नागपूर पेटलं! औरंगजेब कबरीवरुन वाद?, दोन गटात भयंकर राडा, गाड्यांची जाळपोळ, जमावाकडून दगडफेक!
Nagpur Crime News : नागपूर शहरातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. एकीकडे औरंगजेबाच्या कबरीवरून अवघ्या महाराष्ट्राचे वातावरण तापलेले आहे. अशातच नागपूर शहरातील महाल परिसरात सोमवारी रात्री 8 च्या सुमारास मोठा राडा झाला. त्यात प्रामुख्याने दोन विशिष्ट समुदायाकडून एकमेकांवर दगडफेक करण्यात आली आहे. तसेच गाड्यांचीही जाळपोळ करण्यात आली आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झालेत. त्यांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडून स्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. पण जमावाने पोलिसांवरच दगडफेक करत त्यांच्या गाड्या पेटवून दिल्यात.
यामुळे नागपुरात सध्या तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, पोलिसांनी परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी जादा कुमक मागवली आहे.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडून शांतता राखण्याचे आवाहन करण्यात आले आहे. नागपुरातील महाल भागात तरुणांच्या दोन गटांमध्ये झालेल्या वादानंतर तणावपूर्ण स्थिती निर्माण होणे दुर्दैवी आहे. नागपूरकरांनी शांतता बाळगून प्रशासनाला परिस्थिती हाताळण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन नितीन गडकरी यांच्याकडून करण्यात आले आहे.
नेमके काय घडले?
मिळालेल्या माहितीनुसार, संध्याकाळी सात ते साडेसातच्या दरम्यान मोठ्या संख्येने एक गट शिवाजी चौकाच्या जवळ पोहोचला होता. या गटाने घोषणाबाजीला सुरुवात केली. विश्व हिंदू परिषदेने दुपारी केलेल्या आंदोलनासंदर्भात त्यांचा रोष होता. घोषणाबाजी सुरू होताच परिसरातील दुसऱ्या गटानेही घोषणाबाजी सुरू केली. त्यानंतर पोलिसांना पाचारण करण्यात आले.
पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत घोषणाबाजी करणाऱ्या दोन्ही गटांना वेगवेगळे केले. त्यानंतर पोलिसांनी सर्वांना शिवाजी चौकावरून चिटणीस पार्कच्या दिशेने मागे ढकलले. यानंतर दोन्ही गटात तुफान राडा झाला आणि दगडफेक करण्यात आली. या दगडफीमध्ये अनेक वाहनांचे नुकसान झाले आहे. दगडफेकीसोबत जाळपोळही करण्यात आली.
पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतल्यानंतर जमावाकडून पोलिसांच्या दिशेनेही दगड भिरकावण्यात आले. यामध्ये दोन पोलिस कर्मचारी आणि काही नागरिक जखमी झाल्याची माहिती आहे. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांकडून शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. पोलिसांनी दंगा काबू पथकाला पाचारण केले आहे.
नागपूरच्या नागरिकांना विनम्र आवाहन. pic.twitter.com/2jcCv4AaVN
— Nitin Gadkari (@nitin_gadkari) March 17, 2025
पोलीस दगडफेकीत जखमी
नागपुरातील परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या. मात्र त्यानंतरही तणाव कमी झाला नाही. दंगलखोरांनी पोलिसांनाही लक्ष्य केले. त्यात अनेक पोलीस जखमी झाले आहे. दोन्ही गटातील शेकडो लोक रस्त्यावर आहेत. पोलिसांवर तुफान दगडफेक केली जात आहे. दोन जेसीबी जाळण्यात आले आहे. अनेक वाहने जाळली आहेत.
नाईलाजाने अतिरिक्त बळाचा वापर
नागपूर हे अमनचे शहर आहे. त्यामुळे याला कुठेही गालबोट लागता कामा नये, अशी आमची इच्छा आहे. त्यामुळे अतिरिक्त बळाचा वापर करण्याची आमची इच्छा नाही. परंतु, नाईलाजाने आम्हाला तो करावा लागतोय, अशी प्रतिक्रिया पोलिस अधिकाऱ्यांनी माध्यमांशी बोलताना दिली.
मुख्यमंत्र्यांनी शांततेचे आवाहन
नागपुरातील महाल परिसरात दगडफेक आणि तणावपूर्ण स्थिती निर्माण झाल्यावर पोलिस प्रशासन परिस्थिती हाताळत आहेत. या परिस्थितीत नागरिकांनी प्रशासनाला संपूर्ण सहकार्य करावे, असे आवाहन मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. आपण सातत्याने पोलिस प्रशासनाशी संपर्कात असून, त्यांना नागरिकांनी सहकार्य करावे. नागपूर हे शांतताप्रिय आणि एकमेकांच्या सुखदुखा:त सहभागी होणारे शहर आहे. ही नागपूरची कायम परंपरा राहिली आहे. अशावेळी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेऊ नका आणि प्रशासनाला संपूर्ण सहकार्य करा, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.












Click it and Unblock the Notifications