला. मराठी एकीकरण समितीसह विविध राजकीय पक्षाच्या नेत्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी या मोर्चात सहभाग घेतला. मोर्चाआधी पोलिसांनी केलेल्या धरपकडीबद्दल संताप व्यक्त करत मंत्री प्रताप सरनाईक या मोर्चात सहभागी झाले.

सरनाईकांच्या दिशेने भिरकावली बॉटल
मंत्री प्रताप सरनाईक यांनी पोलिसांना अटक करण्याचे आव्हान देत मोर्चात सहभाग घेतला. पण, मोर्चाच्या ठिकाणी पोहोचताच प्रताप सरनाईक यांच्याविरोधात काही आंदोलकांनी घोषणाबाजी केली. प्रताप सरनाईक गो बॅक, जय गुजरात अशा घोषणा आंदोलकांनी सरनाईकांविरोधात दिल्या.
मराठा एकीकरण समितीचे प्रमुख गोवर्धन देशमुख यांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. त्यांना घेऊन सरनाईक मोर्चात सहभागी झाले. त्यावेळी घोषणाबाजी करत एका व्यक्तीने त्यांच्या दिशेने पाण्याची बॉटल फेकून मारली. त्यानंतर गोंधळ निर्माण झाला. पोलिसांनी त्यांना तातडीने गर्दीतून बाहेर नेले. त्यानंतर ते परत निघून गेले.
सरनाईकांची मनसे, ठाकरेंच्या शिवसेनेवर टीका
"ज्यांना राजकारण करायचं आहे, त्यांना राजकारण करू द्या. पंरतु, बाहेरची लोक शहरात येऊन गोंधळ घालण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे अशा पद्धतीने बेकायदेशीरित्या पोलिसांनी कुणाला अटक केली असेल, तर प्रताप सरनाईक सहन करणार नाही. हे उबाठा आणि मनसेचे राजकारण चालूच राहणार आहे. पण, शेवटी प्रताप सरनाईक मीरा भाईंदर शहरातील मराठी लोकांसाठी आहे, हे सिद्ध झाले आहे", असे प्रताप सरनाईक म्हणाले.
मनसेचे नेते अविनाश जाधव या घटनेबद्दल बोलताना म्हणाले की, 'अशी कुठली घटना घडली असेल, तर ती चुकीचे आहे. मी सकाळपासून त्यांना ऐकतोय. त्यांची भूमिका मला आवडली. मोर्चाचा आयोजक म्हणून मला ही घटना आवडलेली नाही.'
राजन विचारेंनी सरनाईकांना म्हटले- महाशय!
मोर्चात मार्गदर्शन करताना ठाकरे गटाचे नेते तथा माजी खासदार राजन विचारे म्हणाले की, या आंदोलनात आत्ताच एक महाशय आले होते. परंतु, त्यांना मला सांगायचे आहे की, तुमच्यात जर दम असेल तर आधी राजीनामा द्या, मग मराठी माणसासाठी रस्त्यावर या, तुम्हीच वाद लावायचा, अन् सहभागी व्हायचे अशी नाटकं करू नका, मराठी माणसाची ताकद काय आहे, हे संपूर्ण देशाने चार दिवसांपूर्वीच पाहिले आहे.












Click it and Unblock the Notifications