दादांच्या निधनानंतर NCPत मोठी घडामोड! 'सुनेत्रा पवारांना उपमुख्यमंत्री करा'; नेत्यांचा प्रस्ताव
Sunetra Pawar Deputy CM proposal : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. दादांच्या अकाली एक्झिटमुळे केवळ महायुती सरकारमधील महत्त्वाच्या पदांचा प्रश्नच नव्हे, तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) अस्तित्वाचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे. अशातच, राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ नेत्यांनी आज 'वर्षा' निवासस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन एक खळबळजनक प्रस्ताव मांडला आहे.

सुनेत्रा पवारांकडे उपमुख्यमंत्रिपद? राष्ट्रवादीचा नवा 'प्लॅन'
अजित पवार यांच्याकडे महायुती सरकारमध्ये उपमुख्यमंत्रिपदासह अर्थ, उत्पादन शुल्क आणि क्रीडा यांसारख्या महत्त्वाची खात्यांची जबाबदारी होती. आता या रिक्त पदावर कोणाची वर्णी लागावी, याबाबत राष्ट्रवादीच्या गोटात खल सुरू आहे. प्राप्त माहितीनुसार, सुनेत्रा पवार यांनाच उपमुख्यमंत्री करावे, अशी आग्रही मागणी पक्षातील ज्येष्ठ नेत्यांनी केली आहे.
आज सकाळी छगन भुजबळ, हसन मुश्रीफ, प्रफुल पटेल आणि सुनील तटकरे हे दिग्गज नेते मुख्यमंत्री फडणवीस यांच्या भेटीसाठी 'वर्षा'वर पोहोचले. रात्रीच्या भेटीनंतर आज पुन्हा झालेल्या या चर्चेत सुनेत्रा पवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्याची विनंती करण्यात आली आहे.
पक्षांतर्गत रचनेत फेरबदल: प्रफुल पटेलांकडे राष्ट्रीय अध्यक्षपद?
अजितदादांच्या पश्चात पक्षाचे नेतृत्व कोणाकडे जाणार, यावरही चर्चा अंतिम टप्प्यात आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्याचे कार्याध्यक्ष प्रफुल पटेल यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी वर्णी लागण्याची दाट शक्यता आहे. अजितदादांचे पुत्र पार्थ पवार यांनीही आपली भूमिका मांडली आहे. सुनेत्रा वहिनींना सरकारमध्ये संधी देतानाच, स्वतःला राज्यसभेवर पाठवण्यात यावे, असा प्रस्ताव त्यांनी नेत्यांपुढे ठेवल्याचे समजते.
विलीनीकरण की स्वतंत्र अस्तित्व? 'वेगळी चूल' मांडण्याचे संकेत
गेल्या काही दिवसांपासून दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट आणि अजित पवार गट) विलीनीकरण होईल, अशी चर्चा राजकीय वर्तुळात होती. मात्र, आता राष्ट्रवादीच्या नेत्यांनी आपले स्वतंत्र अस्तित्व टिकवून ठेवण्यावर भर दिला आहे. "विलीनीकरणाची चर्चा अजित पवार हयात असताना सुरू होती, मात्र आता पक्षाचे स्वतंत्र अस्तित्व टिकवून ठेवण्याकडे नेत्यांचा कल आहे. या संपूर्ण प्रकरणावर अंतिम निर्णय ज्येष्ठ नेते शरद पवार घेणार आहेत," अशी माहिती समोर येत आहे.
'सहयोग' ते 'वर्षा': बैठकांचा सिलसिला
अजित पवार यांना विद्या प्रतिष्ठानमध्ये निरोप दिल्यानंतर लगेचच हालचालींना वेग आला. 'सहयोग' बंगल्यावर सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांच्यासोबत नेत्यांची प्रदीर्घ चर्चा झाली. या चर्चेचा मसुदा घेऊनच आज नेते मुख्यमंत्र्यांना भेटले आहेत.
पुढील आव्हाने:
अर्थखाते कोणाकडे? अजितदादांकडे असलेले महत्त्वाचे अर्थखाते सुनेत्रा पवार यांना मिळणार की भाजप स्वतःकडे ठेवणार?
महायुतीचा समन्वय : आगामी निवडणुकांच्या तोंडावर ही नवीन समीकरणे महायुतीसाठी कितपत फायदेशीर ठरतील?












Click it and Unblock the Notifications