मराठवाड्यात पावासाचे थैमान! नांदेडमध्ये पुरात 3 महिलांचा मृत्यू; उदगीर तालुक्यात 70 घरात पाणी शिरलं
Nanded Latur News Heavy rains in Marathwada 3 women killed in floods : मराठवाड्यातील लातूर, नांदेड जिल्ह्यात पूरस्थिती असून नांदेड जिल्ह्यात आलेल्या पुरात तीन महिलांचा मृत्यू झाला तर लातूर जिल्ह्याला अतिवृष्टीचा फटका बसला, काही गावात वीज गुल झाली तसेच उदगीर तालुक्यातील धडकनाळ आणि बोरगावमध्ये अतीवृष्टीनंतर शेत जमिनीसह अनेक जनावरे वाहून गेली आहेत, ७० घरातील २१० नागरिक सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे.

नांदेड जिल्ह्यात पुरात अडकलेल्या तीन महिलांचा मृत्यू
नांदेड जिल्ह्यात उद्भवलेल्या पूर परिस्थितीत सोमवारी तीन महिलांचा मृत्यू झाला. दोघांचा शोध सुरू आहे. मुखेड तालुक्यातील हसनाळ येथील ललिताबाई भोसले (वय ६०), भिमाबाई हिरामण मादळे (वय ६५) आणि गंगाबाई गंगाराम मादाळे (वय ६५) या तीन महिलांचे मृतदेह सापडले असून पिराजी थोटवे आणि चंद्रकला विठ्ठल शिंदे या दोघांचा शोध घेतला जात आहे.
नांदेडमध्ये पुरामुळे पाच जणांचा बळी
नांदेड जिल्ह्यात पूर परिस्थितीत बचाव कार्याला वेग यावा यासाठी नांदेड जिल्ह्यात भारतीय सैन्य दलास पाचारण करण्यात आले आहे. छत्रपती संभाजीनगर येथून सैन्य दलाची ही एक तुकडी देगलूरमध्ये सायंकाळी दाखल झाली आहे. सैन्य दलाच्या तुकडीमुळे जिल्ह्यात पूर परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्याच्या कार्याला गती मिळणार आहे.जिल्ह्यात आतापर्यंत पुराचे पाच बळी गेले आहेत. जिल्ह्यात तीन दिवसांपासून पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे.
या पूर परिस्थितीत बचाव कार्यासाठी एसडीआरएफसह आता सैन्य दलालाही पाचारण करण्यात आले आहे. सैन्य दलाची एक तुकडी छत्रपती संभाजीनगर येथून देगलूर येथे पोहोचली आहे. नांदेड जिल्ह्यात निर्माण झालेल्या पूर परिस्थितीवर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतः लक्ष ठेवून आहेत. त्यांनी नांदेड जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क साधून परिस्थितीची माहिती घेतली त्याचवेळी आवश्यक त्या सूचनाही प्रशासनाला दिल्या आहेत.
लातूर जिल्ह्यात अतिवृष्टीचा फटका
लातूर जिल्ह्यातील उदगीर तालूक्यात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे बोरगाव व धडकनाळ या दोन गावातील वीजयंत्रणेला मोठा फटका बसला आहे. वीजतारा, पोलसह रोहित्रे कोसळून दोन्ही गावांचा वीजपुरवठा काल रात्रीपासून खंडीत झाला आहे. महावितरणच्या विभागीय कार्यालयाने याची त्वरीत दखल घेत भरपावसात वीजयंत्रणा पुर्ववत सुरू करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू केले आहेत. लातूर शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या धाराशिव-बीड जिल्ह्याच्या सीमेवरील मांजरा धरणाचे ०६ दरवाजे ०.२५ मीटरने काल दुपारी पुन्हा एकदा उघडण्यात आले होते. तर तेरणा नदीवरील निम्न तेरणा प्रकल्पाचे दुपारी ०४ आणि रात्री ०२ दरवाजे रात्री उघडण्यात आले होते. त्यामुळे मांजरा आणि तेरणा नदीला मोठा पूर येण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांनी केलं आहे.
जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचना
लातूर जिल्ह्यातील पूर परिस्थितीचा आढावा जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी जिल्ह्यातील सर्व शासकीय यंत्रणांच्या क्षेत्रीय अधिकाऱ्यांसमवेत दूरदृश्य प्रणालीद्वारे झालेल्या बैठकीत घेतला. याशिवाय मांजरा, तेरणा, तावरजा, रेणा नदी काठच्या गावात पुढील काही दिवसांत पूरपरिस्थिती उद्भवल्यास त्याचा सामना करण्यासाठी सज्ज राहण्याच्या सूचना जिल्हाधिकारी यांनी प्रशासकीय यंत्रणेला दिल्या आहेत.
धाराशीव जिल्ह्यात कालपासून रिपरिप
धाराशिव शहरांनी जिल्ह्यात काल दिवसभर पावसाची रिमझिम सुरू होती या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले होते. मागील काही दिवसांपासून सतत होत असणाऱ्या पावसामुळे जिल्ह्यातील तेरणा मांजरा निम्न तेरणा हे मोठे मध्यम प्रकल्प 100% भरले असून अनेक नदी नाल्यांना पूर येऊन गेला आहे जिल्ह्यात वार्षिक सरासरीच्या जवळपास साडेचारशे मिलिमीटर पाऊस झाला आहे. जिल्ह्यात ४१९.७ मिलिमीटर इतका पाऊस जिल्ह्यात वार्षिक सरासरीच्या तुलनेत झाला आहे.
परभणीत रात्री मुसळधार पाऊस
परभणी जिल्ह्यातील आज रात्री रात्रभर मुसळधार पाऊस पडला असून सध्या ही रिमझिम पाऊस सुरू आहे . रात्री 8 वाजता येलदरी धरणाचे 8 दरवाजे 2 मीटरने वर उचलल्याने सध्या पूर्णा नदी पात्रात 64 हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने पूर्णा नदीच्या पुराच्या पाण्यात वाढ होत आहे. दरम्यान धरणाच्या ठिकाणी पुराचे पाणी पाहण्यासाठी आणि रील्ससाठी नागरिकांची मोठी गर्दी वाढल्याने सुरक्षेसाठी येलदरी धरण प्रशासनाने अतिरिक्त पोलिस बंदोबस्त तैनात करण्याची मागणी परभणी पोलिस अधीक्षकांकडे पत्रकाव्दारे केली आहे.
छत्रपती संभाजीनगर- विभागिय आयुक्तांचे सतर्कतेचे आवाहन
१९ ऑगस्ट २०२५ रोजी धाराशिव वगळता सर्व जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला असल्याने नागरिकांनी व प्रशासनाने सतर्क रहावे, असे आवाहन विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांनी केले आहे. छत्रपती संभाजीनगर विभागात आज रोजी ३२.३० मि.मी. पर्जन्यमानाची नोंद झाली असून, विभागातील ५७ मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली आहे.












Click it and Unblock the Notifications