मोठी बातमी! जुनी पीक विमा योजनाच राबवणार! 1 रुपयात पीक विम्यावर कृषिमंत्र्यांनी स्पष्टच सांगितलं
Old crop insurance scheme : राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक मोठी बातमी समोर आली आहे. राज्य सरकार जुनी पीक विमा योजना राबवणार आहे. एक रुपयात विमा योजनेचा शेतकऱ्यांना त्या मानाने हवा तसा फायदा झाला नसून विमा कंपन्यांना तब्बल सुमारे साडे सात हजार कोटी रुपयांचा नफा झाला आहे. त्यामुळेच जुनी पीक विमा योजना राबवत असल्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी आज दिली.
विधानसभेत आज याबाबची लक्षवेधी सूचना राजेश विटेकर यांनी उपस्थित केली होती, त्यावर रोहित पवार यांनी उप प्रश्न विचारले. त्यानंतर लक्षवेधी प्रश्नावर कृषिमंत्री कोकाटे यांनी दिलेल्या उत्तरात त्यांनी ही माहिती दिली.

सरकारचे पैसे वाचणार
जुन्या विमा योजनेमुळे सरकारचे साधारण पणे साडे चार ते पाच हजार कोटी रुपये वाचणार आहे, त्यातून सुमारे पंचवीस हजार कोटी रुपयांची कृषी क्षेत्रात भांडवली गुंतवणूक करण्यात येणार आहे असे कोकाटे म्हणाले, यासह सध्या साडे सातशे कोटी रुपयांची निविदा विमा कंपन्यांकडून आली आहे अशी माहिती देखील मंत्री कोकाटे यांनी दिली.
प्रत्येक गावात हवामान केंद्र उभारणार
कृषिमंत्री कोकाटे म्हणाले, प्रत्येक गावात वेगळे हवामान अंदाज केंद्र उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, त्यामुळे त्या गावाच्या आजूबाजूच्या वीस किलोमीटर परिसरातील हवामानाचा अंदाज त्यात दिसून येईल. त्यातून फळ विमा योजनेला आवश्यक निकष लागू करणे सोपे होईल. याबाबची लक्षवेधी सूचना रोहित पाटील यांनी उपस्थित केली होती, त्यावर मंत्री कोकाटे बोलत होते.
नुकसान भरपाईची सर्व शेतकऱ्यांना मदत- कोकाटे
कृषि मंत्री कोकाटे यांनी दिलेल्या उत्तराने विरोधी सदस्यांचं समाधान होत नव्हतं त्यामुळे ते आक्रमक झाले होते. पीठासन अधिकारी समीर कुणावार यांनी हस्तक्षेप करत मंत्री कोकाटे यांना पुन्हा उत्तर देण्यास सांगितलं, ज्या शेतकऱ्यांनी अवकाळी पावसाने नुकसान झाल्याची तक्रार केली आहे त्या सर्व शेतकऱ्यांना मदत दिली जाईल अशी माहिती मंत्री कोकाटे यांनी दिली. अधिक समाधान होण्यासाठी त्यांची बैठक घेण्यात येईल असेही ते म्हणाले.












Click it and Unblock the Notifications