जैस्वाल यांना मतदार 'नारळ' देणार की पुन्हा 'बाग' फुलवणार? एमआयएम ठरणार विजयी मार्गात काटा!
Pradeep Jaiswal challenged by Imtiaz Jalil Kishanchand Tanwani :छत्रपती संभाजीनगर शहरातील विधानसभेचा मध्य मतदारसंघाचे प्रतिनिधित्व शिवसेनेचे (शिंदे गट) प्रदीप जैस्वाल करीत आहेत. या मतदारसंघातील 'नारळीबाग' म्हणजे या मतदारसंघाची राजधानीच आहे. याच भागात जैस्वाल यांचे कार्यालय आहे. या विधानसभा निवडणुकीतही महायुतीकडून तेच उमेदवार असतील, हे निश्चित आहे. त्या दृष्टीने पक्षाने आणि त्यांनीही तयारी सुरू केली आहे. पण, यावेळी शिवसेनेची ताकद दोन गटांत विभागली गेली. त्यामुळे जैस्वाल यांना मतदार 'नारळ' देणार की त्यांची 'बाग' पुन्हा पुरवणार हे बघणे औत्सुक्याचे असून, यावेळी या ठिकाणी 2009 प्रमाणे तिरंगी लढत पाहायला मिळणार आहे.
आमदार जैस्वाल हे ज्येष्ठ आणि अनुभवी राजकारणी आहेत. शिवसेना फुटीवेळी त्यांनी एकनाथ शिंदे यांचे नेतृत्व स्वीकारले. मागील 35 वर्षांपासून ते राजकारण आहेत. या साडेतीन दशकात ते महापौर, खासदार, आमदार झाले आहेत.

2009 आणि 2019 असे दोन वेळा ते मध्य मतदारसंघातून निवडून आले आहेत. दरम्यान, 2014 च्या निवडणुकीत एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांच्याकडून त्यांचा पराभव झाला होता. पण, नंतर 2019 च्या निवडणुकीत एमआयएमचे माजी गट नेता नासीर सिद्दिकी यांना मात देत ते विधानसभेत पोहोचले. परंतु या निवडणुकीत त्यांची वाट सोप्पी दिसत नाही.
रस्त्यांची दुरवस्था, आठ-नऊ दिवसांतून एकदा होणारा पाणी पुरवठा यामुळे मतदारांमध्ये रोष आहे. दुसरीकडे महाविकास आघाडीकडून ठाकरे गट या मतदारसंघात प्रबळ दावेदार आहे. त्यामुळे हिंदुत्ववादी मताच्या विभाजनाची भीतीही त्यांच्यापुढे आहे. परंतु, लाडकी बहीण योजना, शहरासाठी नवीन पाणीपुरवठा योजना या जैस्वाल यांच्यासाठी जमेच्या बाजू ठरू शकतात.
थेट मुद्दा हिंदू-मुस्लीम
या मतदारसंघात 40 टक्के मुस्लिम तर 40 हिंदू मतदार आहेत. 20 टक्के दलित मतदार आहेत. विजयासाठी त्यांची मतं निर्णयक ठरणार आहेत. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीचा विचार केला तर या मतदारसंघातून माजी खासदार इम्तियाज जलील यांना 26 हजार 197 मतांची आघाडी मिळाली होती. त्यामुळे एमआयएमने या मतदारसंघावर लक्ष केंद्रित केले आहे.
आदर्श बॅंक घोटाळा, खासदार असताना इम्तियाज जलील यांनी लोकसभेत मांडलेले प्रश्न आणि मुस्लिम मतदार आदी गणिते बांधून एमआयएम या मतदारसंघातून समोरे जाणार आहे. दरम्यान, ठाकरे गटाकडूनही प्रबळ उमेदवार दिला जाईल. त्यामुळे यावेळची निवडणूक तिरंगी होणार हे निश्चित आहे.

हे आहेत संभाव्य उमेदवार
महायुतीकडून शिवसेनेचे प्रदीप जैस्वाल हेच उमेदवार असतील, हे जवळपास निश्चित आहे. त्यांच्या विरोधात शिवसेनेकडून (ठाकरे गट) माजी महापौर नंदकुमार घोडिले, किशनकुमार चंदवाणी, बंडू ओक आणि बाळासाहेब थोरात यांच्यापैकी एक उमेदवार असणार आहे. एमआयएमकडून इम्तियाज जलील, माजी जिल्हाध्यक्ष समीर बिल्डर आणि माजी महापालिका गटनेते नासीर सिद्दिकी हे दावेदार आहेत.
जैस्वाल यांनी केली होती बंडखोरी
2004 च्या विधानसभा निवडणुकीत जैस्वाल यांचा पराभव झाला होता. त्यामुळे शिवसेनेकडून 2009 च्या निवडणुकीत त्यांना उमेदवारी नाकारण्यात आली होती. मात्र, त्यांनी बंडखोरी करीत अपक्ष निवडणूक लढवली आणि विजय मिळवला. त्यावेळी अपक्ष प्रदीप जैस्वाल यांना 49,965, राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सयद अब्दुल कादीर अमीर 41,581 तर शिवसेनेचे विकास जैन यांना 33,988 मतं मिळाली होती.
२2014 च्या निवडणुकीत शिवसेनेकडून जैस्वाल उमेदवारी मिळाली. पण, ते पराभूत झाले होते. 2019 मध्ये शिवसेनेच्या तिकिटावर ते विजयी झाले.












Click it and Unblock the Notifications