'विरोधकांच्या षडयंत्राचा बळी ठरले, पण आता वाघीण जखमी...' अर्ज मागे घेताना पूजा जाधवांना फुटला टाहो!
Pooja More : पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत प्रभाग क्रमांक 2 मधून भाजपची उमेदवारी जाहीर झालेल्या पूजा जाधव यांनी नाट्यमयरीत्या आपली उमेदवारी मागे घेतली आहे. सोशल मीडियावरील टोकाची टीका आणि विरोधकांनी रचलेल्या षडयंत्रामुळे हा निर्णय घेतल्याचे सांगताना पूजा जाधव यांना पत्रकार परिषदेत रडू कोसळले. "मी हिंदू आहे आणि हिंदुत्वासाठीच काम करणार, झालेल्या चुकांबद्दल माफी मागते," अशी भावनिक साद त्यांनी यावेळी घातली.

संघर्षाचा प्रवास आणि दाटून आलेला कंठ
पत्रकार परिषदेत बोलताना पूजा जाधव यांनी आपल्या १०-१२ वर्षांच्या राजकीय संघर्षाचा पाढा वाचला. बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील एका सामान्य शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या पूजा यांनी वयाच्या २१ व्या वर्षी पंचायत समिती सदस्य म्हणून काम केले.
"माझे वडील सरपंचही नव्हते, पण शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी मी लाठ्या-काठ्या खाल्या. अंगावर पाच गुन्हे ओढवून घेतले. वकिलांची फी भरायला पैसे नसायचे, अशा स्थितीतही चळवळ जिवंत ठेवली," असं म्हणताना त्यांना अश्रू अनावर झाले.
काश्मीर हल्ला आणि 'त्या' व्हायरल व्हिडिओचे सत्य
पूजा जाधव यांच्यावर ज्या व्हायरल व्हिडिओमुळे टीका झाली, त्याबद्दल त्यांनी स्पष्टीकरण दिले. लग्नानंतर अवघ्या काही दिवसांत त्या काश्मीरला गेल्या होत्या, तिथे दहशतवादी हल्ला झाला होता.
"तिथे दहशतवाद्यांनी धर्म विचारून हल्ला केला होता. मी तात्काळ दिलेली प्रतिक्रिया ही त्यावेळच्या भीषण परिस्थितीवर होती. लोकांना बाहेर काढण्यासाठी मी स्वतः देवेंद्र फडणवीस यांना व्हिडिओ कॉल केला होता. मात्र, माझ्या विधानाचा चुकीचा अर्थ लावून मला 'विक्टिम' बनवण्यात आले," असे त्यांनी स्पष्ट केले.
'जखमी वाघीण अधिक जोमाने काम करते'
उमेदवारी अर्ज मागे घेताना पूजा जाधव यांनी विरोधकांना इशाराही दिला. त्या म्हणाल्या, "सामान्य कुटुंबातील मुलं उमेदवारी मिळवतात हे अनेकांना सहन होत नाही. माझ्या पतीचे राजकीय आयुष्य माझ्यामुळे धोक्यात आले असेल तर मी त्यांचीही माफी मागते. पण लक्षात ठेवा, वाघीण जखमी झाली की ती अधिक जोमाने शिकार करते. आता मी भाजप जिथे सांगेल तिथे अधिक ताकदीने काम करणार आहे."
पती धनंजय जाधव यांची खंबीर साथ
यावेळी त्यांचे पती धनंजय जाधव यांनीही आपली भूमिका मांडली. ते म्हणाले की, "माझी पत्नी सोशल मीडियाच्या गैरवापराची बळी ठरली आहे. तिच्या तोंडी असे शब्द घालण्यात आले जे तिचे नव्हतेच. आम्ही टू-व्हीलरपासून इथपर्यंतचा संघर्ष प्रामाणिकपणे केला आहे. प्रभाग क्रमांक १ आणि २ मध्ये आमची स्थिती भक्कम होती, तरीही पक्षाच्या आदेशाचा मान राखून आम्ही माघार घेत आहोत."












Click it and Unblock the Notifications