दिवाळीच्या पहिल्याच दिवशी महाराष्ट्र सुन्न करणारी दुर्घटना; पिकअपला भीषण अपघात; 6 ठार, 10 गंभीर जखमी
Nandurbar Chandshail Ghat Accident News : ऐन दिवाळीच्या काळात महाराष्ट्राला सुन्न करणारी एक भीषण दुर्घटना नंदूरबार जिल्ह्यात घडली आहे. नंदूरबार जिल्ह्यातील चांदशैली घाटात शनिवारी भाविकांच्या पिकअप व्हॅनचा भीषण अपघात झाला, ज्यात सहा जणांचा जागीच मृत्यू झाला असून अनेकजण जखमी झाले आहेत.
प्राथमिक माहितीनुसार, या पिकअप गाडीतील भाविक अस्तंबा यात्रेसाठी गेले होते. यात्रा संपवून हे भाविक आपल्या गावी परतत असताना काळाने त्यांच्यावर घाला घातला. चांदशैली घाटातून गाडी जात असताना चालकाचे नियंत्रण सुटले आणि पिकअप गाडी पलटी झाली.

मृत्यूचा आकडा वाढण्याची भीती
या भीषण अपघातात आतापर्यंत सहा जणांचा मृत्यू झाला असून, सुमारे १० जणांची प्रकृती गंभीर आहे. गाडी पलटी झाल्यामुळे वाहनाच्या मागच्या भागात बसलेले लोक थेट खाली दबले गेले आणि अनेकांना जबर मार लागला.
घटनास्थळावरील दृश्य अत्यंत भयावह होते. जखमी झालेल्या १० जणांची प्रकृती गंभीर असल्यामुळे दुर्घटनेतील मृतांचा आकडा वाढण्याची दाट शक्यता व्यक्त होत आहे.
अपघातानंतर तातडीने पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी बचावकार्य सुरू केले. पोलिसांनी जखमींना पिकअप व्हॅनमधून बाहेर काढून तातडीने तळोदा येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.
पिकअपचा वेग जास्त अन् तीव्र वळण
प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार, वाहनाचा वेग जास्त होता आणि घाटात तीव्र वळण असल्याने चालकाचे नियंत्रण सुटले. त्यामुळे गाडी पलटी झाली आणि मागील बाजूस बसलेले लोक खाली दबले गेले. या अपघाताचे दृश्य अत्यंत भयावह होते, असे पोलिसांनी सांगितले.

वारंवार होणाऱ्या अपघातांमुळे प्रश्नचिन्ह
राज्यातील प्रमुख महामार्गांवर आणि घाटमाथ्यांवर वारंवार होणाऱ्या अपघातांमुळे सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. अपघातांनी पुन्हा एकदा वेगावर नियंत्रण आणि जागरूक वाहनचालकांची गरज अधोरेखित केली आहे. प्रशासनाने अशा भागांत वारंवार गस्त, चेतावणी फलक आणि वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी स्थानिकांकडून होत आहे.
दुसरी मोठी दुर्घटना: समृद्धी महामार्गावर
एकाच दिवशी अपघाताची दुसरी मोठी घटना समृद्धी महामार्गावर घडली आहे. नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गावर वाशिम जिल्ह्यातील मालेगाव ते जऊळका दरम्यान कॉरिडॉर क्रमांक २३२ वर एका इनोव्हा कारचा भीषण अपघात झाला. मुंबईवरून नागपूरकडे जात असताना इनोव्हा गाडीच्या चालकाला डुलकी लागल्यामुळे हा अपघात झाला. या भीषण अपघातात म्यानमार देशातील दोन जणांचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.












Click it and Unblock the Notifications